|
रत्नागिरी – जिल्ह्यातील ३ पाकिस्तानी महिलांचा व्हिसा दीर्घकाळासाठी आहे. त्यांची पूर्ण चौकशी करण्यात आली आहे. भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या मोहिमेतून या तिघींना सवलत मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर पोलिसांकडून जिल्ह्यातील पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात आला. या वेळी जिल्ह्यात लग्न करून आलेल्या ३ पाकिस्तानी महिला वास्तव्याला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलांनी पाकिस्तानी पासपोर्ट जमा केला असून, भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी अर्ज केला आहे; परंतु अजून त्यावर विचार झालेला नाही. त्यामुळे या परिस्थितीत काय करावे ? आणि त्यांना परत पाकिस्तानमध्ये पाठवायचे का ? याविषयी शासनाकडून पोलीसदलाने मार्गदर्शन मागवले होते; परंतु त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे दीर्घकालीन व्हिसा आहे. त्यांची मुदत अजून काही वर्षे आहे. त्यामुळे भारतातून त्यांना परत पाठवण्याच्या मोहिमेतून त्यांना सवलत मिळाली आहे. भविष्यात व्हिसा संपल्यानंतर त्याचा विचार केला जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.