
मुंबई – मत्स्योत्पादनात देशात आंध्रप्रदेशचा वाटा ३२ टक्के इतका आहे, तर महाराष्ट्र तिसर्या क्रमांकावर असून १३ टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. हा हिस्सा ३२ टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून देशातील सर्वाधिक मत्स्योत्पादन करणारे राज्य होण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये असून महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यासाठी प्रयत्न करावेत, तसेच देशाचे मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी सर्व राज्यांनी एकत्रित येऊन सहकार्याने कार्य करावे, असे आवाहन केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उपाख्य ललन सिंह यांनी केले. देशातील मत्स्यव्यवसातील संधी, आव्हाने आणि समस्या यांविषयी किनारपट्टीच्या राज्यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची एकत्रित बैठक हॉटेल ताज पॅलेस येथे पार पडली. त्यात ते बोलत होते. या वेळी ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशामधील मत्स्यव्यवसाय मंत्री, राज्यमंत्री आणि संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये ड्रोनद्वारे चालू करण्यात आलेल्या किनारपट्टीच्या देखरेखीचे केंद्रीय मंत्री सिंह यांनी कौतुक केले.
किनारपट्टीवरील मासेमारांच्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने योजना बनवावी !- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मासेमारांना त्यांच्या हक्काचे आणि चांगले घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर चांगली योजना केंद्र सरकारने सिद्ध करावी. सागरी सुरक्षा ही महत्वाची असून त्यासाठीच महाराष्ट्राने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर चालू केला आहे. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे आणि मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा प्राप्त करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.