Simla Agreement : पाकने शिमला करार स्थगित केल्याने भारताला पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्याचा मार्ग मोकळा !

नवी देहली – भारताने पाकच्या विरोधात ५ कठोर निर्णय घेतल्यानंतर  पाकिस्तानने भारतासमवेतचे द्विपक्षीय संबंध रहित केले आहेत. वर्ष १९७२ मध्ये झालेला शिमला करार स्थगित करण्याचीही घोषणा त्याने केली आहे. विशेष म्हणजे या करारात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एल्ओसी – लाईन ऑफ कंट्रोल) स्थायी सीमा म्हणून निश्चित करण्यात आली होते. हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अस्तित्वातच रहात नाही. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारताच्या काश्मीरला थेट जोडला जातो आणि भारत तो पूर्णपणे कह्यात घेऊ शकतो. करार स्थगित झाल्याने पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेणे, हे कुठल्याही कायद्याचे उल्लंघनही होत नाही.

१. भारत-पाकिस्तान सीमेवरील ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषा’ तशीही पाकिस्तानने पाळली नव्हती. कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानने या सीमेच्या मर्यादा ओलांडून भारतावर आक्रमण केले होते; परंतु भारताने या रेषेची मर्यादा पार केली नव्हती.

२. शिमला करारानुसार भारताने बंदी बनवलेल्या ९३ सहस्र पाकिस्तानी सैनिकांना सोडले होते, तसेच अन्यही काही अटी त्यात होत्या. पाकिस्तान तेव्हा झुकला होता. इंदिरा गांधी यांनी पाकव्याप्त काश्मीरवरून दबाव आणला असता, तर पाकिस्तानसमोर दुसरा पर्याय नव्हता; परंतु तसे झाले नाही. यामुळे तेव्हा जिंकूनदेखील भारत हरल्याची भावना लोकांत होती.

क्षेपणास्त्र चाचणीची पूर्वसूचना देण्याचाही करार रहित

पाकच्या निर्णयातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये अण्वस्त्रांचे आक्रमण रोखण्यासंदर्भात करार झाला होता. हा करारही आता स्थगित झाला आहे. बॅलेस्टिक मिसाईलच्या चाचणीची पूर्वसूचना देण्याविषयीचाही एक करार केलेला होता, तोदेखील रहित झाला आहे.

संपादकीय भूमिका

भारताने आता याचा लाभ घेऊन पाकव्याप्त काश्मीर मुक्त करून तो भारताला जोडावा !