सरोगसी (कृत्रिम गर्भधारणा), प्राणी यांच्या माध्यमातून होणारी तस्करी आणि प्राणी हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मुंबई येथील अधिवक्त्या सिद्धविद्या !

मुंबई येथील अधिवक्त्या सिद्धविद्या यांचा जन्म रांची (झारखंड) येथे झाला. लहान वयात त्यांना गोमातेविषयी विलक्षण प्रेम होते. त्यांना गायीविषयीची स्वप्ने पडत. ‘अनेकदा गायी कसायांनी पकडल्या आहेत आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी कुणी नाही’, असे स्वप्नात दिसून त्याविषयी त्यांना स्वत:च स्वत:चा धिक्कार केल्याप्रमाणे वाटे. अशा प्रकारे ‘बालवयापासूनच गोमातेच्या रक्षणासाठी कार्य करण्याची त्यांच्यात तीव्र इच्छा होती. यामागे पूर्वजन्मीची साधना आणि गोमातेविषयीचा जिव्हाळा असू शकतो’, असे त्या मानतात.

सिद्धविद्या यांनी काशी हिंदू विश्वविद्यालयात कथ्थक नृत्यामध्ये प्रावीण्य प्राप्त केले आहे. शास्त्रीय गायन, नृत्य यांमध्येही त्यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. काशीविश्वेश्वराच्या मंदिरात त्यांनी गायनही केले आहे. ही सर्व कला त्या आध्यात्मिक अंगाने शिकल्या. प्राण्यांच्या रक्षणासाठी त्यांनी भाजपच्या माजी खासदार मेनका गांधी यांच्यासमवेतही काम केले आहे. आज आपण अधिवक्त्या सिद्धविद्या यांच्या कार्याविषयी त्यांनी सांगितलेली माहिती जाणून घेणार आहोत.

अधिवक्त्या सिद्धविद्या

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. काशी विश्व हिंदू विश्वविद्यालयात आणि इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले ! 

अधिवक्त्या सिद्धविद्या यांचे महाविद्यालयीन शिक्षण काशी हिंदू विश्वविद्यालयात झाले. महाविद्यालयात त्यांनी ‘ॲनिमल लॉ’चा (प्राण्यांविषयीच्या कायद्यांचा) अभ्यास केला. वर्ष २००६ मध्ये ‘इंटरनॅशनल कमर्शिअल आर्बिटेशन’मध्ये (‘आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादा’मध्ये) प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी त्या इंग्लंड येथे गेल्या. तेथे ‘इंटरनॅशनल कमर्शिअल आर्बिटेशन’मध्ये प्रावीण्य प्राप्त करण्यासह त्यांनी ‘वल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन लॉ’ (जागतिक व्यापार संघटनेविषयीचे कायदे), ‘ह्मुमन लॉ’ (मानवाधिकाराविषयीचे कायदे) यांचाही अभ्यास केला. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्या पुन्हा भारतात आल्या. भारतात आल्यावर देहली येथे त्यांनी एका खासगी ‘लॉ फर्म’मध्ये (कायदेविषयक आस्थापनामध्ये) काम केले. त्यानंतर विवाह निश्चित झाल्यावर त्या मुंबईमध्ये आल्या. मुंबईमध्ये काही काळ ‘लॉ फर्म’मध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे कार्य करायला प्रारंभ केला.

