हिंदु राष्ट्र : काळाची आवश्यकता !

प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज यांचा परिचय 

प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज हे ‘शिवधारा मिशन फाऊंडेशन’चे संस्थापक आहेत. ‘शिवधारा मिशन फाऊंडेशन’ ही एक आध्यात्मिक, सेवाभावी आणि परोपकारी संस्था आहे. संपूर्ण भारताच्या विविध प्रांतांमध्ये आणि विविध शहरांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. ते ‘अखिल भारतीय साधू-संत समाज महाराष्ट्र’चे कार्यकारिणी सदस्य आहेत. ते भागवत कथा, राम कथा आणि शिव कथा या माध्यमांतून हिंदूंमध्ये धर्मजागृती करत आहेत. त्यांच्या आश्रमाच्या माध्यमातून प्रतिमास धान्य, किराणामाल, भाज्या, औषधे यांचे गरजूंना वितरण केले जाते. त्यासह गरजू मुलांना पुस्तके, वह्या आणि शिक्षणासाठी लागणारे अन्य सामुग्रीही वितरित केली जाते.

प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज

१. काळानुसार आध्यात्मिक साधनेसह पुरुषार्थ आवश्यक !

काळानुसार कार्य करतांना प्रार्थना आणि प्रयत्न या दोन्हींची आवश्यकता आहे. साधना करण्यासह पुरुषार्थही तेवढाच आवश्यक आहे. पुरुषार्थ एवढा आवश्यक नसता, तर भगवान श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र का उचलले असते ? आणि प्रभु श्रीरामाने धनुष्यबाण का चालवले असते ? कुणी साधू एखाद्या कुटीत बसून साधना करत असेल, तर विश्वशांतीमध्ये त्याचेही मोठे योगदान समजले जाते, कुठे तरी जे क्षत्रिय धर्म निभावत आहेत, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. सनातन संस्थेच्या माध्यमातून गोवा येथे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन होते. त्याला जगभरातून विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. या अधिवेशनात सर्वांना पुष्कळ गोष्टी सहजतेने शिकायला मिळतात. जगातील विचारांमध्ये क्रांती करण्याची आवश्यकता पडणार आहे. त्याप्रमाणे जगातील परंपरांमध्ये परिवर्तन होत आहे.

२. संपूर्ण जगात हिंदूंचा एकही देश नसणे लज्जास्पद !

ज्याला आदि नाही आणि अंतही नाही, असे ते सनातन ! असे असतांनाही खेदाने म्हणावे लागते की, संपूर्ण जगात हिंदूंचा एकही देश राहिलेला नाही. काही शतकांपूर्वी उदयाला आलेल्या पंथांचे पुष्कळ सारे देश झाले आहेत. नेपाळमध्ये ९७ टक्के लोक हिंदु आहेत. तो एकमेव हिंदूंचा देश होता आणि त्याविषयी आपल्याला अभिमान होता; परंतु आज तोही हिंदु उरला नाही. एकमेव असलेल्या हिंदु देशापासूनही आपण वंचित झालो आहोत.

३. वनवासात निघतांना श्रीरामाचा राजा दशरथांकडून सुविधा घेण्यास नकार

प्रभु श्रीराम किशोरावस्थेत होते, तेव्हा राजा दशरथाने त्यांना एक सेवा दिली. राजा दशरथाने श्रीरामाला सांगितले की, त्याने स्वत:ची ओळख न दाखवता रूप पालटून राज्यात फिरावे आणि जनतेशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, तसेच त्यांच्या समस्यांचे  निवारण कसे करावे, हे जाणून घेऊन परत यावे. अशा पद्धतीने राजा दशरथाने भगवान श्रीरामाला निपुण केले होते. एक दिवस विश्वामित्र ऋषि श्रीरामाला यज्ञरक्षणासाठी घेऊन जाण्यासाठी आले. तेव्हा प्रथम श्रीरामाला त्यांच्या समवेत पाठवण्याची राजा दशरथाची इच्छा नव्हती. राजा दशरथ ऋषींना म्हणाला, ‘रामाला सोडून तुम्ही म्हणाल ते मी देईन. मी स्वतः येईन, माझी सेना येईल, अस्त्र-शस्त्र देईन.’ विश्वामित्रांनीही ठाम निश्चिय केला होता. ते म्हणाले, ‘रामाविना मला दुसरे काहीच नको.’ राजा दशरथासाठी पुत्रमोह विलक्षण होता. दशरथ विश्वामित्रांपुढे अत्यंत विवश झाला होता. त्याने श्रीरामाला ‘सैनिक, अस्त्र-शस्त्र देऊ का ?’, असे विचारले. तेव्हा श्रीराम म्हणाले, ‘मला काहीच नको. जर विश्वामित्र ऋषींचा माझ्यावर विश्वास आहे की, मी त्यांच्यासाठी काही करू शकतो, तर मी येथून अस्त्र-शस्त्र तरी कशाला नेऊ ?’

