पंतप्रधान मोदी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा निश्चित बदला घेतील ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पणजी – काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा बदला घेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतीही तडजोड करणार नाहीत. गोवा पोलिसांनी गोव्यात अनधिकृतपणे रहाणार्‍यांवर कारवाई चालू केली असून अल्पकालीन व्हिसा असलेले ३ पाकिस्तानी नागरिक गोवा सोडून गेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. ताळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार सिद्धार्थ कुंकळकर आणि भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत

देशातील शांती आणि विकास यांसाठी मोदी सरकार कटीबद्ध आहे. पहलगाम आक्रमणानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापाची नोंद घेत पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ घंट्यांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘मोदी सरकार आतंकवादी आणि त्यांचे समर्थक यांना कठोर उत्तर देईल’, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मेळाव्याच्या वेळी झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


आगामी २ वर्षांत १० ते १२ सहस्र शासकीय नोकर्‍या

आगामी २ वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभाग, गोवा लोकसेवा आयोग आणि अन्य खाती यांमध्ये मिळून १० ते १२ सहस्र नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. यातील सुमारे ४ सहस्र नोकर्‍या गोवा मानव संसाधन महामंडळाद्वारे भरण्यात येणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार युवकांच्या भविष्याची काळजी घेत असून विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम अन् उपक्रम चालू करण्यात आले आहेत. उच्चशिक्षित युवकांप्रमाणेच दहावी आणि बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही सरकारने विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम चालू केले आहेत. उमेदवारी योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत १४ सहस्र युवकांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे ते म्हणाले.