स्वतःच्या जोखमीवर भूमी खरेदी करा ! – बेताळभाटीमध्ये लागले फलक

बेताळभाटी येथील समुद्रकिनारा

बेताळभाटी – बाहेरील विकासक आणि जमीनदार यांच्याकडून होत असलेल्या अतिक्रमणाला विरोध म्हणून बेताळभाटी गावातील नागरिकांनी गावाच्या सीमेवर तीव्र शब्दांत चेतावणी देणारे फलक लावले आहेत. ‘स्वतःच्या जोखमीवर (धोका पत्करून) भूमी खरेदी करा !’, ‘संसाधने संपली आहेत’, ‘वाहनक्षमता ओलांडली आहे’, अशा आशयाचे फलक साळावली, माजोर्डा आणि कोलवा सीमांवर लावण्यात आले आहेत.

विलासी प्रकल्पांमुळे गावात पाण्याचा तुटवडा, अतिरिक्त विजेचा वापर आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने स्थानिक जीवनमान धोक्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामसभेच्या ठरावानंतर हे फलक लावण्यात आल्याची माहिती सरपंच मिनू अँटोनिओ फर्नांडिस यांनी दिली. ‘पंचायतीला मालमत्ता खरेदी-विक्री थांबवण्याचा कायदेशीर अधिकार नाही’, असेही त्यांनी सांगितले.