‘व्यक्तीवर वास्तू आणि नवग्रहदेवता यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या सूक्ष्म लहरींचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपण येथे ‘वास्तू, वास्तूशास्त्र, नवग्रहादी देवता आणि ज्योतिषशास्त्र, तसेच अध्यात्मशास्त्र यांचा व्यक्तींवर काय परिणाम होतो ?’, हे जाणून घेणार आहोत.
(भाग १)
१. वास्तू
१ अ. व्याख्या आणि अर्थ : ‘वास्तू’ म्हणजे एखाद्या मोकळ्या जागेवर चार भिंती बांधून बंदिस्त केलेली जागा. त्या जागेला छप्पर असो किंवा नसो, ती वास्तूच असते. या जागेची अधिपती देवता, म्हणजे वास्तुदेवता.
१ आ. इतर नावे : वास्तुदेव, वास्तुपुरुष. (पृथ्वी ही वास्तुपुरुषाची गृहस्वामिनी आहे.)
१ इ. कार्य : वास्तुदेवता म्हणजे वास्तूचे शक्तीकेंद्र होय. ‘चांगले-वाईट जे घडत आहे, त्याला शक्ती देणे’, हे वास्तुदेवतेचे कार्य असते.
१ ई. वास्तू आणि दिक्पाल : वास्तूवर विविध दिशांचे स्वामी असणार्या दिक्पालांचा परिणाम होतो. त्यामुळे वास्तूत रहाणार्या व्यक्तीचा स्थूलदेह आणि तिचे सूक्ष्म देह (सूक्ष्म देह, प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह असे ५ देह असतात. या सर्वांना ढोबळमानाने ‘सूक्ष्म देह’ असे म्हणतात.) यांच्यावर वास्तूशी संबंधित असणार्या विविध दिक्पालांचा परिणाम होतो.
१ उ. वास्तूशी संबंधित असणारे अष्ट दिक्पाल आणि त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये : ‘इंद्र, यम, वरुण, कुबेर, अग्नि, निऋति, वायु आणि ईशान’, हे अष्ट दिक्पाल आहेत. त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
ऊर्ध्व (वरच्या) दिशेचा स्वामी प्रजापति किंवा ब्रह्मदेव आहे, तर अधो (खालच्या) दिशेचा स्वामी शेषनाग किंवा वासुकी असून ऊर्ध्व आणि अधो या दिशांच्या मध्ये असणार्या अंतरिक्षाचा स्वामी विष्णु आहे.’
(साभार : ‘भारतीय संस्कृतीकोष’)

२. नवग्रहादी देवता
‘व्यक्तीच्या देहामध्ये पृथ्वी, आप आणि तेज ही तत्त्वे प्रधान असून नवग्रह देवता या प्रामुख्याने पृथ्वी, मध्यम प्रमाणात आप अन् अल्प प्रमाणात तेज, या तत्त्वांशी संबंधित असतात. त्यामुळे व्यक्तीचा स्थूलदेह आणि तिचे सूक्ष्म देह यांच्यावर नवग्रहांचाही परिणाम होतो. व्यक्ती विशिष्ट वास्तूमध्ये रहात असल्यामुळे तिच्यावर दिक्पालांचाही परिणाम होतो. नवग्रह देवता या पंचमहाभूतांपैकी पृथ्वी, आप आणि तेज, तर विविध दिक्पाल हे तेज, वायु अन् आकाश या तत्त्वांच्या स्तरांवर व्यक्तीवर सूक्ष्मातून परिणाम करतात. त्यामुळे नवग्रहांचा व्यक्तीच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांवर पृथ्वीतत्त्वाच्या अन् विविध दिक्पालांचा व्यक्तीच्या स्थूल अन् सूक्ष्म देहांवर तेजतत्त्वाच्या स्तरावर परिणाम होतो.
