हिंदी भाषा का मिंधी आणि शिकण्याला अघोषित बंदी ?

शालेय अभ्यासक्रमात अन्य भाषांसह हिंदी भाषा शिकवण्यावर सध्या दक्षिण भारतातील राज्ये आणि महाराष्ट्र येथे विरोध, आंदोलने, चर्चा चालू आहे. केंद्र सरकारने हिंदी भाषेचा ‘भाषा’ म्हणून विद्यार्थ्यांना शिकण्यास समावेश करण्याला हा विरोध आहे. तमिळनाडूचा हिंदी विरोध अनेक दशकांचा आहे. त्यामुळे त्याविषयी काही वावगे वाटायला नको; मात्र आता विषय आल्यामुळे याविषयाचा पुन्हा अभ्यास करणे ओघाने आले, तसेच या निमित्ताने या हिंदी विरोधाला काही खोली आहे कि उथळ  आहे ? अभ्यासपूर्ण आहे कि तोंडदेखला आहे, हे पहाणे आवश्यक आहे. हिंदी भाषा कुणीच स्वीकारत नाही. त्यामुळे ती मिंधी झाल्याप्रमाणे आहे.

 

प्रतीकात्मक चित्र

 

१. मराठीच्या गळचेपीविषयी आवाज !

केंद्रशासनाच्या हिंदी भाषा सक्तीच्या धोरणावरून म्हणा किंवा त्रिभाषा सूत्रावरून तमिळनाडूने प्रथम (आंधळा) कडवा विरोध केला आणि तो आजही करत आहे. ‘तमिळ भाषेवर अतिक्रमण होणार’, असा बागुलबुवा निर्माण केला जात आहे. आता महाराष्ट्रात ते  लागू करण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला, तर पुन्हा येथेही मराठीची गळचेपीविषयी आवाज उठवण्यात येत आहे. एका अध्यादेशाने त्वरित मराठीचे महत्त्व न्यून होणार आहे का ? विरोध करणार्‍यांनी काही तात्त्विक अभ्यास केला आहे का ?, असे प्रश्न येणे स्वाभाविक आहे.

२. मुलांची ग्रहण क्षमता

बालमानसशास्त्राच्या दृष्टीने वय वर्षे ६ ते १२ या वयातील मुलाची खेळात, अभ्यासात प्रगती होते. त्याची विचारशक्ती वाढते आणि ग्रहण क्षमता वाढते, म्हणजे तो नवीन काहीतरी शिकू शकतो. त्या दृष्टीने त्याच्या मातृभाषेच्या व्यतिरिक्त भाषा तो सहज आत्मसात् करू शकतो. यासाठी एखादे उदाहरण घेऊ. गोव्याची भाषा कोकणी आणि मराठी असली, तरी स्थानिक कोकणी भाषेतून संवाद साधण्याला प्राधान्य देतात. शाळेत लहान मुले आणि शिक्षक कोकणी बोलतात. अशा वेळी त्या शाळेत जाणारी अन्य प्रांतातील लहान मुले ती भाषा सहज आत्मसात् करून कोकणीत बोलण्यास प्रारंभ करतात. तेच पालक अथवा मोठ्या व्यक्तींना तेवढे जमत नाही किंवा वेगळा वेळ देऊन ती भाषा आत्मसात् करावी लागते. त्यामुळे मुलांना त्यांच्या वाढत्या वयात नवीन भाषा शिकणे, आत्मसात् करणे हे सहज जमू शकते.

३. एकाच लिपीच्या भाषा सहज आत्मसात् होऊ शकणे !

श्री. यज्ञेश सावंत

हिंदीची लिपी देवनागरी आहे, मराठीची ही देवनागरी आहे. मूळ भाषा संस्कृतची लिपीही देवनागरीच आहे, म्हणजे एकच लिपी असलेल्या या भाषा आहेत. त्यामध्ये व्याकरण, वाक्यरचना असा भाग पुष्कळ वेगळा असला, तरी सात्त्विक देवनागरी अक्षरे आहेत. त्यामुळे खरेतर या तिन्ही भाषा विद्यार्थी आत्मसात् करू शकतो. हाच विचार जर अन्य भारतीय भाषांविषयी, म्हणजे हिंदीच्या ऐवजी गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड अशी कोणतीही भाषा घेतली, तर त्या भाषेतील अक्षरे शिकणे अवघड आहे. तीनही भाषांमध्ये लिखाण आणि वाचन सोपे आहे. मराठी शिकणार्‍याला हिंदी शिकणे सोपे, तर इंग्रजी शिकणे अवघड आहे; कारण त्यात लिपीपासून सर्व पालट आहे.

