‘साधना, सेवा आणि प.पू. डॉक्टर’, हेच बोलण्याचे विषय असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या बिंबल (वाळपई, गोवा) येथील कै. (श्रीमती) अर्चना मराठे (वय ६३ वर्षे) !

बिंबल, वाळपई येथील साधिका श्रीमती अर्चना पुरुषोत्तम मराठे यांचे १.१२.२०२४ (कार्तिक अमावास्या) या दिवशी निधन झाले. गोव्यातील सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन संस्थेच्या गोव्यातील प्रसारकार्यात तळमळीने आणि पुढाकार घेऊन सेवा करणार्‍या अन् साधकांवर मातृवत् प्रीती करणार्‍या श्रीमती अर्चना मराठे यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे. 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले    

श्रीमती अर्चना मराठे

१. श्री. तुळशीदास गांजेकर, साखळी 

१ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अभ्यासवर्गांमुळे साधनेला आरंभ करणे : ‘वर्ष १९९० ते २००० या काळात गोव्यातील सत्तरी तालुक्यात सनातन संस्थेच्या प्रसारकार्याला प्रारंभ झाला. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे साधनेविषयीचे अभ्यासवर्ग आयोजित केले जात असत. या अभ्यासवर्गांना अर्चनावहिनी नेहमी उपस्थित रहायच्या. या अभ्यासवर्गांमधूनच त्यांना साधनेसाठी मार्गदर्शन मिळाले.

१ आ. स्वतःचा शिक्षकी पेशा सांभाळून सनातनच्या अध्यात्म प्रसारकार्यात झोकून देऊन सेवा करणार्‍या श्रीमती अर्चना मराठे ! : त्या वेळी सत्तरीसारख्या दुर्गम भागात जाण्यासाठी वाहनसुविधा नव्हती आणि सनातन संस्थेचे प्रसारकार्य गावोगावी जोराने चालू झाले होते. तेव्हा अन्य साधकांसह मराठेवहिनी पती पुरुषोत्तम मराठे यांच्यासह उत्साहाने सहभागी व्हायच्या. त्यांचे बिंबल येथील घर, हेच सर्वांचे विश्रांतीस्थान असायचे. घरी आलेल्या साधकांची त्या आईच्या मायेने विचारपूस करायच्या आणि काळजी घ्यायच्या. ‘गावात प्रवचनांचे नियोजन करणे, सर्वांना निमंत्रणे देणे, नंतर सत्संगाचे नियोजन, सत्संग घेणे’ आदी सर्व सेवांत त्या हिरीरीने सहभागी व्हायच्या. ‘प.पू. डॉक्टर आणि अध्यात्मप्रसार’ यांविना त्यांना अन्य काहीच सुचायचे नाही. हे सर्व त्या त्यांचा शिक्षकी पेशा सांभाळून करायच्या.

१ इ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव असल्याने त्यांचे कार्य ‘घराघरांत पोचावे’, या तळमळीने प्रसारसेवा करणे : श्रीमती अर्चना मराठे यांच्या मनात प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ श्रद्धा आणि भाव होता. ‘गुरुदेवांचे कार्य घराघरांत आणि गावागावांत पोचले पाहिजे’, असा विचार त्यांच्या मनात असायचा. यासाठी त्या सतत कार्यरत असायच्या. कितीही कष्ट पडले, तरी सतत आनंदी आणि हसतमुख राहून त्यांनी प्रसारसेवा केली.

१ ई. साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचे वितरण अन् वर्गणीदार करणे, या सेवा उत्साहाने करणे : वर्ष १९९८ मध्ये साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकाचा आरंभ झाल्यावर मराठेवहिनींनी त्याचे वर्गणीदार करण्यासाठी जोरात प्रयत्न केले. शाळा, मंडई, बसस्थानक, विविध उत्सव, विवाह सोहळे इत्यादी ठिकाणी जाऊन त्या अपरिचित व्यक्तींनाही साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व आणि उद्देश सांगून वार्षिक वर्गणीदार करायच्या. त्यातून जिज्ञासू सहज वर्गणीदार व्हायचे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. विविध वाचनालयांना संपर्क करून ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, गर्दीच्या ठिकाणी दैनिकाचे वितरण करणे आदी सेवा त्या उत्साहाने आणि हसतमुखाने करायच्या.

१ उ. सनातन संस्थेचा आश्रम आणि साधक यांच्याप्रती भाव : रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेचा आश्रम म्हणजे त्यांना आपले माहेरच वाटायचे. ‘आश्रमातील सर्व साधक हे स्वतःचे कुटुंबीय आहेत’, असा त्यांचा भाव असायचा. ‘त्यांच्या बागायत शेतीतील उपलब्ध फळे, फुले, भाजी इत्यादी सर्व आश्रमात नेऊन द्यायला पाहिजे’, अशी त्यांना तळमळ असायची.

