
कुडाळ – आतंकवादी आक्रमणानंतर मी काश्मीरमध्ये लोकांना साहाय्य करण्यासाठी गेलो होतो. तेथे त्यांना धीर आला. सुरक्षितपणे घरी जाऊ शकतात, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला. पहलगाम येथील आक्रमण हे देशावरील आक्रमण आहे. याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी प्रत्येक भारतियाची भावना आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर पाकिस्तानधार्जिण्या आतंकवाद्यांना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाहीत, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांत कोकणात मिळालेल्या यशामुळे येथील जनतेचे आभार मानण्यासाठी २४ एप्रिलला कुडाळ येथे शिवसेनेची आभार सभा झाली. तत्पूर्वी सकाळी उपमुख्यमंत्री पहलगाम येथे गेले होते. तेथून ते थेट कुडाळ येथे आले. पहलगाम येथे गेल्यामुळे त्यांना कुडाळ येथे पोचण्यास विलंब झाला होता. त्याचा उल्लेख त्यांनी सभेच्या प्रारंभी केला.
या सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘‘कोकणी माणसाने विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांत आमच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी मी आलो आहे. कोकणच्या विकासासाठी काहीही अल्प पडू देणार नाही. येणार्या काळातही अशाच पद्धतीने शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे रहा.’’
या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार नारायण राणे आणि आमदार नीलेश राणे यांच्या कार्याचे कौतुक केले. ‘शिवसेनेचा भगवा घेतल्यापासून फक्त कामावर आणि विकासावर आमदार नीलेश राणे यांनी लक्ष दिलेला आहे. स्वाभिमानाने पेटून उठलेला आणि अडचणीला धावून जाणारा तो खरा शिवसैनिक आहे’, असे गौरवोद्गार आमदार राणे यांच्याविषयी काढले.
आमदार राणे यांच्यासह अन्य मान्यवरांचीही भाषणे या वेळी झाली.