 

वनवासाला जाण्याच्या वेळीही हाच विषय चालला होता. श्रीरामाच्या समवेत काय काय असले पाहिजे ?, त्याच्यासमवेत किती लोकांनी जायचे ?, कोणती व्यवस्था असली पाहिजे ?, यावर चर्चा चालू होती. ते ऐकून श्रीराम म्हणाला, ‘वनवासात माझी चांगली व्यवस्था व्हावी, यासाठी मी जात असेल, तर मी वनवासी कसा होणार ?’ वनवासकाळात ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडली, त्या त्या सर्व गोष्टी रामाने निर्माण केल्या. रामाने सेना निर्माण केली, अस्त्र-शस्त्र निर्माण केले, तसेच त्याकाळी त्रास देत असलेल्या राक्षसांविषयी सर्वांमध्ये जागृतीही निर्माण केली.

४. श्रीरामाचा अयोध्येवर ११ सहस्र वर्षे राज्यकारभार

प्रभु श्रीराम सर्वपरित्याग करून रिक्त हातांनी वनवासाला निघाले होते. तेव्हा त्यांचे ‘मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीराम’ हे नाव पडले. वनवास काळात त्यांच्याकडे कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या. प्रभु श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्या येथे परत आले, तेव्हा त्यांचे जीवन पुष्कळ संघर्षमय बनलेले होते. पुढे त्यांनी अयोध्येचा राज्यकारभार ११ सहस्र वर्षांपर्यंत केला; परंतु याविषयी कोणतीच विशेष चर्चा होत नाही. केवळ श्रीरामाचा १४ वर्षांचा संघर्षमय वनवास, एवढेच सर्वांना ठाऊक आहे.

५. संशोधनाची राखरांगोळी होत असतांना त्याकडे साक्षीभावाने पहाणारे आल्बर्ट थॉमस एडिसन !

आल्बर्ट थॉमस एडिसन ६० वर्षांचे होते. तेव्हा त्यांच्या इमारतीला आग लागली. जेवढी संपत्ती त्यांनी कमावली होती, ती सर्व त्या आगीत भस्मसात् होतांना ते समोर उभे राहून पहात होते. त्या वेळी तेथे एका पत्रकाराने विचारले, ‘तुम्हाला फार दुःख होत असेल ना ?’ त्यावर एडिसन म्हणाले, ‘कशाचे दुःख ?’ पत्रकार म्हणाला, ‘तुमची आयुष्यभरात कमावलेली सर्व कमाई नष्ट झाली म्हणून ?’ एडिसन म्हणाले, ‘नाही.’ पत्रकाराने विचारले, ‘तुमच्या चेहर्‍यावर प्रसन्नता कशी काय आहे ?’ एडिसन म्हणाले, ‘आगीच्या ज्वाळा कशा सुंदर दिसत आहेत. माझी दृष्टी त्याकडे आहे.’ पत्रकाराने विचारले, ‘आता तुम्ही काय करणार ? तुम्ही केलेले सर्व संशोधन यात जळून नष्ट झाले आहे.’ त्यावर एडिसन म्हणाले, ‘जे वयाच्या सीमेत बद्ध झालेले नसतात. ज्यांच्यामध्ये एवढे धाडस असते की, ते पुनः मुळापासून कार्य करायला उभे रहातात. मी पुनः संशोधन चालू करणार आहे.’

