संपादकीय : निधर्मीवाल्यांची मानसिकता !

पहलगाम येथे आतंकवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घातल्या. आतंकवाद्यांनी ‘कलमा’ पढायला सांगितला. प्रत्यक्षदर्शी आणि ज्यांना आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्या नातेवाइकांनी ही माहिती माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये  स्पष्ट सांगितली; मात्र धर्मनिरपेक्षतेचा ज्वर झालेले काही काँग्रेसी, साम्यवादी आणि कथित पुरोगामी यांनी ‘आतंकवादाला धर्म नसतो’, ही टिमकी पुन्हा वाजवायला प्रारंभ केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे त्यातीलच एक आहेत. पहलगाम आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन शरद पवार यांनी त्यांचे सांत्वन केले. या वेळी मृत नागरिकांच्या कुटुंबियांनी त्यांच्या भावना व्यक्त करतांना ‘आतंकवाद्यांनी कलमा पढायला सांगितला. स्वत:ला वाचवण्यासाठी आम्ही कपाळावरील टिकल्या काढून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या’, असे सांगितले; मात्र शरद पवार यांना त्यांच्या या भावना कितपत समजल्या, याची शंका आहे. त्या पोचल्या असत्या, तर तेथून बाहेर आल्यावर माध्यमांशी बोलतांना ‘धर्माची चर्चा आताच का ? पहलगाम येथील आक्रमण धर्मविरोधी लढाई वाटते का ?’, असे प्रश्न त्यांनी निर्माण केले नसते. अशा प्रकारच्या वक्तव्यातून शरद पवार यांनी केवळ मृत कुटुंबियांच्याच नव्हे, तर हिंदूंच्या भावनांवर मीठ चोळले. मालेगाव स्फोटात निरपराध हिंदूंना नाहक गोवून अस्तित्वात नसलेला ‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा निर्माण करण्यामध्ये हेच शरद पवार अग्रणी होते. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधणारे शरद पवार, इथे मात्र आतकंवाद्यांची धर्मांधता लपवण्यासाठी धडपडत आहेत. मुळात शरद पवार हे आतंकवादी आक्रमणात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते कि आतंकवाद्यांच्या धर्मांधतेवर पांघरूण घालण्यासाठी गेले होते ?, हा प्रश्न आहे. शोकाकुल कुटुंबीय ‘आतंकवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या’, असे इतके स्पष्ट सांगत असतांना त्याविषयीही मात्र पवारांनी तोंडातून शब्द काढला नाही. उलट माध्यमांपुढे खोटी माहिती दिली आणि आणखी एक ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) रचण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे इस्लामी धर्मांधतेवर पांघरूण घालण्याचे काम मागील अनेक वर्षे कथित पुरोगामी, साम्यवादी आणि काँग्रेसी या मंडळींकडून चालू आहे.

‘हिंदु’ म्हणून गोळ्या घालण्याची आतंकवाद्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचा नरसंहार ते ‘हिंदु’ असल्यामुळेच करण्यात आला. त्या वेळीही नरसंहार करतांना हिंदूंपुढे ‘काश्मीर सोडून जा किंवा इस्लाम स्वीकारा’, अशी अट घालण्यात आली होती. तेथील मशिदी नव्हे, तर सहस्रो मंदिरे पाडण्यात आली.  ‘आतंकवाद्यांनी केलेले आक्रमण हे इस्लामपुरस्कृत नाही, हे सांगायचे आणि हिंदूंचा संबंध मात्र धर्माशी जोडायचा’, ही यांची सोयीस्कर दुटप्पी भूमिका ! इस्लामचे क्रौर्य झाकण्यासाठी याच मंडळींनी ‘धर्मवीर संभाजी महाराज व्यभिचारी होते’, असे चित्र निर्माण केले होते. इस्लामची धर्मांधता लपवण्यासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने मनुस्मृतीनुसार मारले’, अशी आवई यांनीच उठवली होती. बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार झाला. एवढे सगळे होऊनही आतंकवाद्यांच्या क्रौर्याला लपवण्याचे काम याच मंडळींनी केले. मागील वर्षानुवर्षे हे चालूच आहे. ३५० वर्षांपूर्वी इस्लामी धर्मांधांचा महाराष्ट्रात नंगानाच चालू असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही धर्मांधता ठेचून काढली; मात्र ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई इस्लामविरोधी नव्हती’, असा भ्रम हीच मंडळी पसरवत आहेत. औरंगजेब धर्मांध नव्हता, तर त्याने त्याच्या राज्यात हिंदु म्हणून रहाणार्‍यांसाठी जिझिया कर का लावला ? हिंदूंची मंदिरे का तोडली ? हा सर्व इतिहास काँग्रेसने इतकी वर्षे लपवण्याचा प्रयत्न केला. याउलट अभ्यासक्रमात मोगलांच्या इतिहासाचे गोडवे गायले. हा सर्व प्रकार केवळ न केवळ हिंदूंचे खच्चीकरण करण्यासाठी चालू आहे.

