
१. ‘पूर्वग्रह’ हा स्वभावदोष वेळीच दूर न केल्यास त्याने मनुष्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणे
‘पूर्वग्रह’ हा स्वभावदोष तरुणांच्या तुलनेत वयस्कर व्यक्तींमध्ये अधिक आढळतो. याचे एक कारण असेही असू शकते की, आयुष्यभर झालेल्या घटनांतील स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांच्या संस्कारांचे ओझे घेऊन वयस्कर माणसे त्यांचे जीवन जगत असतात. विवाहित, वयस्कर, सांसारिक स्त्रिया यांच्यामध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. स्त्रिया जशा काही गोष्टी मनमोकळेपणाने बोलतात, तसेच त्यांच्या मनातही त्या काही गोष्टी साठवूनही ठेवतात. बोलण्याने पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे एकमेकांशी पटणे कधी कधी कठीण होऊन जाते. पुरुष मनातील फारसे बोलून दाखवत नाहीत. त्यांची अशाही प्रकारे घुसमट होते. एकूणच काय ‘पूर्वग्रह’ हा स्वभावदोष वेळीच दूर केला नाही, तर तो मनुष्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. पूर्वग्रह या स्वभावदोषामुळे जीवनात अनेक अपसमजांना सामोरे जावे लागते.
पूर्वग्रह या स्वभावदोषाच्या समवेत स्वतःमध्ये असणारे इतरही स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांच्यावर ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ राबवून मात करता येते.
२. ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषावर मात करण्यासाठी करायचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील प्रयत्न
२ अ. शारीरिक स्तर : साधना करतांना आपल्या समवेत अनेक प्रसंग घडत असतात. सेवेमध्ये सहसाधकांच्या समवेत, आपल्या नातलगांच्या समवेत असे अनुभव येतात. प्रत्येक साधक साधना करून स्वभावदोष आणि अहंचे पैलू दूर करण्यासाठी धडपड करत असतो. साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
१. साधकांच्या समवेत सेवा करतांना, एखादा साधक चुकून काही बोलला; म्हणून त्याच्या समवेत सेवा करणार्या साधकांनी लगेच त्याचे बोलणे मनाला लावून न घेता, प्रसंगाला साधनेच्या दृष्टीने पहाण्याचा प्रयत्न करावा. इतरांना दोष देत न बसता, झालेली चूक स्वीकारून पुन्हा उत्साहाने सेवा करणारा देवाला आवडतो.
२. पूर्वग्रह विसरून सहज वागणे, हे आरंभी एकदम कुणास जमत नसेल, तर त्याने इतर कुणाचे तरी साहाय्य घेऊन प्रयत्न करावेत.
३. घडलेल्या प्रसंगांविषयी एकमेकांशी मनमोकळेपणाने लगेच बोलून घ्यावे. येथे नम्रतेने आणि समजूतदारपणे बोलणे अधिक महत्त्वाचे आहे.
साधनेतील एक मोठा अडथळा – पूर्वग्रह
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या साधनाविषयक मार्गदर्शनामध्ये एका स्त्रीविषयीचा प्रसंग सांगितला आहे. त्या स्त्रीला तिच्या सासूबाईंनी सांगितलेली एक गोष्ट पटली नाही आणि सासूबाईंचे बोलणेही तिच्या मनाला लागले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या स्त्रीला विचारले, ‘‘तुझ्या सासूबाई तुला असे कधी म्हणाल्या ?’ तेव्हा ती स्त्री म्हणाली, ‘‘पन्नास वर्षांपूर्वी ! आता त्या नाहीत. त्यांचा मृत्यू होऊन बरीच वर्षे झाली आहेत.’’ पूर्वग्रहाने ग्रासीत एक विचारही आपल्यासाठी किती घातक असू शकतो ? आणि मनुष्याचे उभे आयुष्य दु:खद करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्याच वेळी सासूबाईंशी मनमोकळेपणाने ती स्त्री बोलली असती, तर एवढ्या वर्षांपर्यंत तो विचार तिच्या मनात ग्रह करून राहिला नसता. सासूबाई काही बोलल्या; म्हणून एवढे मनाला लावून घेतले, तर संसार कसा होणार ? कुटुंबामध्ये एकमेकांना सांभाळून घेऊन आनंदाने जगणेच महत्त्वाचे असते. बर्याचदा असे सर्व विसरून स्त्रीला घरातल्या अडचणींना सामोरे जावे लागते.
४. एखाद्या साधकाच्या/साधिकेच्या समवेत काही प्रसंग घडला असेल, तर पुनःपुन्हा त्याचा विचार करण्याचे टाळावे.
५. लहान बाळांसमवेत असे काहीही घडले, कुणी त्यांना रागावले; पण त्याच रागावलेल्या व्यक्तीने त्या बाळाचे पुन्हा लाड केले की, ते बाळ लगेच त्या व्यक्तीकडे आनंदाने जाते. अगदी एका मिनिटापूर्वीचेही रागावणे ते बाळ विसरते. हे लहान बाळांकडून मोठ्या माणसांना शिकण्यासारखे आहे. त्यामुळे लहान बाळांकडे पाहिले की, आनंद होतो; कारण त्यांच्या मनात काहीच विचार नसतात. ती निर्मळ असतात. असे निर्मळ मन होण्यासाठी साधकांनी प्रयत्न करायला हवा.
६. प्रतिदिन सहसाधकांकडे पहातांना, ‘आश्रमात आल्यावर पहिल्या दिवशी ज्या भावाने आपण सर्व साधकांना पहात होतो’, ते आठवावे आणि तसा भाव ठेवण्याचा प्रयत्न करावा.
