६३ व्या वाढदिवसानिमित्त पू. (सौ.) ज्योती सुदिन ढवळीकर यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
३०.४.२०२५ या दिवशी बांदिवडे, फोंडा, गोवा येथील सनातनच्या १३२ व्या संत पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिका सौ. मंगला मराठे यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सौ. ज्योतीताई ‘संत होणार’ याची पूर्वसूचना मिळणे
‘मी २१ ते २३.२.२०२५ या कालावधीत एका विवाह समारंभासाठी पुण्याला गेले होते. २ – ४ दिवस कार्यक्रम आणि काही खरेदी इत्यादींमध्ये व्यस्त असतांनाही मला ज्योतीताईंची आठवण येत होती. त्यात प्रामुख्याने ‘आता घरी गेल्यावर त्यांचे गुण लिहून काढावेत’, असा विचार माझ्या मनात येत होता. २४.२.२०२५ या दिवशी मी सकाळी घरी, फोंडा, गोवा येथे पोचल्यावर ‘आज आश्रमात एक कार्यक्रम आहे आणि तुला बोलावले आहे’, असा निरोप मला माझे यजमान डॉ. पांडुरंग मराठे यांनी दिला. तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘‘आज बहुतेक सौ. ज्योतीताई यांना ‘संत’ म्हणून घोषित केले जाईल !’’
२. मुळातच साधकवृत्ती आणि गुणांचा खजिना असलेल्या पू. (सौ.) ज्योती ढवळीकर !
मी आणि पू. (सौ.) ज्योती ढवळीकर आम्ही दोघी एकाच अधिकोषात काम करत होतो. पूर्वीपासून त्यांची साधकवृत्ती होती. एरवी एखाद्या साधकाचे गुण विचारले, तर थोडा तरी विचार करावा लागतो; परंतु पू. ज्योतीताई म्हणजे गुणांचा खजिनाच आहेत. त्यांच्या गुणांची सूची लगेच डोळ्यांसमोरच येते. त्यांच्यात स्वभावदोष अत्यंत अल्प प्रमाणात असून त्यांच्या स्वभावात आणि वागण्यात विशेष काही पालट झालेला नाही. ‘त्यांच्यात पूर्वीपासूनच संतत्व होते आणि आता केवळ ते व्यक्त होऊन काळानुसार घोषित झाले आहे’, असे मला जाणवते.
३. प्रेमळ स्वभावामुळे सर्वांशीच मैत्री असणार्या पू. (सौ.) ज्योती ढवळीकर !

मला प्रथम भेटीतच त्यांच्या प्रेमळपणाची प्रचीती आली. वर्ष १९८८ मध्ये माझे पणजी येथील अधिकोशाच्या शाखेतून ‘गोवा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक’ शाखा, फोंडा येथे स्थानांतर झाले. मी अधिकोशात प्रवेश केल्यावर एका कर्मचार्याला विचारले, ‘‘व्यवस्थापकांची (मॅनेजरची) केबिन कुठे आहे ?’’ तेव्हा त्या कर्मचार्याने माझी चेष्टा करून मला प्रसाधनगृहाच्या दिशेने खूण करून तिकडे जाण्यास सांगितले. त्या वेळी ज्योतीताई पटकन पुढे आल्या आणि त्यांनी त्याला दटावले. नंतर त्यांनी मला अन्य सर्व गोष्टींत साहाय्य केले. त्याच वेळी त्यांचा प्रेमळ स्वभाव, तसेच इतरांना साहाय्य करण्याची त्यांची वृत्ती माझ्या मनाला भावली.
त्यानंतर आमची मैत्री झाली आणि ती वृद्धींगत होत गेली. वास्तविक ज्योतीताईंची सर्वांशीच समान मैत्री होती. त्यांचे ‘इतरांना साहाय्य करणे आणि इतरांवर प्रीती करणे’, हे गुण ओथंबून वहात होते. आता त्यात आणखी वाढ झाली आहे.
४. इतरांना साहाय्य करण्यास नेहमी तत्पर असणे
वर्ष १९९१ मध्ये सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य गतीने वाढू लागले होते. मी आणि साधक श्री. सदानंद जोशी पुष्कळ व्यस्त असायचो. आम्ही शनिवार आणि रविवार या दिवशी गोव्याहून जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये प्रसारकार्याच्या संदर्भातील कार्यक्रमांना सतत जात असू. अशा वेळी मला अधिकोषामधील काही अतिरिक्त आणि अंतर्गत सेवा करणे कठीण जात असे. त्या वेळी ज्योतीताई मला नेहमी साहाय्य करायच्या. त्यामुळे मी निश्चिंतपणे गावोगावी अध्यात्मप्रसाराला जाऊ शकत होते. त्यांचा हा स्वभाव केवळ साधकांपुरता मर्यादित नाही, तर त्या सर्वांना साहाय्य करायला नेहमी तत्पर असतात.
