
भारतामधील गोमातांच्या शेणाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी येत आहे. विशेषतः कुवेत, सौदी अरेबिया आणि ‘युनायटेड अरब अमिरात’ हे अरब देश भारताकडून मोठ्या प्रमाणावर गोमूत्र अन् शेण खरेदी करत आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने जवळपास ४०० कोटी रुपयांचे गोशेण आणि त्या संबंधित उत्पादने, म्हणजेच शेणखतावर आधारित खते, कंपोस्ट खते निर्यात केली आहेत. ‘शेणाची बारीक पावडर केल्यास ती खजूर झाडांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ करते’, असा शोध आखाती देशातील संशोधकांनी लावला आहे. त्यामुळेच कुवेतसारख्या देशांनी अलीकडेच १९२ मेट्रिक टन गोशेण भारतातून मागवले आहे. हे चित्र केवळ आर्थिक दृष्टीकोनातून महत्त्वाचे नाही, तर भारताच्या कृषी निर्यातीसाठी नवी दिशा देणारे आहे.
अमेरिका, नेदरलँड्स, जपान आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांत गायीला मिठी मारण्याचे उपचार सध्या प्रसिद्ध होत आहेत. यामध्ये लोक गायीच्या सान्निध्यात शांतपणे वेळ घालवतात, तिला मिठी मारतात, तिच्यावरून हात फिरवतात. यामुळे मनःशांती मिळते, चिंता अल्प होणे आणि रक्तदाब नियंत्रणात येतो, असे सकारात्मक परिणाम संशोधनात दिसून आले आहेत. एकीकडे शेण, गोमूत्र, दूध आणि तिच्या सान्निध्याचा मानसिक आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम हे सगळे आजच्या काळात वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही सिद्ध झाले आहे. दुसरीकडे भारतात गोमातांची दिवसाढवळ्या कत्तल चालू आहे. निवडणुकीपूर्वी गुलाबी क्रांती (म्हणजे मांस निर्यात) थांबवण्याची भाषा करणारे अनेक नेते सत्तेवर आल्यानंतर या कत्तली रोखण्यात अपयशी ठरले आहेत. गोरक्षकांना कारागृहात टाकले जाते, तर मांस निर्यातीसाठी सरकारी अनुदाने दिली जातात. आज भारत जगात सर्वाधिक गोमांस निर्यात करणारा देश बनला आहे. आज देशात अशी स्थिती आहे की, पशूधन संपत चालले आहे. शेतकर्यांना पशूपालनासाठी अनुदान मिळत नाही; मात्र पशूंच्या हत्येसाठी आणि निर्यातीसाठी अनेक योजना आहेत. गोरक्षणाचा विषय एकतरी राजकीय पक्ष उपस्थित करतो का ?
हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये गायीचे अनन्य साधारण महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे तिच्या रक्षणाचे आणि संवर्धनाचे कार्य हे धर्मश्रद्धेचे रक्षण आहे. गोमूत्राचे, शेणाचे अनन्यसाधारण महत्त्व आज परदेशातही मान्य झाले असून त्यावर तिथे संशोधन चालू आहे. भारताची शेती पर्यायाने त्यांचे जीवन गोमातेवर अवलंबून आहे. असे असतांना वर्ष १९४७ मध्ये ९० कोटी असलेले गोधन आता १ कोटी झाले आहे. गोवंशाच्या १२८ पैकी केवळ १८ प्रजाती शेष आहेत. त्यामुळे गोहत्या थांबवणे अत्यावश्यक आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे