
पुणे, २६ एप्रिल (वार्ता.) – गोसेवकांनी, गोरक्षकांनी कायद्याचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ यातील विविध कलमे माहिती पाहिजेत. हा कायदा आपला मित्र आहे आणि मोठे शस्त्रही आहे. गोरक्षकांच्या कायद्याविषयीच्या अज्ञानीपणामुळे कसायांचा लाभ होतो. आपल्याला अपेक्षित असा परिणाम घडतांना दिसून येत नाही. म्हणूनच सर्वांना प्राणी संरक्षण संबंधितातील सर्व कायद्यांचा अभ्यास करावा, असा सल्ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. मिलिंद एकबोटे यांनी दिला. ते ‘मिशन शिवभारत’च्या ‘गोरक्षक संवाद मेळाव्या’त गोरक्षकांना मार्गदर्शन करत होते. हा मेळावा पुण्यातील येरवडा भागातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये नुकताच पार पडला. मेळव्यास महाराष्ट्रातील निवडक आणि धडाडीचे गोरक्षक उपस्थित होते. या संवाद मेळाव्याची संकल्पना श्री. संजय गायकवाड यांची असून श्री. ऋषिकेश कामठे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.
श्री. एकबोटे पुढे म्हणाले की,
१. गोमातेला वाचवणे म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण करणे असे आहे.
२. ज्या भागांमध्ये गोमातेची कत्तल (वध) होते किंवा ती विकली जाते, त्या ठिकाणीच शेतकर्यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण हे अधिक आहे.
३. काही वेळेस पोलीस तक्रार घेत नाहीत. तेव्हा आपण खासगी तक्रार, ‘स्पीड पोस्ट’ आणि ऑनलाईन तक्रार करू शकतो. या मार्गाने गेल्यास पोलिसांना त्या विरोधात कार्यवाही करावी लागते.
हिंदुस्थानात कसायाला शिक्षा होत नाही !
गोरक्षकांच्या एकाही प्रकरणामध्ये कसायाला (गोमातेला मारणार्या व्यक्तीला) पोलिसांच्या दायित्वशून्यता किंवा गोरक्षकांच्या चुकांमुळे शिक्षा होत नाही. प्रत्येक तक्रारीमध्ये तो निर्दोेष सुटतो.
गोमाता, संवर्धन आणि संरक्षण हे अभ्यासक्रमात पाहिजे ! – ह.भ.प. भगवान कोकरे महाराज
यापुढे गोरक्षणाचे कार्य, गोमातेचे महत्त्व, गोसंवर्धन यांविषयीचे शिक्षण अभ्यासक्रमांतून दिले पाहिजे. हे शिक्षण संपूर्ण हिंदुस्थानातील पाठ्यपुस्तकांमध्ये, शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना गायींचे महत्त्व, लाभ आहेत, हे शिकवले गेले पाहिजे. इयत्ता १ ली ते पदवीपर्यंत गोमातेविषयीचे शिक्षण सर्वांना सक्तीचे केले पाहिजे. त्यातून एकही गाय मारली जाणार नाही.