साटेली भेडशी येथील अवैध मदरशात सापडल्या २ तलवारी : २ मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंद

  • घराचे केले मदरशात रूपांतर

  • हिंदूंनी मदरसा बंद पाडला

साटेली भेडशी येथील अवैध मदरशात सापडल्या २ तलवारी

दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) – थोरलेभरड, साटेली भेडशी येथे घरासाठी अनुमती घेतलेल्या इमारतीत अवैध मदरसा चालवला जात असल्याची माहिती हिंदूंना मिळाली. त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन हा प्रकार रोखला, तसेच पोलिसांनाही याची माहिती दिली. त्यानंतर येथून २ तलवारी कह्यात घेतल्या आहेत, तसेच घरमालक अस्लम ईस्माईल खेडेकर आणि त्याच्यासोबत रहाणारा बिहार येथील बिलाल आलम शेख या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

थोरलेभरड, साटेली-भेडशी येथे एकाने घरासाठी अनुमती घेऊन तेथे घर बांधले आणि त्या घराचे मदरशात रूपांतर केले. बाहेरील मुसलमान येथे सकाळी, दुपारी आणि रात्री नमाजपठण करत, तसेच अन्य राज्यांतील वाहने येत होती. याचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी २७ एप्रिल या दिवशी येथे जाऊन ‘असले अवैध प्रकार येथे चालणार नाहीत’, अशी चेतावणी दिली होती. त्या वेळी तेथे असलेल्या मुसलमान व्यक्तीकडे योग्य कागदपत्रे, तसेच आधारकार्डही नव्हते, असा आरोप हिंदुत्वनिष्ठांनी केला होता. (या सर्वांची सखोल चौकशी होऊन हे मुसलमान नेमके कुठून आले आणि त्यांचा येथे येण्यामागे काय उद्देश आहे? याविषयी माहिती समोर येणे आवश्यक ! – संपादक)

अवैध इमारतीवर कारवाई करण्याची मागणी

या घटनेनंतर २८ एप्रिल या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी येथील तहसील कार्यालयात आणि पोलीस ठाण्यात जाऊन ‘या अवैध इमारतीवर कारवाई करावी अन् हे बांधकाम पाडून टाकावे’, अशी मागणी केली. (अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर का येते ? – संपादक)

अवैध इमारतीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त

पुढील कारवाई होईपर्यंत ही वादग्रस्त इमारत पोलिसांच्या कह्यात देण्यात आली आहे, तसेच येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिली माहिती

या घटनेविषयी जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थोरलेभरड येथे एका घरात तलवारी लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानुसार उपरोक्त घराची झडती घेतली असता स्वयंपाक घरात तांदुळाच्या रिकाम्या गोणीत २ तलवारी सापडल्या. या तलवारी खेडेकर आणि शेख यांनी अवैधरित्या बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. अशाप्रकारे प्राणघातक वस्तू बाळगल्याचे किंवा अवैध कृत्ये निदर्शनास आल्यास नागरिकांनी याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी. अशा वेळी नागरिकांनी अवैधरित्या जमाव करून कायदा हातात घेऊ नये. त्याविषयी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात, पोलीस नियंत्रण कक्षास किंवा ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी. सामाजिक माध्यमातून जातीय, धार्मिक भावना भडकवणार्‍या पोस्ट प्रसारित करू नयेत. अशा पोस्टवर सायबर पोलिसांचे लक्ष असते. अशा पोस्टविषयी संबंधितांवर कायेदशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांनी कळवले आहे.