युवा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा लाभलेला अनमोल सत्संग आणि या सत्संगात प.पू. गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन !

मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा काही भाग आपण २९ एप्रिल २०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग येथे दिला आहे.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/908184.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

६. युवा साधकांना साधनेत साहाय्य करणारे आदर्श माता-पिता !

६ इ. घरी आर्थिक समस्या असूनसुद्धा एकुलत्या एक कन्येला ‘संत होण्यासाठी तू पूर्णवेळ साधना कर’, असे सांगणारे माता-पिता ! 

कु. प्रांजली शिरोडकर (आताच्या सौ. रमा रामदास गोडसे) : गुरुदेव, मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे मला वाटत होते की, ‘मी त्यांना वृद्धापकाळात सांभाळावे, नोकरी करावी.’ एके दिवशी मी नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेले होते. तेव्हा सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा मला सेवेसंदर्भात भ्रमणभाष आला; परंतु मी तो उचलू शकले नाही. तेव्हा मला पुष्कळ खंत वाटली आणि रडूही येत होते. नंतर घरी येऊन मी हा प्रसंग आई-बाबांना सांगितला आणि माझी मनःस्थितीही त्यांना सांगितली. मी म्हणाले, ‘‘मी तुमची एकुलती एक मुलगी आहे; म्हणून मला नोकरी करायची आहे आणि तुम्हाला सांभाळायचे आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘आम्हाला सांभाळणारी तू कोण आहेस ?’

परात्पर गुरु डॉ. आठवले : कमाल आहे. किती सुंदर सांगितले त्यांनी !

कु. प्रांजली शिरोडकर : आई-वडील म्हणाले, ‘‘कोरोनामुळे दळणवळण बंदी असूनही आपल्याला थोडीतरी आर्थिक अडचण आली का ? सर्व गुरुदेवांनीच पाहिले ना ? आम्हाला पहाणारी तू कोण आहेस ? गुरुदेवच आम्हाला पहाणार आहेत. त्यामुळे तू साधना कर. लवकर पूर्णवेळ साधना करायला लाग आणि संत हो ! हेच आमच्यासाठी पुष्कळ आहे.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले : बहुतांश साधकांना त्यांचे आई-वडील किंवा अन्य कुणी विरोध करतात. हिचे आई-वडील मात्र तिला ‘संत हो’, असा आशीर्वाद देतात. पुष्कळ सुंदर !

कु. प्रांजली शिरोडकर : मी आता पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय केला आहे. आई-वडील म्हणाले, ‘आता आश्रमात जात आहेस, तर घरी परत आली नाहीस, तरी चालेल. तू तेथेच रहा.’’ त्यामुळे असे वाटते की, ‘आता येथेच रहावे, घरी जायला नको.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुझा निर्णय पालटणार नाही ना ? सर्व सोडून तुला साधना करण्यासाठी आश्रमात यायचे आहे. यापेक्षा मोठे काय असू शकते ! पुष्कळ सुंदर !

७. साधनेची फलनिष्पत्ती 

७ अ. शरिराने सेवा करतांना नामजप आणि इतर वेळी मन निर्विचार असणे, ही स्थिती साधनेच्या दृष्टीने चांगली असणे 

श्री. चेतन राजहंस : श्री. अमोल करमळकर हे कोल्हापूरहून आले आहेत. तेथे जिल्ह्यात संगणकीय सेवा करतात.

श्री. अमोल करमळकर (कोल्हापूर, महाराष्ट्र) : गुरुदेव, पुष्कळ वेळा असे होते की, नामजप करतांना माझ्या मनाची स्थिती पुष्कळ शांत आणि स्थिर असते; परंतु त्या वेळी नामजप न होता आतून एकदम शांत अन् स्थिर वाटत असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे अधिक महत्त्वाचे आहे. नामजप करण्याचा उद्देश काय असतो ? तर मनाला शांत वाटले पाहिजे. जर नामजप न करताच शांत वाटत असेल, तर हे पुढच्या टप्प्याचे आहे. पुष्कळ छान ! याच स्थितीत रहा. ध्यान इत्यादी लावणे, हे पुढच्या टप्प्याचे असते. त्या वेळी नामजप न करता ध्यान लावून शांत बसायचे.

श्री. अमोल करमळकर : प.पू. गुरुदेव, प्रत्येक वेळी अशा स्थितीत रहाण्यासाठी प्रयत्न करणे योग्य आहे का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : जेव्हा आपण काही कृती किंवा सेवा करतो, त्या वेळी नामजपासह सेवा करायची. जेव्हा कोणतीच कृती करत नसू, तेव्हा निर्विचार स्थितीत रहायचे.

श्री. अमोल करमळकर : सेवा करतांना माझी तशी स्थिती (निर्विचार स्थिती) अधिक असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे अधिक चांगले आहे. सेवा योग्य प्रकारे होत असेल, तर पुष्कळच चांगले आहे. ही पुष्कळ उच्च स्थिती आहे. साधनेत लवकर प्रगती करत आहेस.

(क्रमशः)

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/908900.html