ही तर धर्मांधतेची पाठराखण !

पहलगाम आक्रमणानंतर इस्लामच्या धर्मांधतेवर पांघरूण घालण्यासाठी ज्या प्रकारे शरद पवार पुढे आले आहेत, तोच प्रकार त्यांनी वर्ष १९९३ मध्ये मुंबईतील साखळी बाँबस्फोटाच्या वेळीही केला. हिंदूबहुल भागात ११ बाँबस्फोट झाले असतांना १२ वा बाँबस्फोट मुसलमानबहुल मशीद बंदर भागात झाल्याची खोटी माहिती शरद पवार यांनी माध्यमांना देऊन दिशाभूल केली. ‘साखळी बाँबस्फोटाच्या वेळी दंगल घडू नये’, यासाठी १२ वा स्फोट झाल्याचे खोटे सांगितल्याची माहिती शरद पवार यांनी नंतर दिली. पहलगाम आक्रमणानंतरही हिंदूंची दिशाभूल करण्यासाठी शरद पवार पुढे आले आहेत. पवार जर एवढे सहृदयी असतील, तर जे आतंकवादी वारंवार अशा कारवाया करून निरपराध हिंदूंच्या कत्तली करतात, त्यांना वचक बसण्यासाठी ते का पुढाकार घेत नाहीत ? याउलट अस्तित्वात नसलेल्या भगवा आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी ते खुशाल खोटे बोलतात. ‘हिंदूंना पहलगाम येथे आतंकवाद्यांनी धर्म विचारून मारले’, हे पुढे आल्यास त्यांची धर्मासाठी एकजूट होईल. त्यांच्यातील क्षात्रतेज जागृत होईल आणि जात, पंथ यांमध्ये हिंदूंना विभाजित करण्याचे कारस्थान यशस्वी होणार नाही, हे या कथित पुरोगामी, साम्यवादी आणि काँग्रेसी नेत्यांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे ‘पहलगाम येथील आतंकवाद्यांचे आक्रमण हे हिंदूंच्या अस्तित्वावरील आक्रमण आहे’, हे हिंदूंनी आतातरी लक्षात घ्यावे.

पहलगाम येथे आतंकवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या घातल्या, याचा अर्थच मुळात त्यांना हिंदूंचे अस्तित्व भारतातून नष्ट करायचे आहे आणि त्यासाठी ते वर्षानुवर्षे प्रयत्नरत आहेत. भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे जिहाद्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांची लढाई उघडपणे चालू आहे; मात्र त्यांच्या धर्मांधतेवर पांघरूण घालून हिंदूंना बेसावध ठेवण्यासाठी कार्यरत असलेली ही मंडळी एकप्रकारे या धर्मांधतेचीच पाठराखण करत आहेत. पहलगाम येथील आक्रमण हे केवळ आतंकवादी आक्रमण नाही, तर धर्मांध जिहाद्यांनी हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी उघडपणे दिलेली धमकी आहे. त्यामुळे ‘कलमा’ पढून जिवंत रहायचे कि स्वाभिमानाने हिंदू म्हणून जगायचे ?, हे हिंदूंनीच ठरवावे. ‘हिंदु’ म्हणून जिवंत रहायचे असेल, तर इस्लामी धर्मांधांना तोंड देण्याचे सामर्थ्य हिंदूंनी बाळगावे आणि निधर्मी नेत्यांकडून होणारे कथानकरूपी षड्यंत्र उद्ध्वस्त करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. ‘केवळ इस्लामी धर्मांधच नव्हे, तर त्यांची पाठराखण करणारेही हिंदूंच्या मुळावरच उठले आहेत. त्यामुळे वेळीच संघटित व्हावे’, हाच बोध पहलगाम आक्रमणातून हिंदूंनी घ्यावा. एक तर ‘हिंदु राष्ट्र’ अन्यथा ‘इस्लामी राष्ट्र’ यांपैकी एका पर्यायाची निवड हिंदूंना करावी लागेल, ही भविष्यातील उघडपणे दिसणारी वस्तूस्थिती आहे. ती लक्षात घेऊन हिंदूंनी सिद्ध व्हावे !

भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा करणारे आणि इस्लामी धर्मांधतेची पाठराखण करणारे ‘धर्मनिरपेक्ष’ कसे ?