स्वातंत्र्यानंतर प्रथमच दुर्गम भागात कटेझरी ते गडचिरोली बससेवा चालू !

१० ते १२ गावांना लाभ होणार !

नागपूर – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि माओवादग्रस्त भागातील कटेझरी ते गडचिरोली अशी बससेवा स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांनी प्रथमच चालू करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांमुळे ही सेवा शक्य झाली. या वेळी गावकर्‍यांनी आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवत बसचे स्वागत केले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून ही बससेवा चालू झाली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी बससेवेचे उद्घाटन केले. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. या बससेवेमुळे परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना लाभ होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येण्या-जाण्याची सोय होणार आहे. मागील ५ वर्षांत दुर्गम भागात ४३४.५३ किलोमीटर लांबीचे १८ रस्ते आणि ५९ पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करण्यात आले आहे.