‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मला काही सेवांच्या निमित्ताने सत्संग मिळाला. ते स्थुलातून माझ्या समवेत असलेल्या त्या सोनेरी क्षणांच्या काळात त्यांनी मला कधी प्रत्यक्ष शिकवले, तर कधी अप्रत्यक्ष शिकवले.

१. काळानुरूप वेळेला अधिक महत्त्व असल्याचे सांगणे
वर्ष २००७ मध्ये बाहेरच्या प्रिंटरवरून बटरपेपरवर ग्रंथाची प्रिंट काढणे खर्चिक होते. ग्रंथांच्या बटरपेपरच्या प्रिंट अधिक असल्याने ते अधिकच खर्चिक व्हायचे. मुल्की, कर्नाटक येथे ग्रंथांशी संबंधित सेवा करणारा साधक ग्रंथाची संगणकीय धारिका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना पाठवत असे. साधक रामनाथी आश्रमातून बटरपेपरवर प्रत काढून ते बटरपेपर मुल्की येथील सेवाकेंद्रात पाठवत असत. एकदा प.पू. डॉक्टरांना याविषयी समजल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘फार पूर्वी ‘काटकसर करणे आणि पैसे वाचवणे’ हे महत्त्वाचे होते; पण ‘काळानुरूप वेळ वाचणे’ हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे येथे काटकसर करण्याचा विचार न करता मुल्की येथेच प्रिंट काढून ग्रंथ लवकर छपाईसाठी पाठवणे महत्त्वाचे आहे.’’

२. कार्यक्रमासाठी आसंद्या ‘सात्त्विक रचना आणि इतरांचा विचार’ या दृष्टीने ठेवणे महत्त्वाचे असणे
वर्ष २००७ मध्ये एका साधकाचे रामनाथी आश्रमात लग्न होते. तेव्हा माझ्याकडे अन्य साधकाच्या समवेत बैठकव्यवस्थेची (संत आणि पाहुणे यांच्यासाठी आसंद्या मांडण्याची) सेवा होती. मी ही सेवा प्रथमच करत होतो. या लग्नासाठी अन्य संप्रदायाचे संत येणार होते आणि पाहुणेही अधिक येणार होते. ‘पाहुणे अधिक असल्याने सभागृहात पाहुण्यांसाठी अधिकाधिक आसंद्या कशा ठेवता येतील ?’, याकडेच केवळ आमचे लक्ष होते. आम्ही सर्व आसंद्या ठेवल्यानंतर तेथे अकस्मात् गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आले. ते पाहुण्यांसाठी ठेवण्यात आलेल्या एका आसंदीवर बसले. त्यांनी आसंदीच्या दोन्ही बाजूला हात ठेवले. त्यांनी आम्हाला बोलावून सांगितले, ‘‘आसंद्या कशा मांडू नयेत’, याचे हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारे आसंद्या ठेवल्याने आसंदीच्या दोन्ही बाजूला हात ठेवला की, शेजारी बसणार्या व्यक्तीच्या हाताला हात लागतात. दोन आसंद्यांमध्ये अधिक अंतर ठेवायला हवे, म्हणजे आसंद्यांवर बसलेल्या व्यक्तींना हाताच्या हालचाली सहजतेने करता येतील.’’ त्यांनी आम्हाला आसंद्या व्यवस्थित ठेवायला सांगितल्या आणि नंतर ‘त्यांवर बसून कसे वाटते’, हे पहायला सांगितले.
तेव्हा मला ‘इतरांचा विचार करून आणि सात्त्विकतेच्या दृष्टीने आसंद्या कशा ठेवायच्या’, हे शिकायला मिळाले.
३. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ या सिद्धांतानुसार साधकांच्या सेवांचे नियोजन करणे
वर्ष २००७ – २००८ मध्ये महाराष्ट्र आणि गोवा येथील विविध जिल्ह्यांत हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी एक साधिका रत्नागिरी येथे घरी राहून लिखाणाचे अंतिम संकलन करण्याची सेवा करत होती. तेव्हा रत्नागिरी जिल्ह्यात हिंदु राष्ट्र-जागृती सभा असल्याने तेथील उत्तरदायी साधकाने ‘सभेच्या प्रसारासाठी साधकांची आवश्यकता असल्याने त्या साधिकेला काही कालावधीसाठी प्रसाराच्या सेवेला येऊ दे का ?’, असे विचारले होते. त्या वेळी साधकांच्या सेवेचे नियोजन करण्याची सेवा माझ्याकडे होती. ‘त्या काळात सर्वांत अधिक प्राधान्य हिंदु राष्ट्र-जागृती सभांना होते. संबंधित साधिकेने त्यासाठी द्यावयाचा कालावधीही अल्प असल्याने माझ्या मनात ‘त्या साधिकेने हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराला जावे’, असा विचार आला. तेव्हा परम पूज्यांनी ‘अन्य साधक प्रसार करू शकतात; मात्र संकलन करणारे अल्प आहेत’, असा दृष्टीकोन देऊन ‘साधिकेने सभेच्या प्रसाराच्या सेवेऐवजी संकलनाला प्राधान्य द्यावे’, असे सांगितले.
नंतर गोवा राज्यातही हिंदु राष्ट्र-जागृती सभा असल्याने इंग्रजी ग्रंथांचे चांगले भाषांतर करणार्या एका साधकाविषयी सभेचे नियोजन करणार्या साधकाने मला विचारले होते. मला सहाच दिवसांपूर्वी वरील निर्णय समजल्यामुळे आणि ग्रंथाचे भाषांतर करणारे केवळ ३ जणच असल्याने मी नुकत्याच घडलेल्या प्रसंगाविषयी सभेचे नियोजन करणार्या साधकाला सांगितले आणि ‘एकदा उत्तरदायी साधकांना विचारून कळवतो’, असेही सांगितले. प.पू. डॉक्टरांना याविषयी समजल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘येथे जरी आधीचा दृष्टीकोन योग्य असला, तरीही ते साधक उच्च पदावर कार्यरत आहेत आणि त्यांना येथे ओळखणारेही पुष्कळ असल्याने त्यांनी काही कालावधीसाठी प्रचारासाठी जाणे महत्त्वाचे आहे.’’
या प्रसंगातून ‘कोणताही निर्णय एकांगी न घेता व्यक्तींच्या प्रकृतीनुसार निर्णय घ्यायला हवा. ‘व्यक्ती तेवढ्या प्रकृती तेवढे साधनामार्ग’, हा महत्त्वाचा पैलू मला शिकायला मिळाला.
४. ‘साधकांनी ईश्वरी कार्यासाठी वेळ दिल्यानंतर त्यांना जी सेवा जमते, ती उपलब्ध करून देणे’, ही अन्य साधकांची साधना असणे
वर्ष २००७ ते २०१० या कालावधीत मिरज येथील काही साधक टंकलेखनाची सेवा करत असत. ‘साधकांना सेवा मिळावी’, यासाठी गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले) आत्यंतिक थकवा असतांनाही काही वेळा रात्री वेळ देऊन किंवा वेळप्रसंगी रात्रभर जागून साधकांना सेवा उपलब्ध करून दिली आहे. गुरुदेव नेहमी सांगतात, ‘‘संबंधित साधकांनी ईश्वरी कार्यासाठी वेळ दिला आहे. ‘त्यांना जी सेवा जमते, ती सेवा उपलब्ध करून देणे’, ही आपली साधना आहे.’’
पूर्वी ‘महत्त्वाची सेवा करणार्यांना अधिक प्राधान्य’, असा माझा विचार असे; मात्र या प्रसंगानंतर साधकांच्या सेवांचे नियोजन करतांना ‘साधकांचे कौशल्य, त्यांनी ईश्वरासाठी दिलेला वेळ आणि कोणतीही सेवा लहान किंवा मोठी नसून ती ईशसेवा असल्याने सर्व साधकांना महत्त्व द्यायला हवे’, ही सूत्रे माझ्या मनावर कायमचे ठसली.
