आळंदी नगर परिषदेचा वारकर्यांकडून जाहीर निषेध, दिंडीसह हरिनामाचा गजर !
आळंदी (जिल्हा पुणे) – तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीच्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाची जी तोडफोड चालू आहे, ती तात्काळ थांबवावी. तसेच नदीचे घाट पूर्ववत् करून द्यावेत, या मागणीसाठी हरिनाम गजरात पुणे येथे वारकरी भाविकांनी आंदोलन केले. (असे आंदोलन का करावे लागते ? – संपादक) ‘यापुढील काळात या मागणीसाठी अधिक तीव्र आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली. या प्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सदगुरु बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा, संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा पालखी सोहळ्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे, ह.भ.प. महेश महाराज नलावडे आणि आळंदीचे ह.भ.प. संतोष महाराज सांगळे आदींसह महाराष्ट्रातून आलेले वारकरी उपस्थित होते.
काय आहे प्रकरण ?
१. ‘माईर्स एम्आयटी शिक्षण संस्था समूह’, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवर कोट्यवधी रुपये खर्च करून लोकवर्गणीतून घाट विकसित करण्यात आले आहेत. या माध्यमातून सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून दगडी घाट बांधण्यात आले आहेत. तसेच दर्शनबारी, गोमुखाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याचे व्यवस्थापन, ‘तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थ क्षेत्रा’कडे हा वारकरी आणि समाजातील लोकांसाठी अभिनव उपक्रम चालू आहे.
२. सद्य:स्थितीत येथे सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी नलिका टाकण्याचे जे काम चालू आहे. त्यामुळे दगडी घाटाची जी तोडफोड चालू आहे, त्यामुळे घाटाचे विद्रूपीकरण होत आहे. हे तात्काळ थांबवण्याची मागणी करत समस्त वारकर्यांनी शांततामय मार्गाने भजन, हरिनाम गजर करत आळंदी नगर परिषदेचा निषेध केला.
संपादकीय भूमिकातीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या नावाखाली घाटांचे सौंदर्य आणि शिस्तबद्धतेने उभारलेली रचना उदध्वस्त करणे, हे पर्यावरण आणि सांस्कृतिक दृष्टीने गंभीर आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. |