अकार्यक्षम आणि भ्रष्ट अधिकार्यांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याची टीका

कुडाळ – जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट अधिकार्यांमुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत ‘हर घर जल’ (प्रत्येक घराला पाणी) या नळपाणीपुरवठा योजनेच्या कामांचा पूर्णतः बट्ट्याबोळ झाला आहे. केंद्र सरकारने योजनेसाठी डिसेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी होता, तरीही अद्यापपर्यंत बहुतांश कामे अर्धवट आहेत, तर केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी कामे पूर्ण झाली आहेत. अधिकार्यांच्या टक्केवारीच्या मानसिकतेमुळे ‘जनतेला पाणी मिळो अथवा न मिळो’ याचे काही सोयरसुतक त्यांना नाही, असे यातून दिसते, असा आरोप शिवसेना कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.
या पत्रकात गावडे यांनी म्हटले आहे की, कंत्राटदाराकडून अर्धवट कामे पूर्ण करण्याच्या अटी आणि शर्ती यांवर या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करून घेण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर दबाव आणत आहेत, अशी माहिती मिळते; मात्र अर्धवट राहिलेली कामे हस्तांतरण प्रक्रियेनंतर ठेकेदाराने पूर्ण केली नाहीत, तर भविष्यात त्याचे दायित्व कोण घेणार ? हा खरा प्रश्न निर्माण होत आहे. कार्यारंभ आदेशापासून निर्धारित वेळेत काम पूर्ण न करणार्या ठेकेदारांवर विभागाने नियमानुसार दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित असतांना भ्रष्ट कारभारामुळे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. या योजनेच्या कामांचा ‘विशेष जनता दरबार’ बोलावून आढावा घ्यावा, यासाठी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे.