पहलगाम आक्रमणाचे प्रकरण

मुंबई – काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्यांना आतंकवाद्यांनी ‘हिंदू’ म्हणून मारले, यावर कुणी विश्वास ठेवेल का ?’, या असंवेदनशील आणि हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणार्या वक्तव्याच्या विरोधात २८ एप्रिल या दिवशी शिवसेनेने मंत्रालयाजवळील बाळासाहेब भवन येथे आंदोलन केले. शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत शिवसेनेने विजय वडेट्टीवार यांचा निषेध केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पिडित कुटुबियांबाबत संवेदनाहीन वक्तव्य केले, त्याबद्दल आज शिवसेना पक्ष्याच्या वतीने त्यांच्या विरोधात बाळासाहेब भवन मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.@mieknathshinde @DrSEShinde @ShainaNC @Shivsenaofc pic.twitter.com/yPzBb8r3LC— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) April 28, 2025
या आंदोलनात शिवसेनेच्या नेत्या शायना एन्.सी. यांच्यासह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. या वेळी डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘‘विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. यापूर्वीही विजय वडेट्टीवार यांनी आतंकवाद्यांची पाठराखण करणारी वक्तव्ये केली आहेत. काँग्रेसचे नेते तथा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटकचे मंत्री आर्.बी. धिम्मापूर, सैफुद्दीन सोज, तारीख हमीद करा, रॉबर्ट वाड्रा या पाकधार्जिण्या मंडळींनी भारतीय कुटंबियांचा अपमान केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगर येथे जाऊन पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याचे काम केले, तर काँग्रेसचे नेते असंवेदनशील वक्तव्य करण्यात दंग आहेत.’’
या प्रकरणी शिवसेनेकडून विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.