१ ऊ. मराठेवहिनी अगदी सहजतेने कविता करायच्या. आतापर्यंत त्यांनी किमान १०० कवितांचे लेखन केले असावे. 

‘प्रेमभाव, तळमळ, सेवेचा ध्यास, मनमिळावू वृत्ती, सेवेतील उत्साह’ इत्यादी अनेक गुण त्यांच्याकडून घेण्यासारखे होते.’

२. श्री. विष्णु पर्येकर, वाळपई

२ अ. साधकांमध्ये गुरुरूप पहाणे : ‘सर्व साधकांना अर्चनावहिनींचा पुष्कळ आधार होता. ‘सर्व साधक गुरूंचेच रूप आहेत’, या भावाने त्या साधकांकडे पहायच्या. त्यांनी कधीही अन्य साधकांना दुखावले नाही. ‘साधकांची साधना चांगली व्हावी’, असे त्यांना वाटत असे. अर्चनावहिनी म्हणजे प्रीतीचा झरा होत्या. त्यांना गुरुसेवेची पुष्कळ तळमळ होती.’

३. श्री. भालचंद्र भाटिकर, वाळपई

३ अ. ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्याचे कौशल्य : ‘अर्चनावहिनी पंचांग वितरणासारखी प्रासंगिक सेवा करतांना ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार कोण होऊ शकतात ?’, याचा अभ्यास करायच्या. समाजातील एखाद्या व्यक्तीला त्या अगदी सहजतेने वर्गणीदार करायच्या. त्यांचा हा गुण मला शिकायला मिळाला.’

४. श्री. आनंद गावकर, वाळपई

४ अ. साधकांना आईसमान प्रेम देणे : ‘अर्चना मराठे यांच्या मनात गुरुदेव आणि साधक यांच्याबद्दल पुष्कळ भाव होता. त्यांचे साधकांवर पुष्कळ प्रेम होते. एखाद्या सेवेला जातांना त्या सहसाधकांसाठी खाऊ घेऊन जायच्या. साधकांना त्या आईसमान वाटायच्या.’

५. सौ. साधना जोशी, वाळपई

५ अ. गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेमुळे दुर्धर आजारपणाला तोंड देणे : आजारपणातही त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी होती. प.पू. डॉक्टरांवर त्यांची दृढ श्रद्धा होती. तीच त्यांच्या दुर्धर आजाराचे औषध बनली. संतांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी विविध आध्यात्मिक उपाय करून स्वतःच्या आजारपणाला तोंड दिले.

५ आ. साधकांना सेवेत साहाय्य करणे : ‘साधकांना साधनेत प्रोत्साहन देणे, साहाय्य करणे, सेवेत नवीन कल्पना सुचवणे, विविध विषयांवर काव्य करणे, लेख लिहिणे’, अशा सेवा त्या सहजतेने करायच्या. त्या एखाद्या रोगावर आयुर्वेदिय औषध बनवून साधकांना द्यायच्या. अशा मातृतुल्य मराठेवहिनींना नमस्कार !’

६. सौ. गीता तुळशीदास गांजेकर, साखळी

६ अ. आजारपणात साधक भेटायला गेल्यावर मराठेवहिनींचा भाव जागृत होणे : ‘अर्चनावहिनी रुग्णाईत असतांना आम्ही काही साधक त्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी त्यांचा भाव जागृत होऊन त्यांचे डोळे भरून आले होते. ‘माझे काही चुकले असल्यास मला क्षमा करावी’, असे त्या आम्हाला म्हणाल्या. ‘निरपेक्ष प्रेमाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आम्हा सर्व साधकांच्या अर्चनावहिनी होय.’

७. सौ. राधा मराठे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७१ वर्षे), वाळपई 

७ अ. ‘साधना, सेवा आणि प.पू. डॉक्टर’, हेच बोलण्याचे विषय असलेल्या मराठेवहिनी ! : श्रीमती अर्चना मराठेवहिनी यांच्याजवळ सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने नेहमी असायची. एखादी व्यक्ती भेटली की, त्या त्यांना ग्रंथ आणि उत्पादने आग्रहाने द्यायच्या. ‘साधना, सेवा आणि प.पू. डॉक्टर’, हेच त्यांच्या बोलण्याचे विषय असायचे.

७ आ. ‘देहावसान झाल्यानंतर मराठेवहिनी यांच्या चेहर्‍यावर तेज दिसत होते.’

(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.१२.२०२४)