छत्रपती संभाजीनगर येथे ‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तकाचे प्रकाशन !

छत्रपती संभाजीनगर, २७ एप्रिल (वार्ता.) – कार्य चांगले असेल की, शत्रू निर्माण होतात. १०० अपराधी सुटले, तर चालतील; पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा व्हायला नको, असे न्यायवचन असताना हिंदुत्वाचे कार्य करणार्या विक्रम भावे यांच्या विरोधात खोटे पुरावे देऊन त्यांना या प्रकरणात गोवण्याचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे षड्यंत्र दिसून येते. भावे यांच्यावरील कारवाई पूर्वग्रहदूषितपणाने करण्यात आली असून आम्ही अशा निरपराध युवकांच्या पाठीशी सदैव उभे राहू, असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल’चे माजी अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुख यांनी केले. ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येथे २६ एप्रिल या दिवशी पार पडला. त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या सोहळ्याला ‘एनालायझर न्यूज’चे संस्थापक आणि प्रमुख श्री. सुशील कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ संघटक श्री. सुनील घनवट, ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे आदी मान्यवरांसह ३०० हून अधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
व्यवस्थेला प्रश्नच विचारायचे नाहीत का ? – सुशील कुलकर्णी

हिंदु धर्माने आपल्याला नीटच वागायला शिकवले आहे. आमचा धर्म गुन्हा करायला शिकवत नाही. या पुस्तकात भावे यांनी मांडलेल्या वेदना सृजनरूपी वेदना आहेत. त्यातून पुढे नवीन काहीतरी जन्माला येईल. पत्रकार ही घाणेरडी शिवी आहे. कारण आजकाल न्यायालये दाव्यांमुळे नाही, तर पत्रकारांमुळे चालत आहेत. आज चांगला असलेला माणूस दुसर्याच दिवशी आतंकवादी किंवा हिरो होतो. ‘हिंदु हित की बात करेगा वही देश पर राज करेगा !’, असे आपण म्हणतो; मात्र आज ‘हिंदु हित की बात करेगा वही जेल जायेगा !’ अशी परिस्थिती आहे. प्रश्न विचारले तर ही स्थिती होते. तर मग व्यवस्थेला प्रश्नच विचारायचे नाहीत का ?

या प्रसंगी लेखक श्री. विक्रम भावे यांनी अधिवक्ता श्री. भरत देशमुख यांचा, ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियाना’चे प्रमुख श्री. कमलेश कटारिया यांनी श्री. सुशील कुलकर्णी यांचा, संत श्री काशी विश्वनाथ देवस्थान दत्त मंदिराचे विश्वस्त श्री. श्रीपाद देव यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गंगापूर तालुका अध्यक्ष श्री. आकाश शहाणे यांनी श्री. सुनील घनवट आणि लेखक श्री. विक्रम भावे यांचा सत्कार केला.
हिंदुत्वाचे कार्य करणे हा गुन्हा आहे का ? – विक्रम भावे, पुस्तकाचे लेखक

२५ मे २०१९ या दिवशी या पुस्तकाचा जन्म झाला. कारण याच दिवशी सीबीआयने मला अटक केली. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात साक्ष देण्यास नकार दिल्यामुळे मला या प्रकरणात गोवण्यात आले आणि खोटे पुरावे देण्यात आले. कुठलेतरी दोन भ्रमणभाष क्रमांक सीबीआयने विक्रम भावे यांच्या वापरात असल्याचे म्हटले होते आणि ते दोन क्रमांक घटनास्थळी ‘रोमिंग’ झाले होते, असा दावा ‘सिडीआर ॲनालिसीस’च्या आधारे सीबीआय करत होती. ते दोन्ही भ्रमणभाष क्रमांक माझे असल्याचा एकही पुरावा शेवटपर्यंत न्यायालयासमोर का आला नाही ? कथित ‘सीडीआर ॲनालिसीस’विषयी न्यायालयात प्रश्न उपस्थित केला असता, ‘तसा कुठलाही सीडीआर माझ्या हातात आलेला नाही. केवळ तोंडी माहितीच्या आधारे मी हे बोलत होतो.’ केवळ तोंडी माहितीच्या आधारे न्यायालयात खोटी माहिती देण्याविषयी न्यायालयालाही कधी उलट प्रश्न विचारावेसे वाटले नाही. मी जे काही भोगल ते केवळ एक हिंदुत्वाचे कार्य करतो म्हणून. मला येथे असा प्रश्न पडतो, हिंदुबहुल देशात हिंदुत्वाचे कार्य करणे हा गुन्हा आहे का ?
भावे यांनी लिहिलेले पुस्तक हे ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

आम्ही असे ठरवले होते की, निरपराध किंवा अपराधी – कोणताही हिंदुत्वनिष्ठ असो, त्याला आम्ही निश्चित साहाय्य करणार. विक्रम भावे यांना अटक झाल्यानंतर यंत्रणेच्या काही अधिकार्यांनी त्यांना अन् त्यांच्या कुटुंबियांना दिलेली वागणूक यंत्रणेला लाजवेल अशी आहे. देशात जातीय राजकारण होतांना दिसत आहे. जातीजातींत फूट पाडून हिंदूंचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. भावे यांनी लिहिलेल्या पुस्तकाला अन्य देशांत पुरस्कार मिळाला असता; परंतु आपल्या देशात कारागृहवास भोगावा लागतो. निश्चितच येणार्या काळात त्यांचे हे पुस्तक एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल !
‘मी विक्रम भावे’ या भावनेने हे पुस्तक घरोघरी पोचवा ! – सुनील घनवट

आपण ५ मिनिटे भ्रमणभाषविना राहू शकत नाही; मात्र ऐन तारुण्यात २ वर्षे कारागृहात जावे लागणार्या भावे यांचा काय अपराध आहे ? आज निर्दोष सुटल्यानंतर त्यांच्या वाया गेलेल्या आयुष्याचे क्षण, या काळात त्यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत, त्यांच्या पश्चात्त वडिलांचे झालेले निधन याला उत्तरदायी कोण ? या काळात झालेल्या हानीची भरपाई कोण करून देणार ? ज्या अधिकार्यांनी खोटे पुरावे सादर करून त्यांना अटक केली, अशा मुजोर अधिकार्यांना न्यायिक व्यवस्थेने फासावर चढवण्याची यंत्रणा असायला हवी. आपण सर्वांनी हे पुस्तक वाचा, हा एक विचार आहे. तसेच ‘मी विक्रम भावे’ या भावाने हे पुस्तक घरोघरी पोचवा, असे मी आवाहन करतो. ‘हिंदु आतंकवाद’ नावाच्या बागुलबुवाला फसलेल्या निरपराध तरुणांचे प्रातिनिधिक आत्मचरित्र म्हणजे हे पुस्तक आहे.