आळंदी देवस्थानच्या इतिहासात विश्वस्त मंडळावर प्रथमच एका महिलेची नियुक्ती !

आळंदी – येथील ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराच्या व्यवस्थापनाची प्रमुख संस्था आहे. आतापर्यंत या मंडळावर पुरुषांचीच नियुक्ती होत होती; परंतु अधिवक्त्या रोहिणी पवार यांच्या रूपाने प्रथमच महिलेला विश्वस्तपदाचे दायित्व मिळाले आहे. पवार या कायदेतज्ञ असून, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांतील त्यांच्या योगदानामुळे त्या परिचित आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे मंदिर व्यवस्थापनात कायदेशीर दृष्टीकोन आणि महिलांचा सहभाग वाढेल. अधिवक्त्या रोहिणी पवार यांच्यासह ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील आणि ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर (लोंढे) यांची विश्वस्तपदी निवड झाली आहे.

गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेल्या ३ विश्वस्तपदांच्या जागा भरण्याची प्रक्रिया शेवटी पूर्ण झाली असून, या नियुक्तीमुळे आळंदीच्या धार्मिक आणि प्रशासकीय व्यवस्थापनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन विश्वस्तांच्या नियुक्तीमुळे लैंगिक समानतेचा संदेश देतांना स्थानिक आळंदीकरांचाही प्रतिनिधित्वाचा आग्रह पूर्ण झाला आहे. ह.भ.प. चैतन्य महाराज आणि ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हे स्थानिक आहेत.