सत्यासाठी काशी हिंदू विश्वविद्यालयाविरोधात दिलेला यशस्वी कायदेशीर लढा

काशी हिंदू विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांच्या नेत्या म्हणून सिद्धविद्या कार्यरत होत्या. या वेळी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढतांना एका प्रकरणामध्ये त्यांना विश्वविद्यालयातून काढण्यात आले. या वेळी सिद्धविद्या यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात विश्वविद्यालयाच्या विरोधात खटला प्रविष्ट केला. या खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. न्यायालयाने त्यांना पुन्हा विश्वविद्यालयात घेण्याचा निर्णय दिला; मात्र त्यानंतरही त्यांना विद्यालयात प्रवेश देण्यात आला नाही. त्यावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात आले नाही; म्हणून त्यांनी अवमान याचिका प्रविष्ट केली. या वेळी उच्च न्यायालयाने विश्वविद्यालयाला त्यांना प्रवेश देण्याचा, तसेच परीक्षा देण्याचा निर्णय दिला आणि विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंना अटक करण्याचा आदेश दिला. पुढे सिद्धविद्या यांनी परीक्षा दिल्यानंतर त्यांना त्यांचा निकाल आणि गुणपत्रिका दिली गेली नाही. याविरोधातही त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. अखेर काशी हिंदू विश्वविद्यालयाने त्यांचा परीक्षेचा निकाल आणि गुणपत्रिका त्यांच्या घरी पाठवली. अशा प्रकारे त्यांनी स्वत:च्या हक्कासाठी आणि सत्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच कायदेशीर लढा दिला. या सर्व कायदेशीर लढ्यात त्यांनी स्वत:ची बाजू स्वत:च मांडली, हे महत्त्वपूर्ण असून त्यात त्या यशस्वीही झाल्या. विद्यार्थी दशेपासूनच सत्यासाठी लढण्यासाठीची उर्मी त्यांच्यात असल्याचे यातून दिसून येते.

पुढे काशी हिंदू विश्वविद्यालयातच सिद्धविद्या यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आणि विश्वविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये ‘टॉपर’ (सर्वांत वरच्या क्रमांकावर) आल्या. विश्वविद्यालयाने त्यांना ‘स्कॉलरशिप’ (शिष्यवृत्ती) प्रदान केली.

२. गोहत्या रोखण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाच्या अधिवक्त्या म्हणून कार्यरत !

अधिवक्त्या सिद्धविद्या

महाराष्ट्रात वकिली करतांना गोहत्या रोखण्यासाठी अधिवक्त्या सिद्धविद्या यांनी विशेष काम केले. गोहत्येत अडकलेले कसायी, आरोपी यांना जामीन मिळू नये, यांसाठी प्रयत्न करणे; गोप्रेमींच्या वतीने याचिका करणे, त्यांना कायदेशीर साहाय्य करणे आदी कार्य त्या करत होत्या. महाराष्ट्रात जेव्हा गोवंश हत्या बंदी कायदा येऊ घातला, तेव्हा अधिवक्त्या सिद्धविद्या यांनी हा कायदा होण्यासाठी प्रयत्न केले. भविष्यात गोहत्येच्या प्रकरणात राज्यशासनाची सर्वाेच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ‘महाराष्ट्र शासनाच्या अधिवक्त्या’ म्हणून सिद्धविद्या यांची नियुक्ती केली. सध्या गोहत्या आणि गोवंश हत्या रोखण्यासाठी अधिवक्त्या सिद्धविद्या महाराष्ट्र शासनाच्या अधिवक्त्या म्हणून सक्षमपणे कार्य करत आहेत. जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने गोहत्या बंदी कायद्यातील २ कलमे वगळली, तेव्हा त्या विरोधात अधिवक्त्या सिद्धविद्या यांनी सर्वाेच्च न्यायालयात अभ्यासपूर्ण याचिका केली. या कालावधीत त्यांनी तब्बल २ महिने स्वत:ची वकिली आणि कार्यालयाचे काम पूर्णपणे बंद ठेवून या याचिकेवर लक्ष केंद्रित केले. या कालावधीत त्यांनी त्यांच्याकडील खटल्यांचे दायित्व त्यांच्या सहकार्‍यांवर सोपवून या खटल्याला प्राधान्य दिले आणि सर्वाेच्च न्यायालयात अभ्यासपूर्ण याचिका प्रविष्ट केली. याविषयीचा खटला अद्याप चालू व्हायचा आहे.

३. प्राण्यांद्वारे होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा आणण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान

भारतातून मोठ्या प्रमाणात विदेशात जिवंत प्राण्यांची विक्री होत होती. विशेषत: ईदच्या काळात दुबईला बकर्‍यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. भारतात ज्या किमतीला प्राण्यांची विक्री होत होती, त्याच किमतीला ते प्राणी विदेशात विकले जात होते. ही आश्चर्याची गोष्ट होती. त्यामुळे प्राण्यांच्या शरिरातून अमली पदार्थ, हत्यारे, भ्रष्टाचाराचे पैसे आदींची तस्करी चालत असण्याची शक्यता होती. प्राण्यांची ही वाहतूक सागरी मार्गाने चालू होती. यापूर्वी विदेशात नेण्यात येणार्‍या प्राण्यांची पडताळणी होत नव्हती. त्यामुळे प्राण्यांच्या माध्यमातून अवैध तस्करी करणे सोपे होते. केंद्रशासनाच्या विविध खात्यांशी संबंधित हा भाग होता.

केंद्रशासनाच्या संबंधित सर्व खात्यांशी पत्रव्यवहार करून ही गंभीर गोष्ट आम्ही लक्षात आणून दिली. त्यानंतर केंद्रशासनाने याविषयी कायदा केला. या कायद्याद्वारे सागर मार्गाने प्राण्यांची वाहतूक करण्यावर प्रतिबंध करण्यात आला, तसेच विदेशात जिवंत प्राण्यांची वाहतूक करण्यावरही प्रतिबंध घालण्यात आला. अधिवक्त्या सिद्धविद्या यांच्या या याचिकेमुळे देशविघातक कृत्यांना आळा बसला. केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात हा प्रकार होऊ नये, यासाठी केंद्रशासनाने कायद्याची निर्मिती केली. ही देशाच्या दृष्टीने मोठी यशस्वी संधी ठरली.

४. ‘सरोगसी’च्या आडून चालणारे रॅकेट रोखण्यासाठी कायद्यात पालट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका !

‘सरोगसी’च्या (कृत्रिम गर्भधारणेच्या) नावाखाली मोठे षड्यंत्र !

राज्यात ‘सरोगसी’च्या (कृत्रिम गर्भधारणेच्या) नावाखाली मोठे षड्यंत्र चालू असल्याचा प्रकार माझ्याकडे आलेल्या एका प्रकरणातून लक्षात आला. यामध्ये अन्य राज्यांतून गरीब महिलांना महाराष्ट्रात आणून धनवान लोक त्यांच्या गर्भाशयाचा उपयोग मुले जन्माला घालण्यासाठी करत होते आणि हा प्रकार व्यावसायिक उद्देशाने चालू असल्याचे लक्षात आले. यामध्ये काही रुग्णालयेही गुंतलेली होती. या प्रकारांमध्ये डॉक्टर संबंधितांकडून ३०-४० लाख रुपये घेऊन गर्भ वाढवणार्‍या महिलेला पैसे अल्प देत होते. भारतात ‘सरोगसी’द्वारे मुले जन्माला घालणे कायदेशीर असल्याने विदेशातून अनेक लोक भारतात त्याद्वारे मुले जन्माला घालण्यासाठी येत असल्याचे लक्षात आले आणि हा प्रकार व्यावसायिकदृष्ट्या चालू होता. यामध्ये मोठे रॅकेट असल्याचे लक्षात आले. भारत जणू ‘सरोगसी’चे मुख्य केंद्र (हब) झाले होते. पूर्वी बालकांना दत्तक घेण्यासाठीचा कायदा होता. यामध्ये केवळ एका प्रतिज्ञापत्राद्वारे मुलांना दत्तक घेता येत होते; मात्र यातून दत्तक घेण्यात आलेल्या मुलांचा अपप्रकारांसाठी उपयोग केला जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यावर प्रतिबंध घालण्यात आले. कायद्याने प्रतिबंध आल्यानंतर यातून चालणारे रॅकेट ‘सरोगसी’कडे वळले आणि महाराष्ट्रासह देशभरात व्यावसायिक ‘सरोगसी’मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हा प्रकार लक्षात यावा, यासाठी महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांकडे ‘सरोगसी’च्या प्रकरणांची माहिती प्राप्त व्हावी, यासाठी अर्ज केला; मात्र महाराष्ट्रातील एकही रुग्णालय ‘सरोगसी’च्या माहितीच्या नोंदी ठेवत नसल्याचे कळवण्यात आले. हा प्रकार अत्यंत गंभीर होता. याविषयी आम्ही महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर याच्या चौकशीसाठी राज्यशासनाने समितीची स्थापना केली. हा सर्व प्रकार आम्ही बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या लक्षात आणून दिला. याचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रशासनाने कायदा करून व्यावसायिक ‘सरोगसी’वर बंदी घातली. त्यामुळे ‘सरोगसी’च्या माध्यमातून चालू असलेल्या व्यावसायिक रॅकेटला प्रतिबंध बसला. ‘सद्यःस्थितीत स्वत:च्या नात्यातील, परिचित महिलेला ‘सरोगसी’करता उपयोग करता येऊ शकतो’, असे कायद्याने निश्चित केले आहे. महाराष्ट्रात आणि देशभरात ‘सरोगसी’च्या नावाने चालू असलेल्या अभद्र रॅकेटला पायबंध घालण्यामध्ये अधिवक्त्या सिद्धविद्या यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. व्यावसायिक ‘सरोगसी’च्या माध्यमातून चालणारे अनैतिक धंदे, मानवी तस्करी हे अपप्रकार यामुळे रोखले गेले, ही मोठी फलनिष्पत्ती ठरली.