६. जगभरात हिंदु राष्ट्र आणण्यासाठी सनातनचे कार्य अधिक विस्तारणे आवश्यक !

सनातन संस्था पुष्कळ महान कार्य करत आहे. संस्थेचे तळागाळात कार्य पोचले आहे. हे कार्य आपल्याला विस्तारित करायचे आहे. ‘आपल्याला केवळ एकाच देशात हिंदु राष्ट्र आणायचे नाही, तर जगभरातील अनेक देशांत हिंदु राष्ट्र आणायचे आहे’, असा विचार आपण केला पाहिजे. त्यासाठी सनातन संस्थेने त्यांची लहान लहान कार्ये अन्य लहान लहान संस्थांकडे सोपवावी. त्यामुळे ते या लहान लहान कार्यातून मोकळे होतील आणि दुसरे अधिक महान कार्य करू शकतील. ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. यासमवेतच वर्तमान काळाच्या आवश्यकतेनुसार आपण जागृत झाले पाहिजे. देशातील सर्व समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे. शिकायला मिळालेल्या झानाला वैचारिक क्रांतीचे स्वरूप द्यायचे आहे. आपापल्या क्षेत्रात जाऊन ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करूया. प्रत्येकाने विशेष संकल्प करून धर्मासाठी कार्य करणे आवश्यक आहे.

७. ‘शिवधारा मिशन फाऊंडेशन’च्या माध्यमातून धर्मजागृती

जेथे जेथे उणिवा दिसतील, त्या आपल्यालाच भरून काढाव्या लागतील. काही वेळा एकमेकांचे साहाय्य आणि सहकार्य घ्यावे लागेल, तेव्हा आपण एकमेकांना साहाय्य करण्यास जराही विलंब करू नये. ‘शिवधारा मिशन फाऊंडेशन’च्या माध्यमातून समाजात अधिकाधिक हिंदुत्व जागृत व्हावे, असे आमचे प्रयत्न आहेत. राम, कृष्ण, शिव, शक्ती आणि गणेश या देवतांची उपासना व्हावी. समाजात विविध माध्यमांतून जागृती केली जाते, उदा. समाजातील कथावाचन वाढण्यासाठी विविध कथावाचन आयोजित केले जाते. त्यामागे अधिकाधिक लोक हिंदुत्वाकडे आकर्षित झाले पाहिजेत, तसेच लोकांच्या मनात प्रभु श्रीराम, भगवान शिव आणि भगवान कृष्ण यांच्याप्रती भक्तीभाव वाढावा, हा उद्देश आहे. आम्ही चारधाम मंदिराच्या स्थापनेसाठी भूमीपूजन केले आहे. आम्ही बद्रिनाथ येथील शंकराचार्यांना, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांच्या हस्ते भूमीपूजनही झाले आहे. त्या वेळी चारधाम मंदिर, गुरुकुल, गोशाळा, वृद्धाश्रम, ध्यानकेंद्र आणि विविध वैशिष्ट्ये असलेले व्यासपीठ असणार आहे.

– प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज, संस्थापक, शिवधारा मिशन फाऊंडेशन, अमरावती


सनातनच्या साधकांमध्ये सौम्यता, माधुर्य आणि विनम्रता यांचा संगम !

सनातन संस्थेमध्ये उच्चशिक्षित आणि सुशिक्षित लोक आहेत, तसेच त्यांच्यात सौम्यता, माधुर्य अन् विनम्रता दिसून येते. संस्थेच्या गुरुदेवांनी शिकवलेली ही सुंदर परंपरा अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याविषयी जेवढे सांगू तेवढे चांगलेच वाटते. हे सर्वजण विविध  प्रांतांतून आले आहेत; परंतु सर्वांमध्ये तीच सौम्यता, तीच मधुरता, तीच विनम्रता आणि तीच आपुलकी दिसून येते, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

– प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज

संपादकीय भूमिका 

हिंदूंना केवळ एकाच देशात (भारतात) हिंदु राष्ट्र आणायचे नाही, तर जगभरातील अनेक देशांत हिंदु राष्ट्र आणायचे आहे !