दुर्गम भागात पोचणार्‍या एस्.टी.च्या छोट्या गाड्यांची निर्मिती करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, २९ एप्रिल (वार्ता.) – राज्यातील दर्‍या-डोंगरासारख्या दुर्गम भागात पोचतील अशा साडेसात मीटर लांबीच्या छोट्या एस्.टी. च्या गाड्यांची निर्मित करण्यात येणार आहे. २२ जण बसतील अशी या गाड्यांची क्षमता असेल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी २९ एप्रिल या दिवशी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर माहिती देतांना प्रताप सरनाईक म्हणाले,‘‘एस्.टी. महामंडळाला १० सहस्र १३२ कोटी रुपयांचा तोटा आहे. मागील सरकारने का विकास केला नाही, यात न अडकता आम्ही एस्.टी. महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू. एस्.टी. महामंडळाची एकूण जागा १३ सहस्र ४०० एकर इतकी आहे. यांवरील ७२ एस्.टी. डेपो ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहेत. हे काम करणार्‍या ठेकेदारांचा कल शहरी भागात होता; मात्र आम्ही शहरी, तालुका आणि ग्रामीण भागांतील डेपो विकसित करण्याचे ‘पॅकेज’ केले आहे. त्यामुळे शहरांप्रमाणे ग्रामीण भागांतील बस डेपोही विकसित होतील. यापुढे लांब पल्ल्यांच्या मार्गातील एस्.टी. ज्या ढाब्यांवर थांबते त्यांचे करार यापूर्वी ३ किंवा ५ वर्षांचे होते. यापुढे त्यांच्याशी १ वर्षाचा करार करण्यात येईल. त्यांची सेवा पाहूनच कराराचा कालावधी वाढवला जाईल. येत्या ४ वर्षांत एस्.टी. महामंडळाच्या स्वत:च्या २५ ते ३० सहस्र बसगाड्या असतील. खासगी गाड्यांकडे वळणारे प्रवासी एस्.टी.कडे वळतील अशा प्रकारे चांगल्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू.