अक्षय्य तृतीया आणि शेती !

१. मातीत आळी घालणे आणि पेरणी

पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतभूमीची मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतभूमीची स्वच्छता करून खतमिश्रित मातीच्या थरांना खाली-वर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या भूमीतील मृत्तिकेविषयी कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी घालतात.

कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरायला प्रारंभ केल्यास त्यापासून विपुल धान्य पिकते. कधीही तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य !) महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पाऊस चालू झाल्यावर सुपीक भूमीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते. (पूर्वी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच पावसाला प्रारंभ होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अल्प झाल्याने आणि शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने भूमी नापीक होत आहेत. कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही न्यून झाले आहे.)

२. वृक्षारोपण 

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, अशी समजूत आहे. ‘आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही’, अशी समजूत आहे.

– ज्योतिषी राहुल नारायणराव पुराणिक आणि ज्योतिषी आकाश नारायणराव पुराणिक, जालना