‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’ चा लेखापरीक्षण अहवाल अद्याप शासनाला सादर नाही !

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ मधील प्रावधानांनुसार चालवण्यात येते. या अधिनियमातील प्रावधानांनुसार प्रतिवर्षी शासन नियुक्त लेखापरीक्षकांकडून लेखापरीक्षण करण्यात येते आणि त्याचा अहवाल शासन, तसेच धर्मादाय आयुक्त यांना सादर करण्यात येतो. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षणाचे कामकाज शासननियुक्त लेखापरीक्षक यांच्या वतीने चालू आहे. लेखापरीक्षणाच्या कालावधीत काही मार्गदर्शक सूचना आणि सुधारणा सूचित केल्या होत्या. त्यांची पूर्तता करण्यात आली आहे. यानंतरही संबंधित लेखापरीक्षक यांच्याकडून अंतिम अहवाल मंदिर समितीस प्राप्त झालेला नाही.

संबंधित लेखापरीक्षक यांच्याकडून लेखापरीक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर, मंदिर समितीच्या सभेत संमतीसाठी ठेवण्यात येईल. यानंतर अधिनियमातील प्रावधानांनुसार धर्मादाय आयुक्त, मुंबई यांचे निर्देश घेऊन आणि त्याचा अनुपालन अहवाल सिद्ध करून शासनास सादर करण्यात येतो. यानंतर तो शासनाच्या वतीने विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.