बोधगया, बिहार येथील महाबोधी महाविहार तीर्थक्षेत्र कह्यात मिळावे, यासाठी बौद्ध धर्मियांचा मोर्चा

महाबोधी महाविहार (बिहार)

सिंधुदुर्गनगरी – सध्या ब्राह्मणांच्या कह्यात असलेले बिहार राज्यातील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या कह्यात मिळावे, या मागणीसाठी देशभर चालू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी २८ एप्रिल या दिवशी जिल्ह्यातील बौद्धांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्ह्यातील बौद्ध धर्मीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या कह्यात मिळत नाही, तोपर्यंत बौद्धांचा एकत्रितरित्या लढा चालू राहील’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.

बिहारमध्ये जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र ‘बोधगया’ आहे. ‘बोधगया’ हे बौद्ध धर्माच्या ४ पवित्र स्थळांपैकी एक आहे. तेथे भगवान बुद्धांना दुःखमुक्तीचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले. बोधगया येथील महाबोधी महाविहार हे भारताबरोबरच जगभरातील बौद्ध धर्मियांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे; मात्र सध्या ते ब्राह्मणांच्या कह्यात आहे. वर्ष १९४९ च्या ‘बोधगया टेम्पल’ कायद्यातील बोधगया महाविहार व्यवस्थापन समितीच्या रचनेतील अन्यायकारक तरतुदीमुळे बौद्धांचे हे पवित्र स्थळ ब्राह्मणांनी कह्यात घेतले आहे. हे पवित्र स्थळ मुक्त करून बौद्धांच्या कह्यात मिळावे, यासाठी देशभरात आंदोलन चालू आहे. बौद्ध भिख्खूंच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘दी बुद्धिस्ट फेडरेशन’च्या नेतृत्वाखाली  मोर्चा काढण्यात आला होता.

भंते सचित बोधी, भंते प्रज्ञावंत, भंते अश्वजीत यांच्यासह विविध बौद्ध संघटनांचे जिल्हाध्यक्ष, तसेच पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन बिहारचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.