अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुण्य कसे मिळवाल ?

वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया ! हा हिंदु धर्मातील पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. यंदा २९ एप्रिल या दिवशी अक्षय्य तृतीया सायंकाळी ५.३१ वाजता चालू झाली असून ३० एप्रिल या दिवशी दुपारी २.१३ वाजता संपेल. अक्षय्य तृतीया ३० एप्रिल या दिवशी साजरी केली जाईल.

 

श्री. दिलीप देशपांडे

१. दानाचे महत्त्व

या दिवशी दानाचे महत्त्व अधिक असल्याने अनेक जण छत्री, वहाणा, पाण्यासाठी माठ, रांजण, पंचे, कापड, वस्त्र आदींचे दान गरजू व्यक्तींना, वृद्धाश्रमात किंवा गोरगरिबांच्या वस्त्यांत जाऊन करतात. जवस, गहू, हरभरा, दुग्धजन्य पदार्थ, जलकुंभ, सर्व प्रकारचे रस, आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तूंचे दान करत असतात.यामुळे अनंत फलप्राप्ती होत असते.

२. या दिवशी भगवान विष्णु आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. विधीवत् पूजा केल्यास मनोरथ पूर्ण होते.

कान्हादेशातील अक्षय्य तृतीया

झोके घेतांना महिला

कान्हादेशात अक्षय्य तृतीया सण उत्साहात साजरा होतो. तेथे या सणाला ‘आखाजी’ संबोधले जाते. ग्रामीण भागात पत्त्याचे डाव रंगतात. माहेरवाशिणींसाठी पुरणपोळी, आंब्याचा रस, कटाची आमटी, काही ठिकाणी मांडे (खापरावर केलेल्या मोठ्या पुरणपोळ्या) असा बेत असतो. अनेक खेड्यांमध्ये झाडाला झोके बांधलेले असतात आणि महिला एकत्र जमवून आखाजीची गाणी म्हणतात. बालपणीच्या मैत्रिणींना भेटून आनंदाची उधळण करतात. 

– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जिल्हा जळगाव

३. या कालावधीत उन्हाचे प्रमाण वाढलेले असल्याने अनेक व्यापारी किंवा संस्था पाणपोई चालू करतात. जनावरांच्या पाण्यासाठी हौद बांधतात.

४. नामजप

अक्षय्य तृतीयेच्या काळात नामस्मरणालाही तेवढेच महत्त्व आहे. आपल्याला प्रिय देवतेचे होईल तेवढे नामस्मरण करावे. अक्षय्य तृतीयेला केलेल्या नामस्मरणाने घरातील दोष नाहीसे होतात. पुण्यही अखंड टिकून रहाते.

५. संकल्प

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण संकल्प करूया. देवासमोर एक धान्याचा आणि दुसरा पाण्याने भरलेला कलश ठेवून समृद्धीसाठी अक्षय्य वरदान मागूया. सुख, समृद्धी, आरोग्य यांसाठी भगवान विष्णु, अन्नपूर्णामाता आणि लक्ष्मीदेवी यांना प्रार्थना करूया.

– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जिल्हा जळगाव