Pakistani YouTube Channels Banned : पाकच्या १७ यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी

डॉन न्यूज, जियो न्यूज या वृत्तवाहिन्या, तसेच क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या वाहिन्यांचा समावेश

नवी देहली – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकच्या १७ यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी घातली आहे. यात जियो न्यूज, डॉन न्यूज, समा टीव्ही या प्रसिद्ध वाहिन्यांसह प्रसिद्ध महिला पत्रकार आरजू कासमी, तसेच माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या वाहिनीचा समावेश आहे. या वाहिन्यांवरून भारत आणि सुरक्षा यंत्रणा यांच्या विरोधात खोट्या अन् दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात बैठक

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ यांच्यात २८ एप्रिल या दिवशी ४० मिनिटे बैठक पार पाडली. राजनाथ सिंह पंतप्रधान मोदी यांच्या घरी यासाठी पोचले होते. या बैठकीत काय चर्चा झाली, हे समजू शकलेले नाही. २७ एप्रिलच्या रात्रीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४५ मिनिटे बैठक झाली. या बैठकीपूर्वी तिन्ही सैन्याचे प्रमुख अनिल चौहान यांनी राजनाथ सिंह यांच्याशी बैठक केली होती. सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांनीही  गृहमंत्रालयात जाऊन गृह सचिवांशी चर्चा केली होती.

पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्याच्या चौक्यांवर गोळीबार केला. याला भारतीय सैन्यानेही  प्रत्युत्तर दिले.

५ लाख पाकिस्तानी मुली भारतात बेकायदेशीरपणे रहातात ! – भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचा दावा

भाजपचे खासदार निशिकांत दुबे

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत दावा केला आहे की, पाकिस्तानी आतंकवादाचा एक नवीन चेहरा आता समोर आला आहे. विवाहानंतर ५ लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली भारतात रहात आहेत. त्यांना आजपर्यंत भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. आत घुसलेल्या या शत्रूंशी कसे लढायचे ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पहलगाम येथील आक्रमणाची चीन आणि रशिया यांनी चौकशी करावी ! – पाकची मागणी

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

पहलगाम आक्रमणाच्या चौकशीत चीन आणि रशिया यांनाही समाविष्ट करावे, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी रशियातील प्रसारमाध्यम ‘रिया नोवोस्ती’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारताचे पंतप्रधान मोदी खरे बोलत आहेत कि खोटे बोलत आहेत ? याची आंतरराष्ट्रीय पथकाने चौकशी करावी.

आम्ही शांत बसणार नाही ! – असदुद्दीन ओवैसी यांची पाकला चेतावणी

‘एम्.आय.एम्.’चे खासदार असदुद्दीन ओवैसी

पाकिस्तान स्वतःला अण्वस्त्रसज्ज देश म्हणतो. त्याचे नेते भारताला अणूयुद्धाची धमकी देत आहेत; पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, जर त्यांनी कोणत्याही देशात घुसून निष्पाप लोकांना मारले, तर कुणीही शांत बसणार नाही. तुम्हाला उत्तर मिळेल, असे प्रत्युत्तर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकला दिले आहे. धर्म विचारल्यानंतर गोळीबार करणे योग्य नाही, तुम्ही तेच केले आहे जे इस्लामिक स्टेट करते, अशी टीकाही त्यांनी केली.

भारत न सोडणार्‍या पाकिस्तान्यांना होऊ शकतो ३ वर्षांचा कारावास

भारताने भारतात व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहे. जर पाकिस्तानी नागरिकांनी या दिनांकापर्यंत भारत सोडला नाही, तर त्यांना ३ वर्षांचा कारावास किंवा ३ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.