५. साधक शिकायला आल्यानंतर त्याचे केवळ सेवेचे नियोजन न करता त्याचे सर्व दृष्टीने नियोजन करणे महत्त्वाचे असणे
वर्ष २००७ -२००८ मध्ये एक साधिका १ आठवडा आश्रमात लिखाणाचे प्राथमिक संकलन करण्याचे शिकण्यासाठी येणार होत्या. ‘घरी राहून सेवा करणारे साधक आश्रमात काही दिवसांसाठी आल्यानंतर त्यांना अल्प कालावधीत अधिकाधिक शिकायला मिळायला हवे’, असा गुरुदेवांचा दृष्टीकोन असतो. त्या साधिका आश्रमात आल्यानंतर ‘त्यांना धारिका उपलब्ध आहेत ना, त्यांना शिकवण्यासाठी साधकाचे नियोजन केले आहे ना ?’, याचा आढावा गुरुदेवांनी घेतला. एकदा गुरुदेव साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी आले. गुरुदेवांनी त्या साधिकेला पाहिले आणि त्या साधिका सेवा करण्याच्या ठिकाणाहून ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी गेल्यानंतर गुरुदेवांनी आम्हाला चूक सांगितली. ते म्हणाले, ‘‘त्या साधिकेला पाठदुखीचा त्रास आहे. त्यांना इतरांसारखी आसंदी न देता वेगळ्या प्रकारची आसंदी द्यायला हवी होती. केवळ साधकांच्या सेवांचे नियोजन पाहून होत नाही. एखादा साधक आपल्याकडे आला आहे, तर त्याचे सर्व प्रकारे (त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना सर्व उपलब्ध आहे का ?) पहावे लागते.’’ गुरुदेवांनी आम्हाला ‘त्या साधिकेच्या प्रकृतीला झेपेल अशी सुविधा (पलंग आणि गादी) साधिकेला दिलेल्या खोलीत आहे ना’, हेही पहायला सांगितले.
एखादा साधक काही कालावधीसाठी आश्रमात आल्यानंतर ‘केवळ त्याच्या सेवांपुरते पहाणे’, असा माझा संकुचित दृष्टीकोन दूर व्हायला साहाय्य झाले. ‘एखादा साधक आश्रमात आल्यानंतर त्याला येथून अधिकाधिक शिकून कसे जाता येईल’, याविषयी गुरुदेवांची तळमळ आणि आत्मियता मला शिकायला मिळाली.
६. ‘फलनिष्पत्ती आणि साधकत्व’ या दृष्टीने कसा विचार करायला हवा’, त्याविषयी शिकवणे
वर्ष २०११ मध्ये परम पूज्यांना संगणकीय धारिका दाखवायला त्यांच्या शेजारी एक साधक बसत होता. तो साधक आश्रमात येऊन काही मास झाले होते. त्याला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होता. परम पूज्यांना धारिका पडताळतांना त्या साधकाला दोन वेळा तरी सांगावे लागायचे, तरीही त्याच्या लक्षात यायचे नाही. परम पूज्यांना पुष्कळ थकवा असे आणि त्यांचा साधकाला पुन:पुन्हा सांगण्यात वेळही जात होता. याविषयी आमच्या लक्षात आल्यानंतर एकदा आम्ही परम पूज्यांना विचारले, ‘‘असे करण्यात तुमचा वेळ पुष्कळ जात असल्याने तुमच्या समवेत सेवा करण्यासाठी दुसर्या साधकाला सांगायचे का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्हाला पुष्कळ सेवा करायची आहे. सर्व चांगले साधक तुमच्याकडे असू देत. माझ्या समवेत बसणार्या साधकांना काही जमले नाही, तर मी सांगीनच.’’
यापूर्वी माझ्या मनात ‘आपल्या समवेत सेवा करणारे साधक चांगल्या क्षमतेचे असल्यास त्याचा एकंदर फलनिष्पत्ती वाढण्याच्या दृष्टीने चांगला लाभ होतो’, असा विचार असे; मात्र या प्रसंगानंतर माझ्या मनात असा विचार आला नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला विविधांगी पैलू शिकायला मिळाले. ‘हे गुरुदेवा, ‘माझ्यामधील स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे मी तुमची शिकवण ग्रहण करायला आणि शिकण्याच्या स्थितीत रहायला अल्प पडतो. तुम्ही मला अखंड शिकण्याच्या स्थितीत ठेवा’, अशी माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. रोहित साळुंके, फोंडा, गोवा. (२८.११.२०२४)