२ दिवसांत स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन

पिंपरी – विस्कळीत, अपुरा, अनियमित आणि अल्प दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी पिंपरी भागात होत्या; मात्र त्यातच आता दूषित पाण्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. मोशी, दीघी, चर्होली, चिखली, जाधववाडी या भागांत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचा रंग पिवळसर असून पाण्याची चवही पालटली आहे. त्यामुळे येथे नागरी आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. २ दिवसांत स्वच्छ पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्यांनी सांगितले आहे. (पाण्याच्या दूषित पुरवठ्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावतील. ‘जी.बी.एस्.’च्या संसर्गातून नागरिक सावरत असतांनाच दूषित पाणीपुरवठ्याची नवीन समस्या समोर आली आहे. त्यामुळे तातडीने यावर उपाययोजना करायला हवी. – संपादक) फुटक्या जलवाहिन्या, असुरक्षित पाणी साठवण, नदीचे वाढते प्रदूषण यांमुळे पाणी प्रदूषित येत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. दूषित पाण्याचे नमुने निगडी येथील प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवले आहेत. समाविष्ट गावातील नळतोटीच्या पाण्याचेही नमुने घेतले आहेत, असे महापालिकेने सांगितले असून पाणी उकळून पिण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी केले आहे.