समतेच्या नावाखाली चाललेला निर्लज्जपणा !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

युगोस्लाव्हियाचा अध्यक्ष मेला, तेव्हा जगातील ‘सर्वांत श्रीमंत कम्युनिस्ट (साम्यवादी) मेला’, असे लेख प्रसिद्ध झाले होते. साम्यवादाचे याहून अधिक विडंबन कोणते ? समतेच्या गप्पा मारणे सोपे आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी निःस्वार्थ भूमिका स्वीकारावी लागते. तिची सावलीही कुठे दिसत नाही. शिपायापासून बँकेतील मोठ्या अधिकार्‍यापर्यंत आणि प्राथमिक शिक्षकापासून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींपर्यंत सगळेच वेतनवाढीसाठी संपावर जात असतात. लोकसभा आणि विधानसभा येथे सदस्यांची वेतनवाढ करण्याच्या प्रकरणात सगळे पक्ष एकमताने मान्यता देतात, हे सगळे समाजाच्या कल्याणासाठी चालले आहे, असे म्हणता येईल काय ? परंपरेच्या विषमतेला नावे ठेवतांना आपल्या पायाखाली काय जळते आहे, हे कुणी पहात नाही. सर्व प्रकारची सत्ता हाती असल्यामुळे स्वतः वाटेल तसे वागून प्रचारमाध्यमाच्या बळावर लोकांची दिशाभूल करता येते. मंत्र्याचे निवासस्थान दुसर्‍या मंत्र्याला मिळाले की, त्यात स्वतःच्या इच्छेप्रमाणे सुधारणा करण्यासाठी तो मंत्री ५-१० लाख रुपये व्यय करतो. ते शासनाचे म्हणजे सामान्यजनांचेच असतात ना ?

बहुसंख्य समाज दारिद्र्यरेषेखाली रहातो, असे असतांना मंत्री ही चैन करतो आणि वर स्वतःला ‘समतेचा पुरस्कर्ता’, असे म्हणतो. या वस्तूस्थितीला निर्लज्जपणाच्या व्यतिरिक्त दुसरे काय नाव द्यावयाचे ?

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘पूर्वरंग तरंगिणी’)