पिंपरी (पुणे) – नागरिकांनी नदी सुधार प्रकल्पाची मागणी केली नसतांना केवळ प्रशासनाकडून नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे. या नदी सुधार प्रकल्पाला शहरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्था यांनी विरोध दर्शवला आहे. २७ एप्रिल या दिवशी या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी भेट दिली. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावर नदी सुधार प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याच्या सूचना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना दिल्या. पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामठे ते पिंपळे निलख स्मशानभूमी जवळील नदीपात्रापर्यंत नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांनी पदयात्रा काढली होती.
आंदोलकांनी मांडलेली सूत्रे !
१. नदीचे प्रदूषण ही ज्वलंत समस्या असतांनाही या प्रकल्पातील अवघा ५ टक्के निधी हा नदी स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार आहे.
२. हा प्रकल्प राबवतांना नदीकाठचे अंदाजे ४० सहस्र वृक्ष तोडले अथवा पुनर्रोपणाच्या नावाखाली मारले जाणार आहेत.
३. नदीकाठच्या देवराया नष्ट केल्या जाणार असून त्यामुळे जैवविविधता नष्ट होणार आहे. नद्यांचे पात्र अरुंद होऊन पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
४. हा प्रकल्प राबवतांना नदीचे नैसर्गिक पात्र, जैवविविधता आणि नदी प्रदूषणमुक्ती या गोष्टींवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.