सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे ! – आमदार गोपीचंद पडळकर

आमदार गोपीचंद पडळकर

सांगली, २७ एप्रिल (वार्ता.) – हिंदु मुसलमान ‘भाई-भाई’, असे म्हटले जाते; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून केवळ हिंदू लोकांवर गोळ्या का घातल्या गेल्या ? सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून हिंदूंनी आधी बाहेर पडायला हवे, असे रोखठोक प्रतिपादन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे केले. सर्वधर्मसमभाव पाळण्याचे दायित्व केवळ हिंदूंचे आहे का ? हे केवळ हिंदूंसाठीच लागू होत नाही, असा प्रश्नही त्यांनी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाविषयी उपस्थित केला, तसेच ‘सांगली जिल्ह्यातील मोगलांच्या खुणा असलेल्या काही गावांची नावे पालटण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील खानापूर शहरातील महादेव मंदिरातील विटंबना झालेल्या नंदीच्या मूर्तीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदु समाजाकडून २६ एप्रिल या दिवशी महादेव मंदिरात आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते आरती पार पडली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले की, पूर्वीच्या लोकांनी षड्यंत्र केले. हिंदी-चिनी भाई भाई, हिंदु-मुस्लिम भाई भाई. मग भाई-भाई असतांना काश्मीर येथे हा प्रकार का घडला ? काही लोकांनी कलमा पढल्यानंतरही त्यांचे कपडे उतरवून बघितले. त्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या, हा काय प्रकार आहे ? काश्मीरमधील पंडितांना कुणी घालवले ? तिथे काय पाकिस्तानचे मुसलमान आले होते का ? त्यांच्या गल्लीत रहाणार्‍या लोकांनीच त्यांना घालवले. तिथे कुणी पाकिस्तानी माणूस आला नव्हता.

खानापूर येथील महादेव मंदिरातील विटंबना कृत्यामागे जो कुणी आहे, त्याला पोलीस अटक करून शिक्षा होईल. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहे की, खानापूर शहराचे नाव ‘भवानीपूर’ करावे. ‘सुलतानगादे’ या गावाचे नावही पालटावे. जत तालुक्यातील उमदी गावाचे नावही पालटावे. मोगलांच्या खुणा जिथे असतील, त्या पुसण्याच्या दृष्टीकोनातून जी काही पूर्वीचे नावे आहेत, ती देण्यात यावीत, अशी मागणी मी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व गोष्टींचा विचार करून नक्की निर्णय घेतील.

संपादकीय भूमिका

सर्वधर्मसमभाव पाळण्याचे दायित्व केवळ हिंदूंचे आहे का ?