देशाला अंतर्गत कलह हा मोठा धोका ! – सुहास कुलकर्णी, निवृत्त लष्करी अधिकारी

नागपूर – भारताच्या सार्वभौमत्वाला ३ पटींहून अधिक धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि चीन या शत्रूदेशांप्रमाणेच देशातील अंतर्गत कलह धोकादायक आहे. सीमा संरक्षणाचे दायित्व केंद्र सरकार पार पाडत आहे; मात्र उत्तरदायी नागरिक म्हणून प्रत्येकाचे काही कर्तव्य आहे, असे प्रतिपादन निवृत्त सैन्य अधिकारी आणि ज्येष्ठ संरक्षण तज्ञ ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी यांनी येथे केले. श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात पहलगाम येथील मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

सुहास कुलकर्णी यांनी नागपूर आतंकवादी आक्रमणाची आठवण करून देत सांगितले की, समाजात संघटित रहाण्यासह परिसरातील घडामोडींकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. काश्मीर किंवा नागपूर येथील हिंसाचार आकस्मिक नसतो. तो नियोजनबद्ध असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क रहावे. कार्यक्रमाच्या प्रारंभी पहलगाम येथे मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. मंदिराचे कार्याध्यक्ष श्री. अविनाश संगवई यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. मंदिराचे अध्यक्ष श्री. अशोक गुजरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह श्री. उमेश अनिखिंडी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पहलगाम आक्रमणाचा सूड भारत घेणार ! – कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

पहलगाम येथील बैसरन खोर्‍यात पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाचा सूड भारत घेणार आहे, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी एका दैनिकाशी बोलतांना केले. ते म्हणाले की, पहलगाम हे जम्मू-श्रीनगर महामार्गापासून अनंतनागच्या पूर्वेला ३० किलोमीटर अंतरावर आहे. या भागात ६ कुरण क्षेत्रे आहेत. आक्रमणाचे स्वरूप, वेळ आणि ठिकाण सरकार ठरवील. सैन्याकडे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. कारवाईपूर्वी महाशक्ती, ओआयसी, इराण आणि अरब देशांच्या प्रतिक्रिया आणि प्रवासी भारतियांवरील परिणामांचा विचार केला जाईल. घटनेच्या वेळी अमरनाथ यात्रेची नोंदणी चालू होणार होती; मात्र या भागात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस बळ नव्हते. आतंकवाद्यांना स्थानिकांकडून साहाय्य मिळाल्याची शक्यता आहे. या आक्रमणात १ नौसेनाधिकारी आणि ८ गुप्तचर विभागाचे अधिकारी हुतात्मा झाले. हे आक्रमण स्पष्टपणे इस्लामी जिहादाचा भाग आहे. त्यांच्या मते आता सद्भावना आणि मानवाधिकार यांचा विचार बाजूला ठेवून कठोर कारवाई आवश्यक आहे. पाकिस्तानी सैन्य आणि लष्कर-ए-तोयबा यांचा समूळ नाश करणे, हे सैन्याचे उद्दिष्ट असेल.