|

मुंबई – महाराष्ट्रातील ४८ शहरांमध्ये तब्बल ५ सहस्र २३ पाकिस्तानी आहेत. गंभीर सूत्र म्हणजे यातील केवळ ५१ जणांकडेच वैध कागदपत्रे आढळली आहेत. थोडक्यात काय, तर ४ सहस्र ९७२ पाकिस्तानी महाराष्ट्रात अवैध वास्तव्य करत आहेत. त्याहून धक्कादायक प्रकार म्हणजे यांपैकी १०७ पाकिस्तानी गायब आहेत. पोलिसांनी शोध घेऊनही ते सापडलेले नाहीत. ही माहिती स्वत: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिली आहे. गायब असलेले पाकिस्तानी नागरिक कोणत्या देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले नाहीत ना ? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
योगेश कदम म्हणाले, ‘‘पारपत्राचा कालावधी संपलेल्या पाकिस्तानी नागरिकांशी भारतीय यंत्रणा संपर्क साधून त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवणार आहे; पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. सध्या ‘सार्क व्हिसा’ आणि ‘शॉर्ट टाईम व्हिसा’ यांवर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २८ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या नागरिकांना आणखी २ दिवस वाढवून देण्यात आले आहेत. त्यांना ३० एप्रिलपर्यंत भारत सोडावा लागेल. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांना याविषयीचे निर्देश दिले आहेत. यानुसार कार्यवाही करतांना महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिकांची सूची सिद्ध करण्यात आली आहे. त्यांचा पत्ता अन्वेषण यंत्रणांना लागत नाही. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम अद्यापही चालू आहे. त्यामुळे या आकडेवारीत पालट होऊ शकतो.’’
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य !महाराष्ट्रात नागपूरमध्ये सर्वाधिक २ सहस्र ४५८ पाकिस्तानी आहेत. ठाणे १ सहस्र १०६, अकोला २२, अहिल्यानगर १४, अमरावती ११८, छत्रपती संभाजीनगर ५९, बुलढाणा ७, धुळे ६, गोंदिया ५, जळगाव ३९३, जालना ५, कोल्हापूर ५८, लातूर ८, मुंबई २८, नाशिक १०, नांदेड ४, नंदूरबार १०, नवी मुंबई २३९, परभणी ३, पालघर १, पिंपरी-चिंचवड २९०, पुणे ११४, रायगड १७, रत्नागिरी ४, सातारा १, सांगली ६, कोल्हापूर १७, वाशिम ६, यवतमाळ १४ अशी राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची संख्या आहे. |
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रात सहस्रो पाकिस्तानी अवैधरित्या वास्तव्याला असणे राज्य आणि देश यांसाठी धोकादायक ! |