परशुरामांच्या कृत्याला एक सूडाचा प्रवास म्हणणे, हे अविवेकाचे लक्षण !

आज ‘परशुराम जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

प.पू. स्वामी वरदानंद भारती

सत्ता-संपत्तीने उन्मत्त झालेल्या क्षत्रिय राज्यकर्त्यांनी शांत-तपस्वी अशा विद्याव्यासंगी ब्राह्मणांवरही अनन्वित अत्याचार केले. त्यांच्या पारिपत्यासाठी भगवान विष्णूने जमदग्नीच्या पोटी परशुराम रूपाने अवतार घेतला. उन्मत्तांचा संहार केला. ही कथा प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने या परशुराम कथेचे अलीकडे फार विकृतीकरण झाले आहे. कुणी त्याला ‘ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय’ अशा जातीयवादाचे रूप दिले, तर कुणी परशुरामाच्या कृत्यांचे, राक्षसी वृत्तीने घेतलेला ‘आंधळा अविवेकी सूड’ असे मूल्यमापन केले. या दोन्ही प्रकारचे वर्णन ही विकृती आणि अतिशयोक्ती आहे. परशुरामाचा पराक्रम वर्णन करण्याच्या मागे ब्राह्मणांचा विशेषतः भृगुवंशियांचा जातीय अहंकार असता, तर पुढे क्षत्रिय रामाने ब्राह्मण परशुरामाचा पराभव केल्याचे वर्णन परंपरेत सन्मान पावले नसते, ब्राह्मण कवींनीही रसाळपणे गायिले नसते. संतकवी श्रीतुलसीदासांनी ‘रामचरित मानस’मध्ये हा प्रसंग फार रसाळपणे वर्णन केलेला आहे. असे असतांना परशुरामाच्या कृत्याला एक सूडाचा प्रवास म्हणावे, हे अविवेकाचे आहे. राष्ट्रीय पातळीवर सोशिकपणा हा दुर्गुण आहे. अन्यायाचा प्रतिकार आपल्या सर्व शक्तीनिशी उग्रपणाने केला पाहिजे. त्या दृष्टीने ‘आक्रमण हेच खरे संरक्षण आहे’, असे ज्यांचे मत आहे, त्या संपादकांनीही परशुरामाविषयीच्या या विकृत दृष्टीकोनाला प्रसिद्धी द्यावी, हे न समजणारे आहे. भाविकांनी पुराणकथेतील इतिहास विकृत केला, असे म्हणणार्‍या बुद्धीवंतांनी प्राचीन घटनांच्या अन् व्यक्तींच्या घातक विकृती करण्याचा खरे म्हणजे खरपूस समाचार घ्यावयास हवा होता; पण तसे झाले नाही. परंपरेने मान्य असलेल्या प्राचीन मूल्यांवर तर्क आणि न्याय गुंडाळून आघात करणे, हेच जणू बुद्धीमत्तेचे अन् प्रगत विचारांचे गमक ठरले आहे. घरामध्ये ढेकूण आणि पिसावा फार झाल्या असल्या, तर त्यांचा नाश करण्यासाठी तीक्ष्ण औषधे फवारावीत; पण घरच पेटवून देणे शहाणपणाचे नाही, ही गोष्ट प्रगतीपर विचारांचे आधुनिक बुद्धीवंत लक्षात घेतील तर बरे. समर्थांसारख्या राष्ट्रीय विचाराने भरलेल्या, समाजकल्याणाची तळमळ असलेल्या, निःस्पृह महापुरुषाला सतत शस्त्र उगारून उभा असलेला परशुराम आदरणीय वाटतो आणि देव भक्ताची उपेक्षा करत नाही. या संदर्भात उल्लेखनीय वाटतो, हे फार महत्त्वाचे आहे. स्वच्छ मनाने आपण ते समजून घेतले पाहिजे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ‘मनोबोध’ ग्रंथ)