POK Flood : पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेलम नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने पूरस्थिती !

भारताने जाणीवपूर्वक पाणी सोडल्याचा पाकचा कांगावा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताने सिंधु जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानला पाण्यासाठी भारताकडे भीक मागावी लागेल, असे म्हटले जात असतांनाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेलम नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली, ज्यामुळे अनेक भागांत पूर आला. यानंतर तेथे सतर्कतेची चेतावणी देण्यात आली असून स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. ‘भारताने जाणीवपूर्वक पाणी सोडले’ असा आरोप पाकिस्तानकडून केला जात आहे. पूरस्थितीमुळे स्थानिक प्रशासनाने हत्तीयन बाला परिसरात पाणी आणीबाणी घोषित केली आहे. त्याच वेळी मशिदींमधून चेतावणी दिली जात आहे.

१. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादचे उपायुक्त मुदस्सर फारूख यांनी आरोप केला की, झेलममध्ये अतिरिक्त पाणी सोडणे, हे भारताने जाणीवपूर्वक उचललेले पाऊल  आहे. भारताने झेलम नदीत प्रमाणापेक्षा अधिक पाणी सोडले आहे, ज्यामुळे पूर आला आहे. सध्या काळजी करण्यासारखे काही नाही. तरीसुद्धा आम्ही लोकांना नदीच्या परिसरापासून दूर रहाण्याचे आणि तिथे प्राण्यांना नेऊ नये, असे आवाहन केले आहे.

२. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, सिंधु जल करारांतर्गत भारत झेलम, चिनाब आणि सिंधु नद्यांमध्ये पाणी सोडण्याच्या किंवा थांबवण्याच्या संदर्भात प्रथम पाकिस्तानला कळवत असे; पण या वेळी भारताकडून याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

३. पाकच्या या कांगाव्याविषयी भारताने अद्याप कोणतेही विधान केलेले नाही.

संपादकीय भूमिका

जर भारताने पाणी सोडले असेल, तर पाकला अशाच प्रकारे धडा शिकवणे आवश्यक आहे आणि भारताने असे करत रहावे, असेच भारतियांना वाटेल !