
१. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धा निर्मूलनाचेच कार्य करत असणे आणि ‘श्रद्धा अन् अंधश्रद्धा’ यामध्ये त्यांनी स्वत:चीच गफलत करून घेणे
‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एक अधिकारी शाम मानव सध्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली श्रद्धा निर्मूलनाचेच कार्य करत आहेत. ‘अंधश्रद्धा वाईट आहे’, हे कुणीही मान्य करील; पण ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’ यांमध्ये शाम मानव यांनी स्वत:चीच गफलत करून घेतली आहे.

२. स्वतःला सर्वज्ञ समजणार्या शाम मानव यांचा कांगावा
मुळात अध्यात्म विषयच एकदम वेगळा. साधनेच्या एकेक पायर्या ओलांडत सिद्धपदाला जाऊन पोचणार्या सत्पुरुषांची माहिती होणे, हा एक प्रारब्धाचाच भाग असतो, तर त्यांच्या सिद्धींची इत्यादी माहिती होणे दूरच ! अशा परिस्थितीत मानव स्वतःला सर्वज्ञ समजून ‘शास्त्राला आकलन होणार नाही, अशा सिद्धीच अस्तित्वात नाहीत’, असे ढोल पिटत फिरत आहेत. ते ‘सिद्धि असतात, हे कुणी सिद्ध केले, तर त्यास मी १ लक्ष रुपये देण्यास सिद्ध आहे. मी हे आव्हान गेली ६ वर्षे देत आहे; पण कुणी पुढे आलेच नाही’, असे सांगत फिरत आहेत.
३. ‘सर्वसामान्य माणसाचा हे विचार वाचून बुद्धीभ्रंश होऊ नये’, यासाठी योगतज्ञ दादाजींनी सांप्रदायिक मंडळीच्या सहकार्याने वेळोवेळी शाम मानव यांना पत्रे लिहून प्रतिआव्हान देणे
‘सर्वसामान्य माणसाचा हे समाजप्रबोधनाचे (?) विचार वाचून बुद्धीभ्रंश होऊ नये. सर्वसामान्य माणसाची श्रद्धा तर ढळू नयेच; पण ती अधिक दृढ व्हावी’, केवळ याच इच्छेने कल्याणवासी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आपल्या सांप्रदायिक मंडळींच्या सहकार्याने १४.१.१९८८ पासून वेळोवेळी ८ ते १० पत्रे शाम मानव यांना लिहून प्रतिआव्हान दिले होते.
३ अ. ‘सिद्धि असतात’, हे सप्रयोग सिद्ध करतांना यश आल्यास शाम मानव यांनी संप्रदायाला १ लक्ष रुपये देऊन जाहीर शरणागती पत्करणे आणि या जाहीर प्रयोगास केवळ ३.२.१९८८ पर्यंतच अनुमती असणे अन् याची स्पष्ट कल्पना शाम मानव यांना प्रत्येक पत्रात दिली असणे : ‘सिद्धि असतात’, हे आम्ही सप्रयोग सिद्ध करू. त्यात आम्हाला यश आले (आले असतेच म्हणा), तर शाम मानव यांनी संप्रदायाला १ लक्ष रुपये द्यायचे अन् जाहीर शरणागती पत्करायची. जर सांप्रदायिक मंडळींना अपयश आले, तर सांप्रदायिक मंडळींनी शाम मानव यांना १ लक्ष २५ सहस्र रुपये देऊन त्यांची जाहीर क्षमा मागायची.’
योगतज्ञ दादाजी सर्व गोष्टी दैवी बंधने पाळून करत असल्याने त्यांनी संप्रदायातील वरिष्ठ सहकारी आणि सद्गुरु यांच्याकडून आपल्यावरील बंधने ३ फेब्रुवारीपर्र्यंत शिथिल करून घेतली होती. ‘या जाहीर प्रयोगास केवळ ३ फेबु्रवारी १९८८ पर्यंतच अनुमती आहे’, याची स्पष्ट कल्पना शाम मानव यांना प्रत्येक पत्रात दिली होती.
३ आ. संप्रदायाच्या वतीने केले जाणारे प्रयोग : संप्रदायाच्या वतीने केले जाणारे ३ प्रयोग पुढीलप्रमाणे होते.
१. अनुमाने २०० ते ५०० माणसे बसू शकतील, अशा एका सभागृहात सर्वांसमक्ष मंत्रसामर्थ्याने ६ फुटी अत्यंत विषारी असे नागराज प्रगट करणे. ‘कुठल्याही प्रकारे शंकेस जागा राहू नये’, यासाठी सभागृह आरक्षण करण्यापासून सर्व गोष्टीचे स्वातंत्र्य शाम मानव यांना होते. त्यांना व्हिडिओ कॅमेरे (छायाचित्रक) लावायला सांगितले होते. पत्रात सर्व तज्ञांना आमंत्रण देण्याविषयी आवर्जून लिहिले होते.
२. कुठल्याही १० ब्रह्मवृृंदांनी बालदीभर पाण्यात अधून-मधून बोटे फिरवून मंत्रघोष करत संस्कार करायचे. साडेतीन घंट्यांनंतर या पाण्याचा रंग पालटून ते संपूर्ण केशरी होईल आणि त्या पाण्याला तीर्थाप्रमाणे चव येईल.
३. मानव आणि त्यांचे सहकारी यांनी कागदावर १० ते १२ प्रश्न लिहून ते ३ – ४ पाकिटांत घालून सीलबंद करून दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयातील कपाटात ठेवायचे. योगतज्ञ दादाजी आपल्या सांप्रदायिक मंडळीसह २ दिवसांनी तिथे येतील आणि ते पाकिट न फोडता प्रत्येक प्रश्न उत्तरासह सांगतील.
४. ८ दिवसांनंतरच्या एका दिवसाच्या दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ठळक घटना कुठल्या असतील, त्याविषयी योगतज्ञ दादाजी यांनी लिहून दिल्यानंतर ते पाकीट उघडून निवेदनाची सत्यता पडताळून पहायची.
४. शाम मानव यांना प्रश्न
योगतज्ञ दादाजींचे प्रतिआव्हान वाचून शाम मानव यांची मती कुंठित झाली आणि त्यांना पत्रांची साधी पोचही देण्याचे सुचले नाही. बोला मानव, आतातरी बोला ! आपले आव्हान स्वीकारणारे कुणी आपल्याला भेटले कि नाही ? आणि योगतज्ञ दादाजींचे आव्हान आपण का स्वीकारले नाही ?’
– नारायणराव उत्तेकर, निवृत्त आयकर अधिकारी
(साभार : ‘ठाणे वैभव’ वृत्तपत्र)