मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे पहलगाम येथील हिंदूंच्या हत्येच्या विरोधात सकल हिंदु समाजाचा मोर्चा !

५०० हून अधिक राष्ट्रप्रेमींचा सहभाग !

मोर्चात सहभागी राष्ट्रप्रेमी

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – काश्मीर येथील हिंदूंवरील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर सैनिकी कारवाई करावी, या मागणीसाठी मलकापूर येथे सकल हिंदु समाज आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या पुढाकाराने २७ एप्रिल या दिवशी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार श्री. विनय कोरे सहभागी झाले होते. मोर्चा झाल्यावर शाहूवाडीचे नायब तहसीलदार प्रदीप जाधव यांना निवेदन देण्यात आले.

शाहूवाडीचे नायब तहसीलदार प्रदीप जाधव यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

मोर्चाचा प्रारंभ शिवतीर्थावर झाला, तसेच शहरातील विविध मार्गांवरून जाऊन शिवतीर्थावर मोर्चाची सांगता झाली. समारोपाच्या प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सर्व हिंदूंनी या प्रसंगी ‘हिंदूंकडूनच खरेदी करू’, असा निर्धार केला.

सकल हिंदु समाज आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने मलकापूर येथे काढलेला मोर्चा

या मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेले सरदार संताजी घोरपडे यांचे वंशज श्री. बाबासो घोरपडे, भाजपचे श्री. मधुकर लाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते, माजी बांधकाम सभापती श्री. सर्जेराव पाटील, नगराध्यक्ष श्री. अमोल केसरकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, सनातन संस्थेचे डॉ. संजय गांधी, हिंदुत्वनिष्ठ डॉ अशोक जंगटे, सर्वश्री रूपेश वारंगे, प्रकाश पाटील, महेश कोठावळे, विश्वास पाटील, सुधाकर मिरजकर यांसह ५०० राष्ट्रप्रेमींची उपस्थिती होती. मोर्चासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

क्षणचित्रे

१. मोर्चाच्या आयोजनासाठी हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने नियोजन बैठक घेण्यात आली. यात संपर्कापासून सर्व नियोजन करण्यात आले. त्यामुळे अल्प कालावधीत मोर्चा चांगल्या प्रकारे पार पडला.

२. मोर्चात हिंदुत्वनिष्ठांनी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘हिंदूसंघटन हीच काळाची आवश्यकता’, ‘एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो’, यांसह अन्य प्रबोधनपर लिखाण असलेले हातात घेतलेले फलक सामान्य नागरिक आवर्जून वाचत होते. या फलकांमुळे मोठ्या प्रमाणात जागृती झाली, तसेच आवाहन केल्यावर अनेक नागरिक मोर्चात सहभागी झाले.