गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण थांबवायचे असेल, तर मराठी राजभाषा झालीच पाहिजे ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

प्रा. सुभाष वेलिंगकर

मांद्रे – मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती राष्ट्रीयतेचे प्रतीक आहे. गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण थांबवायचे असेल, तर मराठी राजभाषा झालीच पाहिजे. तरुणांची फळी निर्माण करून मराठीचा हा लढा आपल्याला अधिकाधिक तीव्र करून राजभाषेचा मुकुट मराठी भाषेच्या मस्तकावर चढवायचा आहे, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्रा सुभाष वेलिंगकर यांनी केले.

मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मांद्रे विभागाच्या वतीने २६ एप्रिल या दिवशी मराठी कार्यकर्त्यांचा मेळावा देऊळवाडा, मांद्रे येथील जिल्हा पंचायतीच्या सभागृहात पार पडला. या वेळी ते बोलत होते. व्यासपिठावर श्री. गो.रा. ढवळीकर, मांद्रे विभागाचे समन्वयक प्रा. गजानन मांद्रेकर, श्री. उल्हास कोरगावकर, श्री. परेश नाईक आदी उपस्थित होते. प्रा. वेलिंगकर पुढे म्हणाले, ‘‘मराठी राजभाषा व्हायची असेल, तर हा लढा यशस्वी करावा लागणार आणि त्यासाठी मराठी भाषाप्रेमींच्या शक्तीचे रूपांतर मराठीप्रेमींच्या एकगठ्ठा मतांमध्ये करणे आवश्यक आहे. मराठीप्रेमींच्या संघटित शक्तीचे विराट दर्शन घडवण्याची वेळ आली आहे.’’

श्री. गो.रा. ढवळीकर म्हणाले, ‘‘मराठी भाषेचा स्वाभिमान बाळगणार्‍या पेडणे तालुक्यातून चालू झालेला हा मराठी राजभाषा निर्धार समितीचा वणवा राज्यभर पसरल्यानंतर राज्यकर्त्यांना त्याची नोंद घ्यावीच लागेल. मराठी राजभाषा हा खर्‍या अर्थाने आपल्या मराठी भाषेचा अधिकार आहे.’’

प्रारंभी मांद्रे येथील श्री देवी भगवती स्थापेश्वर पंचायतन देवस्थानात देवतांना साकडे घालून मराठीप्रेमींनी शपथ घेत मराठी भाषेला राजभाषा करण्याचा निर्धार केला. मेळाव्याला उपस्थित मराठीप्रेमींनी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला. या निर्धार मेळाव्यात ग्रामसमिती, तसेच मांद्रे विभाग समन्वयक निवडण्यात आले.