५. लव्ह जिहाद रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य !

अधिवक्त्या सिद्धविद्या यांच्याकडे आलेल्या एका युवतीच्या मारहाणीच्या प्रकरणामागे वेगळाच प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यापूर्वी त्यांचा ‘लव्ह जिहाद’विषयीचा अभ्यास नव्हता; मात्र बिहारमधून आलेले काही मुसलमान युवक ज्यांचा विवाह यापूर्वी झाला असूनही महाराष्ट्रात हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह करत असल्याचा गंभीर प्रकार लक्षात आला. ते युवक त्यांचा विवाह झाल्याचे लपवून ठेवत होते. त्यांच्याकडे आलेल्या एका बौद्ध युवतीसमवेतही असा प्रसंग घडला. त्यानंतर अशी काही अन्य प्रकरणे कायदेशीर साहाय्याकरता त्यांच्याकडे आल्यावर हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या युवतींना कायदेशीर साहाय्य करणे, त्यांचे प्रबोधन करणे, अशा प्रकारे कार्य चालू केले.

६. मुंबईत उघडपणे होणार्‍या प्राण्यांच्या हत्या रोखण्यासाठी केलेला यशस्वी प्रयत्न

ईदच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेकडून प्राणी हत्या करण्यासाठी ऑनलाईन अनुमती देण्यात येत होती. यामुळे मुंबईत रस्त्यांवर, तसेच सोसायटींमध्ये प्राणी उघडपणे कापले जात होते. प्राण्यांची हत्या करण्यासाठी ऑनलाईन अनुमती देण्यात येऊ नये, यासाठी अधिवक्त्या सिद्धविद्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. या प्रकरणाची परिणामकारकता लक्षात यावी, यासाठी अधिवक्त्या सिद्धविद्या आणि त्यांचे सहकारी अधिवक्ते यांनी या खटल्यातील न्यायमूर्ती ओक यांच्या न्यायालयात, तसेच सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांच्या न्यायालयात प्राणी कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे ऑनलाईन अर्ज केला. या दोन्ही अर्जांना महानगरपालिकेने अनुमती दिली. या अनुमती अधिवक्त्या सिद्धविद्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती ओक यांच्या खंडपिठापुढे सादर केल्या. यामुळे प्राण्यांच्या हत्येला ऑनलाईन अनुमती देण्याच्या प्रकाराची भयावहता उच्च न्यायालयाच्या लक्षात आली आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने प्राण्यांच्या हत्यांना ऑनलाईन अनुमती देणे बंद केले. मुंबईत उघडपणे होणार्‍या प्राण्यांच्या हत्या अधिवक्त्या सिद्धविद्या आणि त्यांचे सहकारी अधिवक्ते यांच्या प्रयत्नांमुळे थांबल्या.