३. व्यक्तीशी संबंधित विविध शास्त्रे
३ अ. वास्तूशास्त्र : वास्तूच्या विविध दिशांना असणार्या देवतांनुसार वास्तूतील स्पंदनांचा व्यक्तीवर होणारा परिणाम अभ्यासणारे शास्त्र म्हणजे ‘वास्तूशास्त्र’! या शास्त्रानुसार व्यक्तीवरील वास्तूचा नकारात्मक परिणाम न्यून करून तिच्यावरील सकारात्मक परिणाम वाढवण्यासाठी वास्तूशास्त्रात विविध उपाय सांगितलेले आहेत, उदा. वास्तूवरील नकारात्मक परिणाम न्यून करण्यासाठी ‘उदकशांत’ करणे, वास्तूतील देवतांची कृपा संपादन करण्यासाठी ‘वास्तुशांत’ करणे इत्यादी. अष्ट दिक्पालांमुळे वास्तूशास्त्राची निर्मिती झालेली आहे. जर एखादी वास्तू वास्तूशास्त्रानुसार असेल, तर व्यक्तीवर वास्तूचा चांगला परिणाम होतो. याउलट एखादी वास्तू जर वास्तूशास्त्रानुसार नसेल, तर वास्तूदोष निर्माण होतात आणि व्यक्तीवर वास्तूचा वाईट परिणाम होऊन वास्तूत रहाणार्या व्यक्तींना ‘आजारपण, ताणतणाव, भांडणे होणे, कोणत्याही कार्यात यश प्राप्त न होणे’ इत्यादी प्रकारचे त्रास भोगावे लागतात. ‘घरातील कोणता भाग कोणत्या दिशेला असावा ?’, हे पुढील कोष्टकात दिले आहे.
३ अ १. दिशांनुसार वास्तूची योग्य रचना (वास्तूशास्त्रज्ञांचा हे वास्तुशास्त्रानुसार करण्याचा प्रयत्न असतो.)
३ आ. ज्योतिषशास्त्र : सूर्यमालेतील नवग्रहांचा पृथ्वी आणि पृथ्वीवर रहाणारे जीव यांच्यावर परिणाम होतो. नवग्रहांकडून प्रक्षेपित होणार्या सूक्ष्म स्तरावरील शक्तीच्या लहरींमुळे मनुष्यावर विविध प्रकारचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे नवग्रहांची उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. नवग्रह देवतांचा व्यक्तींवर होणारा सूक्ष्म परिणाम अभ्यासणारे शास्त्र म्हणजे ‘ज्योतिषशास्त्र’ ! या शास्त्रामध्ये ‘विविध ग्रहांचा व्यक्तीवर कशा प्रकारे परिणाम होतो ?’, याचा सखोल अभ्यास केलेला आहे, तसेच ग्रहांचा व्यक्तीवर होणारा वाईट परिणाम दूर करण्यासाठी ‘त्या त्या ग्रहाशी संबंधित रत्नाची अंगठी घालणे, नवग्रह शांतीहोम करणे’ इत्यादी उपाय सांगितलेले आहेत.
३ इ. अध्यात्मशास्त्र : व्यक्तीच्या केवळ शारीरिक स्तराचाच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांचा विचार करून ‘पंचमहाभूते, विविध देवता, अनिष्ट शक्ती इत्यादी आध्यात्मिक घटकांचा व्यक्तीवर कशा प्रकारे परिणाम होतो ? अन् वाईट परिणाम दूर करण्यासाठी कोणते आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत ?’, यांचा सखोल विचार करणारे शास्त्र, म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र’ ! या शास्त्रात ‘व्यक्तीवर विविध आध्यात्मिक घटकांचा होणारा परिणाम, त्यावरील उपाय आणि व्यक्तीचा सर्वंकष आध्यात्मिक उत्कर्ष’, यांसंदर्भातील सखोल ज्ञान अंतर्भूत आहे.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
या लेखातील भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/909861.html
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०२४)
|