एका तमिळ परिचिताला देवनागरी लिपित संदेश पाठवला, तर ती व्यक्ती वाचू शकली नाही. इंग्रजीत पाठवला, तर वाचते, म्हणजे आपण काय इंग्लंडमध्ये आहोत कि भारतात आहोत, असा विचार करण्यासारखी परिस्थिती ! तमिळनाडूमध्ये हिंदीतून विचारले अमुक रेल्वेस्थानक कुठे, तर खेकसण्याचा प्रकार होतो. ‘तुम्ही सुशिक्षित आहात, तर समजले पाहिजे असे इंग्रजीतून बोलला’, असे म्हटले जाते, म्हणजे केवढा हा टोकाचा हिंदीद्वेष ! स्वभाषेचा अभिमान (?) बाळगतांना  आपण एका भारतीय भाषेचे अस्तित्व नाकारतो आहोत, हे लक्षात येते का ?

४. त्रिभाषासूत्रीमध्ये विदेशी भाषा शिकायची का ? 

शासनाचे त्रिभाषा सूत्र आहे. मराठी, इंग्रजी आणि तिसरा पर्याय हिंदीला दिला आहे. खरा क्रम पहिला मराठी, दुसरा हिंदी आणि तिसरा इंग्रजी भाषेला द्यावयाला हवा होता; मात्र इंग्रजी शिकले नाही, तर नोकरी मिळत नाही ही भावना !

आता तिसरी भाषा हिंदी शिकायची नाही, अन्य भारतीय भाषांची लिपी कठीण मग काय जर्मन, फ्रेंच शिकायचे का ? या भाषा शिकण्याकडे विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचा कल आहे. म्हणजे वेगळे पैसे मोजून जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकण्यासाठी शिकवणी लावावी लागते. जर्मनीत वास्तव्याला जायचे, तर जर्मन भाषेचा पेपर करावा लागतो, त्यात चांगले गुण मिळवावे लागतात, तेव्हा कुठे जर्मन नागरिकत्व मिळू शकते. े अशा अनेक अटी आहेत, तर त्या स्वीकारून विदेशी भाषा शिकली जाते; मात्र हिंदी लाथाडली जाते.

५. मराठीकडे तसेही दुर्लक्षच !

शुद्ध मराठी भाषा शिकण्याकडे तसे दुर्लक्ष होते; कारण ती मातृभाषा आहेच, ती बोलायला येतच आहे. देवभाषा संस्कृत ही सात्त्विक भाषा आहे. त्या खालोखाल मराठी आणि हिंदी आहे. संस्कृतपासूनच सर्व भाषांची निर्मिती झाली असली, तरी त्यांची लिपी, उच्चार यांमध्ये कालमानानुसार पुष्कळ पालट होत गेले.

६. मराठीसाठी संघर्ष करणार्‍यांनी याकडेही पहावे !

अ. अद्यापही शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा उपयोग ज्यामध्ये अधिकार्‍यांच्या नावाच्या पाट्या मराठीत नाहीत, स्वाक्षरी इंग्रजीतूनच केली जाते.  दुकानांच्या नावाच्या पाट्या मराठीत नाही, त्यांना कधी जाणीव करून देणार ?

आ. सर्व हिंदी चित्रपटांना मोठ्या चित्रपटगृहांचे ‘स्क्रीन्स’ (चित्रपट बघण्यासाठी पडदे) सहज मिळतात, मराठी चित्रपटांना त्या मिळत नाहीत किंवा एखादा मोठा बजेटचा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार असेल, तर मराठी चित्रपटांना त्यांच्या प्रदर्शनाचे दिनांक पुढे ढकलावे लागतात. याविरुद्ध सर्वप्रथम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईत मराठी चित्रपटांनाही ‘स्क्रीन्स’ मिळू लागल्या. त्यांनाही चांगले दिवस आले. त्यामुळे ‘बॉलीवूड’ची (हिंदी चित्रपटसृष्टीची) अघोषित दादागिरी मोडून निघाली असली, तरी मराठी चित्रपटांवर अन्याय होतो, ही भावना मराठी दिग्दर्शकांची असते. उच्चभ्रू मंडळींना भले ते मग त्यांची मातृभाषा मराठी असली, तरी मोठ्या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट नको असतात…मागे एका प्रसिद्ध लेखिकेने ‘मराठी चित्रपट लावून आम्ही काय वडा आणि सँडविच खायचे का ?’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती ?

इ. मराठी शाळांची संख्या न्यून होत आहे. त्यातही जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची पटसंख्या न्यून होत आहे. त्यामुळे शाळेत शिकायला विद्यार्थी नाहीत, अशी परिस्थिती. त्या उलट पालक भरमसाठ शुल्क भरून इंग्रजी शाळांमध्ये, वेगळे शुल्क भरून शाळेची बस, महागड्या शिकवण्या लावायला सिद्ध आहेत. मराठीला हीन लेखले जाते किंवा मराठी माध्यमात शिकणे, म्हणजे कमीपणा वाटत आहे.  खरे तर आंदोलन करणारे, भाषाप्रेमी यांनी याकडे लक्ष देऊन जनजागृती करायला हवी.

