युवा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा लाभलेला अनमोल सत्संग आणि या सत्संगात प.पू. गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन !

मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी युवा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हेही उपस्थित होते. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा काही भाग आपण २७ एप्रिल २०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग येथे दिला आहे.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/907554.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

५. युवा साधकांचे ध्येय     

५ अ. साधना म्हणून राष्ट्राचे विचार करणारे श्रेष्ठ, तर साधना म्हणून धर्माचा विचार करणारे सर्वश्रेष्ठ असतात !

श्री. चेतन राजहंस : श्री. यश वेसणेकर हा कोल्हापूरहून आला आहे. रामनाथी आश्रमातील कु. वैष्णवीचा (कु. वैष्णवी वेसणेकर (आताच्या सौ. वैष्णवी बधाले) (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २५ वर्षे) लहान भाऊ आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : वैष्णवी साधनेत किती पुढे गेली आहे, हे ठाऊक आहे का ?

कु. यश वेसणेकर (कोल्हापूर, महाराष्ट्र) : हो. ‘मला पूर्णवेळ साधना करायची आहे; परंतु माझ्या मनात ‘मी सैन्यात (भूदलात) जावे’, असेही विचार येतात, तर मी काय करू ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : सैन्यात भूदल, नौदल आणि वायूदल (एअरफोर्स) आहे. साधना केल्यावर ईश्वराचे साहाय्य आणि ईश्वराचा आशीर्वाद मिळतो अन् तो अधिक महत्त्वाचा आहे. व्यक्तीमध्ये शरीर, मन, बुद्धी आणि चित्त असे सर्व वेगवेगळे असते. ‘मी करतो’, हे शारीरिक स्तरावरचे झाले. त्यातून थोडेच कार्य होते. शारीरिक स्तरानंतर मानसिक स्तरावरचे कार्य म्हणजे लोकांमध्ये जागृती करणे. ‘सनातन प्रभात’ही जनजागृतीचे कार्यच करते. संत मात्र आध्यात्मिक स्तरावर कार्य करतात. ते केवळ संकल्प करतात, तरी कार्य होऊन जाते. साधना म्हणून राष्ट्र-धर्मासाठी काहीतरी करणे अधिक महत्त्वाचे आहे. साधनेमुळेच राष्ट्रहित आणि स्वतःचे हित अधिक होत असते.

कु. यश वेसणेकर : हो गुरुदेव !

परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यामुळे मनात असे विचार आले तरी साधनेकडे अधिक लक्ष द्यायचे. व्यष्टी साधनेचा पाया चांगला असेल, तर समष्टी साधना चांगली होते. संतांचे कार्य संकल्पाने होते. तसे व्हायला पाहिजे. जो राष्ट्राचा विचार करतो, तो श्रेष्ठ असतो आणि जो धर्मासाठी विचार करतो, तो सर्वश्रेष्ठ होतो. त्यांचे कार्य ईश्वरेच्छेने आपोआप होते.

आपल्या मनाने करणे, म्हणजे स्वेच्छा झाली. त्याचे फळ अधिक मिळत नाही. परेच्छेने वागल्यास संतांचा आशीर्वाद मिळून सेवा चांगली होते. ईश्वरेच्छेने वागणे, म्हणजे स्वतःची प्रगती होणे ! आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक झाली, तर ‘ईश्वराच्या मनात काय आहे’, ते लक्षात येते आणि तशी कृती केल्यास त्याचे फळ पुष्कळ मिळते.

५ आ. स्वत:चे घर रामनाथी आश्रमाप्रमाणे व्हावे; म्हणून प्रयत्न करणारी कु. समृद्धी धुळाज आणि तिचे आई-वडील !

श्री. चेतन राजहंस : कु. समृद्धी अिजत धुळाज ही कोल्हापूर येथून आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६० टक्के आहे. तिला चित्रकलेची आवड आहे.

कु. समृद्धी अजित धुळाज (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६० टक्के, गहहिंग्लज, कोल्हापूर, महाराष्ट्र) : प.पू. गुरुदेव, मागच्या वेळी मी माझ्या आई-बाबांसमवेत आश्रमात आले होते. नंतर घरी गेल्यानंतर मला असे वाटलेच नाही की, मी घरी गेले आहे. आम्ही घरच रामनाथी आश्रमाप्रमाणे व्हावे; म्हणून प्रयत्न करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : किती सुंदर आहे. ईश्वर तर सर्व ठिकाणी आहे ना !

कु. समृद्धी अजित धुळाज : घरात आम्ही तिघेच रहातो; पण ‘आपण घरात रहात आहोत’, असे आम्हाला वाटतच नाही. गुरुदेव, ‘आम्ही रामनाथी आश्रमातच रहात आहोत आणि तेथे आपले अस्तित्व आहे’, असे मला जाणवते. आम्ही घरातील कामांची विभागणी करतो. आम्हाला एकमेकांची एखादी चूक लक्षात आली, तर ती दुसर्‍यांना सांगून साहाय्य करतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजे सत्संगच आहे घरात ! तुमचे घर तुम्ही रामनाथी आश्रमाप्रमाणेच केले आहे.

५ इ. ‘स्वतःची कला आणि क्षमता यांचा उपयोग हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी व्हावा’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करणारी कु. समृद्धी !

कु. समृद्धी धुळाज : मी २० – २५ चित्रे काढली आहेत. त्यामध्ये श्रीविष्णूचे, श्री दुर्गामातेचे आणि आपलेही चित्र आहे ! मी नामजप आणि देवतांना प्रार्थना करून चित्रे काढली आहेत. गुरुदेव, मी आपलेसुद्धा चित्र काढले आहे. ते काढतांना ‘आपण माझा हात धरून माझ्याकडून चित्र काढून घेत आहात’, असे मला वाटत होते. मी डोळे बंद करून त्या देवतेचे स्मरण केल्यानंतर मला ते चित्रच दिसायचे. त्यामुळे १ घंट्यापेक्षा अल्प कालावधीत ते चित्र पूर्ण व्हायचे. आपण माझ्यासाठी पुष्कळ केले आहे. आता माझी एवढीच प्रार्थना आहे की, माझ्यामध्ये ज्या काही कला आहेत किंवा माझी जी क्षमता आहे, ती मला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेनंतर उपयोगात आणायची आहे. आपणच मला त्यात खारीचा वाटा देऊन सहभागी करून घ्यावे. ‘मला तेवढी शक्ती द्यावी आणि माझ्यात श्रद्धा निर्माण करावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : पुष्कळ छान.

५ ई. मोठी होऊन सर्वांचे प्रबोधन करण्यासाठी ‘वक्ता’ होण्याचे ध्येय ठेवणारी कु. अनुजा करी !

श्री. चेतन राजहंस : ही कु. अनुजा करी. ही कोल्हापूरहून आली आहे. ती कराटे शिकली आहे. त्यात तिला ‘ब्लू बेल्ट’ मिळाला आहे.

कु. अनुजा करी (कोल्हापूर, महाराष्ट्र) : मला ‘मोठे होऊन ‘वक्ता’ व्हावे’, असे वाटते. मला सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांच्यासारखे वक्ता बनायचे आहे आणि सर्वांचे प्रबोधन करायचे आहे ! आपणच मला यासाठी साहाय्य करावे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुला साहाय्याची आवश्यकता नाही. तू स्वतःच आध्यात्मिक प्रगती करत पुढे पुढे चालली आहेस.

५ उ. शीघ्र साधना करून संत बनण्याचे आणि समष्टी कार्य करण्याचे ध्येय असलेली सोलापूर येथील कु. ईश्वरी न्यामणे !

श्री. चेतन राजहंस : कु. ईश्वरी न्यामणे ही सोलापूर येथून आली आहे. तिला चित्रकलेची आवड आहे.

कु. ईश्वरी न्यामणे (सोलापूर, महाराष्ट्र) : गुरुदेव, मला लवकर लवकर साधना करून ‘संत होऊन समष्टी कार्य करावे’, असे वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे फार महत्त्वाचे आहे. ‘मी संत झाले की, माझे शिष्य असतील, माझे भक्त असतील’, असा विचार नाही, तर ‘मी संत होऊन लोकांना साधना शिकवणार आहे !’ असे तुझे विचार आहेत.

कु. ईश्वरी न्यामणे : मी अभ्यास करते. त्या वेळी मला असे वाटते की, मी मायेतील हे सर्व विषय का शिकत आहे ? यामध्ये साधनेविषयी कोणतीच शिकवण नाही, तर मी स्वतःचा वेळ का वाया घालवू ? त्या अभ्यासात माझे मनच लागत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : साधनेची ओढ असल्यामुळे असे विचार येत आहेत.

(क्रमश:)    

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/908184.html