India Slams Pakistan At UN : पाकिस्तान जागतिक आतंकवाद्यांचे आश्रयस्थान !

  • भारताने संयुक्त राष्ट्रात पाकला पुन्हा झोपडले !

  • पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विधानाचा केला उल्लेख

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल व पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत आतंकवादाला पाठिंबा आणि निधी दिल्याची स्वीकृती दिली आहे. आसिफ यांनी आतंकवादी संघटनांना कसा पाठिंबा दिला ?, आतंकवाद्यांना कसे प्रशिक्षण दिले ?, निधी दिली, यांविषयी जे सांगितले, ते संपूर्ण जगाने पाहिले आहे. त्यांच्या या स्वीकृतीमुळे कुणाला आश्चर्य वाटले नाही; कारण पाकिस्तान जागतिक आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे संपूर्ण जगाला ठाऊक आहे, असे सांगत भारताने संयुक्त राष्ट्रांत पुन्हा एकदा पाकिस्तान आतंकवाद्यांना कसे साहाय्य करत आहे ?, हे सांगितले.

१. संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी पुढे म्हटले की, आंतरराष्ट्रीय व्यासपिठाचा एक विशेष प्रतिमंडळ नेहमी दुरुपयोग करत आला आहे. या व्यासपिठावरून भारतावर चुकीचे आरोप केले जात आहेत. मुंबईवर वर्ष २००८ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर पहलगाव आक्रमणात सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला. भारत अनेक दशकांपासून सीमापार आतंकवादाला बळी पडत आहे. पहलगामच्या घटनेनंतर जगभरातील देश आणि त्यांचे नेते यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याविषयी भारत त्यांचा आभारी आहे.

२. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांच्या दबावामुळे पाकिस्तानने आतंकवादास प्रोत्साहन दिल्याचे घाणरडे काम केले आहे. त्याची किंमत ३ दशकांपासून पाकिस्तान मोजत आहे.

संपादकीय भूमिका

भारताने शेकडो वेळा हे संयुक्त राष्ट्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय व्यासपीठ यांवरून सांगितले आहे; मात्र यातून काही साध्य झालेले नाही; कारण पाक अशा गोष्टींना भीक घालत नाही आणि जगही भारताच्या अशा बोलण्याची नोंद घेत नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे भारताने पाकला समजेल, अशा भाषेत कायमसाठी समजावले पाहिजे !