रोहन हरमलकर याचा भूमी घोटाळा सर्वांत मोठा !

विशेष अन्वेषण पथकाने अटक का केली नाही ? हा प्रश्न !

रोहन हरमलकर

पणजी – राज्यातील भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या पणजी विभागीय कार्यालयाने राज्यात २५ एप्रिल या दिवशी विविध ठिकाणी धाडी घालून रोहन हरमलकर याच्याशी संबंधित १ सहस्र ६०० कोटी रुपये मूल्य असलेल्या भूमी व्यवहारांची कागदपत्रे जप्ती केली होती. त्यांनतर त्याला अटक करण्यात आली असून राज्यात सर्वत्र त्याच्या घोटाळ्याची चर्चा चालू आहे. हरमलकर याने केलेला घोटाळा यापूर्वी भूमी घोटाळ्यात ज्यांना अटक झाली आहे, ते राजू शेट्टी, महंमद सुहेल आणि सुलेमान खान यांच्या घोटाळ्यापेक्षा मोठा आहे.

भूमी घोटाळा प्रकरणी स्थापन केलेल्या विशेष अन्वेषण पथकाने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता; पण त्याला अटक केली नव्हती. याचे कारण काय ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याउलट राजू शेट्टी आणि महंमद सुहेल यांच्याकडून धाडीत काहीही सापडले नसतांना त्यांना अटक करण्यात आली होती.

रोहन हरमलकर राजकारणात सक्रीय होता. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्याने कुंभारजुवां मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपकडून त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता संपुष्टात आल्यावर त्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवून ३ सहस्र ८७० म्हणजे एकूण १८ टक्के मते मिळवली होती, अशी माहिती मिळाली आहे.

या वेळी त्याने निवडणूक आयोगाकडे त्याची १२ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे घोषित केले होते; परंतु आता अंमलबजावणी संचालनालयाने घातलेल्या धाडीनंतर त्याच्याकडे १ सहस्र ६०० कोटी रुपये मूल्याची भूमी असल्याचे आढळले आहे.