Pakistan Nuclear Attack Threat : (म्हणे) ‘भारताला उत्तर देण्यासाठी आमच्याकडे १३० अणूबाँब सिद्ध आहेत !’ – पाकिस्तानचे रेल्वेमंत्री

पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांची धमकी

पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी

रावळपिंडी (पाकिस्तान) – भारताने पाकिस्तानचे पाणी थांबवल्यास आम्ही कारवाई करू. आमच्याकडे क्षेपणास्त्रे आणि १३० अणूबाँब आहेत, अशी धमकी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी दिली. ते रावळपिंडी येथे पत्रकारांशी बोलत होते.

हनीफ पुढे म्हणाले की, आमच्या क्षेपणास्त्रांची दिशा भारताकडे आहे. भारताने कारवाई केली, तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल. आमच्याकडे जगातील सर्वांत शक्तीशाली अणूबाँब आहे. आमच्याकडे घोरी, शाहीन, गझनवी या क्षेपणास्त्रांसह १३० अणूबाँब आहेत. आम्ही ते सजवण्यासाठी ठेवलेले नाहीत. आम्ही हे भारतासाठी ठेवले आहे. हे अणूबाँब पाकिस्तानच्या कोणत्या भागात ठेवले आहेत ?, हे तुम्हाला ठाऊकही नाही. तुम्ही असा विचारही करू नका की, तुम्ही पाकिस्तानची सीमा ओलांडाल. जर तुम्ही याचा विचार केला, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आम्ही राजनैतिक प्रयत्नांसमवेतच आमच्या सीमांचे रक्षण करण्याची पूर्ण सिद्धता केली आहे. पहलगाम येथील आक्रमण हे केवळ एक निमित्त आहे.

संपादकीय भूमिका

पाकने अशा कितीही वल्गना केल्या, तरी पाकला त्याच्या कुकृत्यांची मोठी किंमत चुकवावी लागेल, हे त्याने लक्षात ठेवावे !