१४ मे या दिवशी संपणार शिक्षा
रत्नागिरी – तालुक्यातील नाखरे-निरूळ येथील चिरेखाणीवर अवैधपणे वास्तव्य करणारे १३ बांगलादेशी घुसखोरांना न्यायालयाने ठोठावलेली ६ महिन्यांची शिक्षा १४ मे या दिवशी संपणार आहे. शिक्षा संपल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी १५ मे या दिवशी त्यांना बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे. त्यांना बांगलादेश-भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (बी.एस्.एफ्.च्या) सैनिकांच्या स्वाधीन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या आतंकवादीविरोधी पथकाला पूर्णगड पोलीस ठाण्याच्या सीमेत भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक रहात असल्याची माहिती ११ नोव्हेंबर २०२४ ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिरेखाणीवर धाड घालून १३ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात ते भारतीय असल्याचे पुरावे त्यांच्याकडे मिळाले नाहीत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्यानंतर रत्नागिरीचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी या १३ आरोपांना प्रत्येकी ६ महिने कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा १४ मे या दिवशी संपणार आहे.