५. सर्व क्षेत्रांत प्रवीण असणे
ज्योतीताई मुळातच पुष्कळ हुशार आहेत. त्यांना अधिकोषातील सर्व सेवांचे आकलन होत असे. त्या प्रत्येक गोष्टीत प्रवीण होत्या. आमच्या अधिकोषाचा वार्षिक ताळेबंद (बॅलन्स शीट) ज्योतीताईंच्या साहाय्यानेच पूर्ण होत असे. अधिकारी वर्गातील प्रत्येक व्यक्तीला त्या आपल्या विभागात हव्या असायच्या.
६. अहंशून्यता
ज्योतीताईंचे यजमान (गोवा राज्याचे वीजमंत्री मा. श्री. सुदिन ढवळीकर) मंत्री झाल्यावरही त्यांच्यात काही पालट झाला नाही. त्यांची वृत्ती अहंशून्यच आहे !
७. पू. (सौ.) ज्योतीताईंनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर लक्षात आलेले त्यांचे दैवी गुण
७ अ. साधनेचे महत्त्व पटून ते एकलव्याप्रमाणे आचरणात आणणार्या पू. ज्योतीताई ! : पू. ज्योतीताई यांना ‘साधनेचे महत्त्व, तसेच नामजप कोणता आणि कसा करावा ?’, हे कळल्यावर त्यांनी एकही प्रश्न न विचारता लगेचच नामजप चालू केला. परात्पर गुरुदेवांची भेट झालेली नसतांनाही त्यांना कधीही कोणतीही शंका आली नाही. गुरुदेवांचे मार्गदर्शन त्यांनी एकलव्याप्रमाणे आचरणात आणले.
७ आ. देवासाठी रडणार्या पू. (सौ.) ज्योती ढवळीकर ! : पू. ज्योतीताईंचे एकत्र कुटुंब असल्याने त्यांच्यावर अधिक दायित्व होते. पू. ज्योतीताई यांना कधी काही वैयक्तिक अडचणींमुळे सत्संग, सेवा किंवा प्रत्येक अभ्यासवर्ग यांना येणे शक्य होत नसे. तेव्हा त्यांना फारच वाईट वाटत असे आणि त्या पुष्कळ रडत असत. देवासाठी सतत रडणारे फार विरळा असतात. त्यातीलच एक पू. ज्योतीताई आहेत.
७ इ. अभ्यासवर्गात सांगितलेली सूत्रे ऐकण्याची तीव्र तळमळ असणे आणि ती सूत्रे त्वरित आचरणात आणणे : अभ्यासवर्गातील सूत्रे ऐकण्याची आतुरता आणि तीव्र तळमळ यांचे असामान्य उदाहरण म्हणजे पू. ज्योतीताई ! मी आणि त्या अधिकोषाच्या एकाच शाखेत सेवारत होतो. अभ्यासवर्ग झाल्यावर दुसर्या दिवशी पू. (सौ.) ज्योतीताई यांना सूत्रे ऐकण्याची पुष्कळ तळमळ लागलेली असायची. आम्ही दोघी १० मिनिटांत जेवण करून अभ्यासवर्गातील सूत्रांची चर्चा करायचो. पू. ज्योतीताई तल्लीन होऊन आणि कानात प्राण आणून सर्व सूत्रे ऐकत असत. गुरुदेवांनी सांगितलेली सूत्रे ऐकून त्या ती सूत्रे त्वरित कृतीतही आणत असत.
७ ई. प्रतिकूल परिस्थितीतही षड्रिपू उफाळून न येणे : पू. ज्योतीताई यांना विविध कारणांमुळे इतर साधकांप्रमाणे कार्यक्रमांना आणि अभ्यासवर्गामध्ये सहभागी होण्यास मर्यादा येत असत. असे असले, तरीही त्यांच्या मनात कधी नकारात्मकता, तक्रार, राग, द्वेष, इतरांशी तुलना आदी प्रकारचे कोणतेही विकार उफाळून येतांना मी पाहिले नाही.
७ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे आज्ञापालन करणे : एका प्रत्यक्ष भेटीत गुरुदेवांनी त्यांना ‘सध्या ग्रंथांचा अभ्यास करा. ‘श्रद्धा आणि सबुरी’ या तत्त्वांवर लक्ष केंद्रित करा’, असे सांगितले. त्यानंतर पू. (सौ.) ज्योतीताई अधिक शांत आणि स्थिर झाल्या. त्यांचा आंतरिक संघर्ष फार मोठ्या प्रमाणात उणावला.
७ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) ज्योतीताईंच्या आध्यात्मिक उन्नतीविषयी काढलेले उद्गार ! : पू. (सौ.) ज्योतीताईंना श्रद्धा वाढवण्यास सांगितल्यानंतर त्या विविध प्रयत्न करून आनंदी आणि समाधानी राहू लागल्या. त्यांच्या सबुरीचे फळ त्यांना काही कालावधीत मिळाले. एक दिवस गुरुदेवांनी मला बोलावून एक सूत्र लिहून ठेवण्यास सांगितले. ‘तुमच्या मैत्रिणीमध्ये पुष्कळ भाव आणि तळमळ आहे. त्या अधिकोषामध्ये जेवढे घंटे काम करतात, तेवढेच घंटे सेवा केली, तर त्यांची आध्यात्मिक प्रगती फार लवकर होणार आहे !