७. प्राण्यांच्या वाहतुकीच्या विदारक स्थितीविरोधात आवाज उठवला !

महाराष्ट्रात प्राण्यांची वाहतूक करतांना प्राण्यांना अत्यंत विदारक स्थितीत वाहनांमध्ये भरले जाते. याविषयी कायदा असूनही त्याविषयी मोटर वाहतूक विभागाच्या अधिकार्‍यांनाही विशेष माहिती नव्हती. हा सर्व अपप्रकार अधिवक्त्या सिद्धविद्या यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिला. याविषयी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्याविषयीचा खटला अद्याप प्रलंबित आहे.

८. न्यायालयाच्या आदेशावर कार्यवाहीविषयी यंत्रणा निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील !

सर्वाेच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालये यांच्याकडून वेळोवेळी समाजहितासाठी आदेश दिले जातात किंवा समाजहिताची निरीक्षणे नोंदवली जातात; मात्र त्याचे पालन होत नाही. त्यामुळे नागरिकांना पुन्हा पुन्हा न्यायालयात जावे लागते. यामुळे न्यायालयाचा, तसेच नागरिकांचाही वेळ जातो. जनहित याचिका करणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या प्रश्नाकडे लक्ष देणारे कुणीही रहात नाही. ‘न्यायालयाने दिलेले आदेश आणि निरीक्षणे यांचे पालन होत आहे ना, याविषयी न्यायालयाची यंत्रणा असावी’, या महत्त्वपूर्ण सूत्रासाठी अधिवक्त्या सिद्धविद्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यात या याचिकेतून समाजहिताचा निर्णय होऊ शकेल.

यासह वृक्षारोपण, नवी मुंबई येथील विमानतळाच्या निर्मितीसाठी भूमी अधिग्रहित करतांना गोमाता, गोवंश आदी प्राण्यांसाठी जागाही न्यायालयाने उपलब्ध करून द्यावी; गायरानावरील अतिक्रमण हटवणे आदी विविध विषयांमध्ये अधिवक्त्या सिद्धविद्या काम करत आहेत. अधिवक्त्या सिद्धविद्या यांचे समाजकार्यातील भरीव योगदान लक्षात घेऊन विविध संघटना, संस्था यांनी त्यांना अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

शंकराचार्यांनी ‘सिद्धविद्या’ असे नामकरण करणे !

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

द्वारका येथील शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सिद्धविद्या यांच्या घरी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यामुळे घरामध्ये पहिल्यापासून शिवआराधना होत होती. सिद्धविद्या यांच्या वडिलांनी द्वारकेचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेतली होती. सिद्धविद्या यांचे वय ६ वर्षे असतांना त्यांचे वडील त्यांना शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडे घेऊन गेले होते. त्या वेळी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी या छोट्या मुलीला पाहून स्वत:हून तिचे नामकरण ‘सिद्धविद्या’ असे केले. या वेळी शंकराचार्यांनी सिद्धविद्या यांच्या वडिलांना सांगितले, ‘हिच्या सिद्धविद्या नावासमवेत अन्य कोणतेही नाव जोडू नये. ही मुलगी राष्ट्र आणि समाज यांसाठी कार्य करील.’ त्यामुळे पुढे शाळा, महाविद्यालय यांमध्ये, तसेच विवाहानंतरही त्यांचे नाव ‘सिद्धविद्या’ असेच ठेवण्यात आले.