७. नातलगांविषयी विचार केला, तर मनाला सांगावे, ‘आपण साधनेत असून आपल्याला स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी किती कठीण प्रयत्न करावे लागत आहेत ? नातलगांना साधना तर दूर; पण ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ म्हणजे काय ?’, हेही ठाऊक नाही.’ असे प्रयत्न केल्यावर त्यांच्याविषयीही आपल्या मनात पूर्वग्रहाचे विचार येणे बंद होतील. हे करतांना देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवावी आणि प्रक्रियेचे प्रयत्नही चालू ठेवावेत.
२ आ. मानसिक स्तर : माणसाचे चांगले विचार असोत वा त्याचे विकार असोत, या सर्वांचे मूळ कारण हे त्याच्या मनामध्येच आहे. मन एका बाळाप्रमाणे आहे. त्याला तुम्ही जसे घडवाल, तसे ते घडते. त्याला चांगल्या विचारांचे संस्कार दिले, तर ते ‘चांगले मन’ होईल. त्याला वाईट गोष्टी सांगितल्या, तर ते ‘वाईट मन’ तयार होईल. आपल्या मनाची ऊर्जा आपण ज्या दिशेने लावू तसे ते कार्य करील. आपल्याला मनाची काळजी अधिक घ्यावी लागते.
१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत पूर्वग्रह या स्वभावदोषाची व्याप्ती काढून, ‘पूर्वग्रह या स्वभावदोषामुळे आपल्या समवेत घडलेल्या प्रसंगांचा, स्वतःकडून झालेल्या चुकांचा एकदा अभ्यास करावा.’
२. ‘त्या प्रसंगांच्या मागे आपल्या वागण्याचे मूळ कारण काय होते ? आपल्याकडून चूक होण्यामागे पूर्वग्रह हा स्वभावदोष कसा कारणीभूत होता ?’, इत्यादी गोष्टींचा अभ्यास करावा.
३. मन आणि बुद्धी यांना जाणीव होण्यासाठी शिक्षापद्धतीचा उपयोग करावा.
४. संबंधित साधकाला विचारून घेऊन मनाला संस्कारित करण्यासाठी पूर्वग्रह या स्वभावदोषावर स्वयंसूचना बनवून घ्यावी आणि नियमित स्वयंसूचनांची सत्रे करावीत.
‘मनाला झालेल्या ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या विकार’रूपी रोगांचे निर्मूलन करण्यासाठी ‘स्वयंसूचना सत्रे’ करणे, हा रामबाण उपाय आहे.
२ इ. आध्यात्मिक स्तर : कोणतेही कार्य हे ईश्वरी पाठबळाविना पूर्णत्वाला जात नाही. साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी ते राबवत असलेल्या प्रक्रियेमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प आहे. साधकांनी प्रामाणिकपणे आणि चिकाटीने प्रक्रिया राबवून या संकल्पाचा आध्यात्मिक उन्नतीसाठी पूर्ण लाभ करून घ्यायला हवा.
१. ‘आश्रम हे ‘गुरूंचे घर’ आहे आणि आश्रमात रहाणारे साधक ही गुरूंची विविध रूपे आहेत’, या भावाने सर्वांकडे पहावे.
२. स्वभावदोष दूर करण्यासाठी संपूर्ण शरणागतभावाने प्रार्थना करावी.
३. आतापर्यंत या स्वभावदोषांमुळे झालेल्या गंभीर चुकांसाठी देवाकडे क्षमा मागावी आणि मग सहसाधक अन् नातलग यांची (परिस्थितीनुसार ठरवावे) क्षमायाचना करू शकतो.
४. पूर्वग्रह या स्वभावदोषाची व्याप्ती काढून झाली आणि स्वयंसूचना बनवल्या की, त्या सूक्ष्मातून प्रथम देवाच्या चरणी ठेवाव्यात.
५. पूर्वग्रह या स्वभावदोषाची जी व्याप्ती काढली असेल, तिच्याभोवती नामजपाची चौकट करून त्या लिखाणाला विभूती किंवा अत्तर लावून ठेवावे. ते लिखाण ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे (गुरूंचे) छायाचित्रमय जीवनदर्शन’, त्यांचे चरित्र किंवा सनातनच्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही एका ग्रंथात ठेवू शकतो. यामुळे ईश्वरी तत्त्व कार्यरत होऊन आपल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतील आणि स्वभावदोष दूर होण्यासाठी देवाचे बळही आपल्याला मिळेल.
३. स्वभावदोष घालवण्यासाठी गुरुकृपेचे पाठबळ आवश्यक !
आपण कितीही प्रयत्न केले, तरी लगेचच स्वभावदोष जातील असे नाही. याला साधनेचे, म्हणजेच गुरुकृपेचेही पाठबळ आवश्यक आहे. ‘गुरुकृपेमुळेच स्वभावदोष आणि अहं यांचे लवकर निर्मूलन होऊ शकते’, हे प्रत्येकानेच लक्षात ठेवावे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रिये’च्या माध्यमातून जी अद्वितीय संजीवनी लाभली आहे, ती कलियुगामध्ये तरून जाण्यासाठी मिळालेले ‘दैवी वरदानच’ आहे. या घोर आपत्काळात मिळालेली ही सुवर्णसंधी आहे. ‘या दैवी वरदानाचा साधकांनी पुरेपूर लाभ घेऊन गुरूंची कृपा संपादन करावी’, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |