
कोल्हापूर, २६ एप्रिल (वार्ता.) – पहलगाम येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या संपूर्ण देश आणि देशवासीय दुःखामध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम), कोल्हापूर चित्पावन संघ, कर्हाडे ब्राह्मण संघ, तसेच सकल ब्राह्मण समाज यांनी भगवान श्री परशुराम जयंती आणि शिवजयंती यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ब्राह्मण समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या प्रसंगी डॉ. उदय कुलकर्णी, सर्वश्री श्रीकांत लिमये, मकरंद करंदीकर, प्रसाद भिडे, धर्मराज पंडित, मिलिंद पावनगडकर, तसेच विनिता आंबेकर उपस्थित होत्या.
१. २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ वाजता प्रारंभी पालखी सोहळा होईल. हा पालखी सोहळा मंगलधाम येथून प्रारंभ होईल. महाद्धार रस्ता, अर्धशिवाजी पुतळा, बिनखांबी गणेशमंदिर मार्गे हा पालखी सोहळा परत मंगलधाम येथे येईल.
२. पालखी सोहळा परत आल्यानंतर पुढे परशुराम जयंती सोहळा साजरा केला जाईल.
३. ब्राह्मण समाजाच्या वतीने गेली ३५ वर्षे हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. याच समवेत सकल ब्राह्मण समाजातील विविध जाती, पोटजाती, संस्था, संघटनांच्या माध्यमातून वर्षभर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. यात मौजी बंधन, संक्रांती कालावधीतील धुंदूरमास, चित्पावन अष्टमी जागर सोहळा अशा धार्मिक सोहळ्यांसमवेत व्याख्याने, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण, महिलाविषयक कार्यशाळा, आर्थिक साक्षरतेसाठी कार्यशाळा असे उपक्रम राबवले जातात.