७. हिंदी शिकण्यासाठी हिंदी चित्रपटाचा आधार !

तमिळनाडूमध्ये असलेल्या राजकीय हिंदी विरोधामुळे तेथील लोकांना हिंदी शिकण्याची इच्छा असूनही ती शिकता येत नाही. याविषयी हिंदीत बोलणार्‍या एका नाडी ज्योतिषाने सांगितले की, ते हिंदी चित्रपट पाहून हिंदी शिकले. हिंदी चित्रपटातील जे काही हिंदी कानावर पडेल, त्यांचे उच्चार, ओठांची हालचाल यांवरून हिंदी आत्मसात् केली. त्यासाठी सलग काही दिवस हे चित्रपट पहावे लागले. तेथील हिंदी भाषा शिकण्यासाठी इच्छुक लोक असाच आधार घेतात, हे समजले.

८. हिंदीला विरोध करणार्‍यांनी व्यापक हित लक्षात घ्यावे !

त्रिभाषा सूत्राकडे मुले आणि पालक यांच्या हिताच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. राजकारण्यांच्या दृष्टीने नाही. राजकीय पक्षांनी आंदोलन करण्यापूर्वी या सूत्राचा काय अभ्यास केला, हे महत्त्वाचे आहे. अभ्यासपूर्वक विरोध करणे अपेक्षित आहे. तमिळनाडूमध्ये संकुचितता आणि राजकीय स्वार्थ भाषाविरोधामागे लक्षात येतो. महाराष्ट्रातही तेच करत आहे का ?

आंदोलन करणार्‍यांपैकी किती जणांची मुले मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकली आहेत ? स्वत: मराठी माध्यमात मुले, नातवंडे यांना प्रवेश देणार नाही आणि वर मराठीवर अतिक्रमण असे म्हणणे कितपत योग्य, असे सर्वसामान्य नागरीकांना वाटते. पालकांनाच ठरवू द्यावे की, त्यांच्या मुलांना कोणती भाषा सोपी जाणार आहे ? कोणत्या भाषेतून त्यांना  ज्ञान ग्रहण करता येणार आहे ?

हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवल्यावर मराठी किंवा कोणत्याही राज्याच्या भाषेची गळचेपी होणार नाही. त्या त्या राज्यातील लोकांची मातृभाषा ही प्रथम क्रमांकावर असणारच आहे. त्यात कुठे अडचण नाही. हा निव्वळ राजकीय बागूलबुवा नव्हे का ? प्रशासनाशी सामंजस्याने भूमिका घेऊन विरोध करणार्‍यांनी अभ्यास करून विषय मांडला असता, तर बरे झाले असते, असे वाटते.  विरोध करायचा असेल, तर तो इंग्रजी जी खरे तर विदेशी भाषा आहे, तिला केला पाहिजे.

तिच्या पगड्यातून पालकांना बाहेर काढण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. इंग्रजीचे जे महत्त्व निर्माण करण्यात आले आहे, त्यामध्ये आस्थापने असोत, नोकरीच्या ठिकाणी होणार्‍या मुलाखती असोत, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि अन्य अभ्यासक्रम असोत, ते मराठीतून चालू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. हे अभ्यासक्रम इंग्रजीतून असल्यामुळे खरे तर सर्वसामान्य मुलांना ते शिकणे अवघड जात असते; मात्र इंग्रजीला कुणी हात लावण्यास सिद्ध नाही; कारण ती सध्या अवघड गोष्ट आहे. इंग्रजी सर्वांना हवी आहे, एवढेच नव्हे इंग्रजाळलेलेही व्हायचे आहे. मग भारतात अधिक भागात बोलल्या जाणार्‍या आणि भारतीय असणार्‍या हिंदीला विरोध का ? हिंदी चित्रपटसृष्टीला विरोध का केला जात नाही ? उलट त्यामुळे चांगली हिंदी सोडाच उर्दू मिश्रित हिंदी प्रेक्षकांच्या माथी मारली जात आहे. त्यांना विरोध का नाही ? असे सर्वच पदर पडताळले पाहिजे. केवळ त्रिभाषा सूत्रापुरतीच याचा विचार नको.

शासनाने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय यांचे अभ्यासक्रम मराठीतून घेण्यासाठी पुस्तके उपलब्ध करण्यास प्रारंभ केला आहे. ‘एआय’द्वारे (कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे) शिक्षण देण्यात येईल, त्यात तर ‘एआय’द्वारे कोणत्याही भाषेतून शिक्षक बोलल्यास विद्यार्थ्याला त्याला हव्या त्या भाषेतून ते ऐकता येईल. असे अभिनव प्रयोग आवश्यक आहे.

तात्पर्य भारतीय हिंदीला विरोधासाठी विरोध करण्याचे टाळावे !

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (२४.४.२०२५)