१. अक्षय्य तृतीया हा शुभमुहूर्त कसा ?
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो. हिंदु दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभमुहूर्त असतात. दसरा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत, तर दिवाळीचा पाडवा म्हणजेच कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा अर्ध मुहूर्त आहे.
कोणत्याही शुभकार्याचा किंवा नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी केला जातो. हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभकाम आरंभण्यास दिनशुद्धी बघण्याची आवश्यकता नसते. अक्षय्य तृतीयेच्या या दिवशी हिंदु दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया येते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसबेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते.
अक्षय्य तृतीया ही विष्णूचा एक अवतार समजल्या जाणार्या परशुरामाचीही जन्मतिथी आहे.
२. शुभकार्याचे फळ ‘अक्षय्य’ मिळते !
‘या दिवशी आरंभलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ ‘अक्षय्य’ (न संपणारे) असे मिळते’, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा आणि श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुण लोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख आणि समृद्धी प्राप्त करून देणार्या देवतेच्या प्रती कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे.
३. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे ?
अ. जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
आ. सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्र यांचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. ब्राह्मण भोजन घालावे.
इ. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते अवश्य खावे.
ई. नवीन वस्त्र, शस्त्र किंवा दागिने विकत घ्यावेत.
उ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश करणे, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभकामेही केली जातात.
– ज्योतिषी राहुल नारायणराव पुराणिक आणि ज्योतिषी आकाश नारायणराव पुराणिक, जालना