पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे विधान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानवर यापूर्वीही पहलगामसारख्या आक्रमणांचे आरोप झाले आहेत. हे पूर्णपणे थांबवले पाहिजेत. एक उत्तरदायी देश म्हणून पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीत सहभागी होण्यास सिद्ध आहे, असे विधान पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले आहे. ते काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
(म्हणे) ‘भारत जगाची दिशाभूल करत आहे ! ’
पंतप्रधान शाहबाज शरीफ पुढे म्हणाले की, भारत जगाची दिशाभूल करत आहे. कोणताही विश्वासार्ह तपास आणि पुराव्याविना तो पाकिस्तानवर खोटे आरोप करून देशाची अपकीर्ती करत आहे. पाकिस्तान स्वतःच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास सिद्ध आहे.
सिधु नदीचे पाणी थांबवले, तर आम्ही पूर्ण शक्तीनीशी प्रत्युत्तर देऊ !
पंतप्रधान शरीफ म्हणाले की, सिंधु नदीचे पाणी थांबवण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्याला पूर्ण शक्तीनीशी प्रत्युत्तर दिले जाईल. पाकिस्तानसाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. हा आमच्या २४ कोटी लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्याचे रक्षण करू. पाकिस्तानला शांतता हवी आहे; परंतु ही इच्छा दुर्बलता मानू नये. पाकिस्तानचे सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. (गेल्या ४ युद्धात पाकिस्तान भारताचे काहीही वाकडे करू शकलेला नाही. भारतच गांधीगिरी करत राहिल्याने आजपर्यंत पाकचे अस्तित्व कायम राहिले आहे. आता त्याला शेवटची घरघर लागली असून जगाच्या नकाशावर पाकिस्तान नावाचा देश होता, हे आता इतिहासजमा होणार आहे ! – संपादक)
(म्हणे) ‘काश्मीर ही पाकिस्तानची गळ्याची नस !’
जिन्ना यांनी योग्य म्हटले होते की, ‘काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे.’ दुर्दैवाने अमेरिकेने अनेक प्रस्ताव देऊनही काश्मीरचा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही. काश्मीरमधील लोकांना स्वतःचे निर्णय घेण्याच्या अधिकाराचे पाकिस्तान नेहमीच समर्थन करील. पाकिस्तानने नेहमीच आतंकवादाचा निषेध केला आहे. आमचा देश स्वतः आतंकवादाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये ९० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ६०० अब्ज डॉलर्सची हानी झाली आहे. हे सर्व कल्पनेपलीकडचे आहे.
संपादकीय भूमिकाभारतात आतापर्यंत झालेल्या अनेक आतंकवादी आक्रमणांची चौकशी करण्यास पाकने टंगळमंगळ केली आहे. भारताने दिलेले पुरावे फेटाळले आहेत. त्यामुळे पाक कितीही म्हणत असला, तरी तो ढोंग करत आहे, हे भारताला आता ठाऊक झाल्याने भारत स्वतःच आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून शिक्षा करील ! |