७ ए. पूर्णवेळ साधना करण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीचा कौल घेणे : मी पू. (सौ.) ज्योतीताई यांना गुरुदेवांनी त्यांच्याविषयी काढलेले उद्गार सांगितल्यावर त्यांची भावजागृती झाली. वास्तविक गुरुदेव कधीही कोणाला पूर्णकालीन अध्यात्मप्रसार करण्यास उद्युक्त करायचे नाहीत. आध्यात्मिक प्रगतीसाठी ‘काय योग्य होईल’, हे ते सांगत असत आणि आपली प्रकृती अन् आवड यांनुसार साधक स्वतःच निर्णय घेत असत. या अनुषंगाने अधिकोषात कामाला जेवढे घंटे देते, तेवढेच घंटे अध्यात्मातील कृतींसाठी द्यावेत’, असे विचार पू. ज्योतीताईंच्या मनातही येऊ लागले. त्यांनी तसे कुटुंबियांना विचारल्यावर श्री महालक्ष्मीदेवीला कौल लावून पहाण्याचे ठरवले. त्यांचे पूर्ण कुटुंब श्री महालक्ष्मीदेवीची अनन्य भक्ती करते.
श्री महालक्ष्मीला कौल लावल्यानंतर सकारात्मक कौल मिळाला आणि पू. ज्योतीताई अधिकोषातील नोकरी सोडून सनातनच्या फोंड्यातील ‘सुखसागर’ सेवाकेंद्रात सेवेसाठी येऊ लागल्या.
‘हे गुरुराया, सनातनच्या संतरत्नांची पारख तुम्हीच करता. ‘उत्तम गुणांचा खजिना असलेल्या पू. (सौ.) ज्योतीताई यांच्या सहवासाचा लाभ या पामर जिवाला करून दिलात’, त्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मंगला मराठे (वय ६० वर्षे), फोंडा, गोवा. (१०.४.२०२५)
पू. (सौ.) ज्योती ढवळीकर संतपदी विराजमान होण्याच्या संदर्भात पू. (श्रीमती) सुमन नाईक यांना मिळालेली पूर्वसूचना !

अ. ‘पू. (सौ.) ज्योतीताई कौटुंबिक दायित्व निभावतांना पुष्कळ व्यस्त असतात. त्या सगळी सेवा शांत आणि स्थिर राहून करतात. त्या एवढ्या व्यस्त असतात की, ‘त्या या स्थितीतही नामजप आणि साधना कशा करतात’, असे मला वाटत असे.
आ. सौ. ज्योतीताईंच्या चेहर्यावर चैतन्य जाणवते. त्यांचा चेहरा नुकत्याच उमलेल्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसतो.
इ. ‘त्या संतपदी विराजमान झाल्या आहेत’, असे मला जाणवत होते.
मी गुरुचरणी प्रार्थना करते, ‘त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे.’
(‘प्रत्यक्षातही २४.२.२०२५ या दिवशी पू. (सौ.) ज्योती ढवळीकर संतपदी विराजमान झाल्या.’ – संकलक)
– (पू.) श्रीमती सुमन नाईक (सनातनच्या ६२ व्या संत, वय ७६ वर्षे) (२.३.२०२५)
पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. श्री. अमित नाईक, कपिलेश्वरी, फोंडा, गोवा.
अ. ‘३०.११.२०२४ या दिवशी पर्वरी, गोवा येथे सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित केला होता. त्या वेळी पू. (सौ.) ज्योतीताईंकडे पाहिल्यावर ‘त्यांच्या देहातून सगळीकडे प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.
आ. ‘त्या लवकर संतपद गाठणार आहेत’, असे मला वाटले.’
२. सौ. स्वेता नाईक, मडगाव, गोवा.
अ. ‘१९.२.२०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सहस्रदीप-दर्शन सोहळा पार पडला. ‘गुरुकार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी साधकांना प्रकाशरूपी ऊर्जा मिळावी’, याकरता झालेल्या या सोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हातांतील दीप प्रज्वलित केले होते अन् त्यांनी साधकांच्या प्रतिनिधी म्हणून अनुक्रमे सौ. ज्योती ढवळीकर (आताच्या पू. (सौ.) ज्योती ढवळीकर) अन् सौ. लता ढवळीकर (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६५ वर्षे) यांच्या हातांतील दीप प्रज्वलित केले. त्या सोहळ्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना माझ्या मनात विचार आला, ‘या दोघींकडून पुष्कळ मोठे कार्य होणार आहे.’
आ. मी पू. (सौ.) ज्योतीताईंकडे पाहिल्यावर ‘त्यांच्या देहातून चैतन्याचा प्रकाश सगळीकडे प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत असे.
इ. मी नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांच्या समवेत चारचाकी गाडीतून पर्वरी, गोवा येथे आयोजित केलेल्या सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याला गेले होते. त्या वेळीही ‘त्यांच्या देहातून चैतन्याचा स्रोत सगळीकडे प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २.३.२०२५)
|